Headlines

Shubha Godbole : ‘कॅन्सर ही माझी ओळख होऊ द्यायची नाही असं ठरवलेलं’, शुभा गोडबोलेंची कर्करोगाची झुंज यशस्वी, अभिनेत्रीनं मानले सर्वांचे आभार


Shubha Godbole : ज्येष्ठ मराठी अभिनेत्री शुभा गोडबोले यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या कॅन्सरच्या प्रवासाबद्दल सांगितलं आहे.

Shubha Godbole On Her Cancer Journey
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – ज्येष्ठ मराठी अभिनेत्री शुभा गोडबोले यांनी खंबीरपणे कॅन्सरवर मात केली आहे. यासंदर्भातच शुभा यांनी पोस्ट शेअर करत त्यांच्या प्रवासाबद्दल सांगितलं आहे.

शुभा गोडबोले यांची पोस्ट

शुभा गोडबोले यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिलं की, ‘माझा प्रवास…कधी कधी आयुष्य आपल्याला अशा प्रकारे बदलून टाकतं, ज्याची आपण कधी कल्पनाही केलेली नसते…काही दिवसांपूर्वी मी माझ्या ‘Chemo Curls’ बद्दल एक पोस्ट केली होती. ती पोस्ट इतक्या लोकांपर्यंत पोहोचेल, २० हजारांहून अधिक व्ह्यूज मिळतील असं खरंच वाटलं नव्हतं. माझ्यावर प्रेमाचा, शुभेच्छांचा आणि आशीर्वादांचा वर्षाव करणाऱ्या प्रत्येकाचे मनापासून आभार.’
Maharashtra TimesGargi Phule : ‘रवी काका खूप हँडसम होते, पाच-सहा मुली त्यांच्या मागे असायच्या’, गार्गी फुले यांनी सांगितला रवींद्र महाजनींचा किस्सा
‘पण आज जेव्हा मी माझे तेव्हाचे आणि आताचे फोटो पाहते, तेव्हा मला जाणवतं…माझ्यात झालेला सर्वात मोठा बदल माझ्या केसांमध्ये नाही. तो माझ्यात झाला आहे. कॅन्सर हा शब्द ऐकताच आपल्या मनात सर्वात आधी एकच भावना निर्माण होते, भीती आणि माझ्या अनुभवातून मला एक गोष्ट जाणवली आहे…कॅन्सरशी लढाई ही जितकी शारीरिक असते, तितकीच, कदाचित त्याहूनही अधिक, ती मानसिक असते. मी डॉक्टर नाही. त्यामुळे डॉक्टरांचं काम त्यांना करू देऊया. औषधं त्यांचं काम करतील. केमोथेरेपी तिचं काम करेल. पण तुमचं काम एकच, तुमचं मन खंबीर ठेवणं आणि इथेच मला वाटतं, कदाचित मी कोणासाठी तरी काही फरक घडवून आणू शकते.’
Maharashtra Times‘लोकशाही असलेल्या देशात हे सगळं सुरुये, माणसाची किंमत कमी झाली’, CJP आंदोलनाला मराठी कलाकारांचा पाठिंबा
‘मी माझ्या आजारपणाबद्दल फारसं बोलू इच्छित नव्हते. कारण लोकांना काळजीपोटी का होईना, पण पुन्हा पुन्हा त्याच विषयावर बोलायचं असतं. त्यामुळे मी 6/7 महिने फोन घेणंही टाळलं. मी मात्र सतत पुढे पाहत राहिले. “मी बरी झाल्यावर काय करणार?” याचा विचार करत राहिले. पुढचे प्रवास, पुढची स्वप्नं, मला आवडणाऱ्या गोष्टी…मी आजारपणाच्या पलीकडचं आयुष्य मनात सतत जगत राहिले आणि आज, जेव्हा मी त्या प्रवासातून बरी होऊन बाहेर आले आहे, तेव्हा मला वाटतं, आता माझी गोष्ट सांगू शकते. कारण मला वाटतं, या सगळ्या प्रवासात सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, स्वीकार- acceptance. एकदा आपण मनापासून सर्वात worst case scenario म्हणजे वाईट शक्यता स्वीकारली…त्यानंतर त्यापेक्षा जे काही चांगलं घडतं, ते सगळं बोनस असतं. कॅन्सर आणि केमोथेरेपी आपल्याकडून खूप काही हिरावून घेतात. केस, शरीराची ताकद, रोजचं आयुष्य, आणि आपल्या शरीरावरचा आपला स्वतःचा ताबा असल्याची भावना…असे अनेक दिवस असतात, जेव्हा आपलंच शरीर आपल्याला अनोळखी वाटायला लागतं.’

‘पण या सगळ्या प्रवासात मी एक निर्णय घेतला. कॅन्सर ही माझी ओळख होऊ द्यायची नाही. मी शक्य तितकं माझं आयुष्य जगत राहिले. माझी विनोदबुद्धी जपली. स्वप्नं पाहणं थांबवलं नाही. प्रवासाचे प्लॅन्स केले. मला आवडणाऱ्या गोष्टी करत राहिले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, पुढे पाहत राहिले. मी नेहमीच खंबीर होते का? नाही. मला भीती वाटली का? थोडी. पण या प्रवासाने मला एक गोष्ट शिकवली…मानसिकदृष्ट्या खंबीर असणं म्हणजे आपल्याला कधीच भीती, दुःख किंवा थकवा जाणवत नाही असं नाही. खंबीरपणा म्हणजे या सगळ्या भावना असूनही, त्यांना आपली आशा हिरावून घेऊ न देणं. आज माझ्या या कुरळ्या केसांकडे पाहताना मला फक्त केमोथेरेपीनंतर उगवलेले केस दिसत नाहीत. मला एक आठवण दिसते. मी काय काय सोसलं आणि त्यातून मी कशी बाहेर आले. कदाचित म्हणूनच माझा हा प्रवास मी आता थोडा अधिक मोकळेपणाने तुमच्याशी शेअर करू इच्छिते.
माझ्या अनुभवातून कॅन्सर किंवा केमोथेरेपीमधून जाणाऱ्या एखाद्या व्यक्तीला जर थोडंसं धैर्य मिळालं, थोडीशी आशा मिळाली किंवा फक्त एवढंच जरी वाटलं की, “मी एकटा/एकटी नाही…” तर माझी ही गोष्ट सांगणं सार्थक आहे.’

Phulwa Khamkar : अनिल बर्वेंची लेक झाली खामकर मसालेवाल्यांची सून, मराठीसह ‘फुलवा’ बॉलिवूडमध्ये गाजली

‘मला या प्रवासातून जाणाऱ्या लोकांशी जोडून घ्यायला आवडेल. मी कोणतीही तज्ज्ञ नाही आणि माझ्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरंही नाहीत. पण मी त्या वाटेवरून चालून आले आहे आणि मला माहीत आहे, तो प्रवास कसा असतो. कधी कधी आपल्याला फक्त कोणीतरी एवढंच सांगावं असं वाटतं, “मी हे सगळं अनुभवलं आहे. तूही यातून नक्की बाहेर पडशील.” आणि माझ्या या प्रवासाचा भाग असलेल्या प्रत्येकाचे, माझं कुटुंब, माझे मित्र-मैत्रिणी, माझे डॉक्टर आणि माझ्यासाठी प्रार्थना करणाऱ्या, मला प्रेम आणि शुभेच्छा देणाऱ्या तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार…’ असं म्हणत शुभा यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा