Atal Setu to Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळापर्यंत प्रवास सोपा करण्यासाठी अनेक प्रकल्पांचं काम सुरू आहे. अटल सेतू ते विमानतळापर्यंत उलवे सागरी किनारा मार्ग बांधण्यात येत आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नवी मुंबई: नवी मुंबई विमानतळापर्यंत प्रवास करताना नागरिकांची गैरसोय होत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. कॅब-रिक्षासाठी अव्वाच्या सव्वा भाडं भरावं लागत असून प्रवासात वेळही अधिक जातो. पण लवकरच मुंबईहून नवी मुंबई विमानतळापर्यंत पोहोचणं आता अगदी सोपं होणार आहे. सिडकोने यासाठी अनेक प्रकल्प हाती घेतले आहेत. मुंबई आणि नवी मुंबई विमानतळाला जोडणारी मेट्रो मार्गिका, ठाण्यापासून उन्नत मार्ग, NAINAची उभारणी यासह अनेक प्रकल्पांमुळे प्रवास सोपा होणार आहे.
उलवे कोस्टल रोड
सिडकोचे उपाध्यक्ष विजय सिंघल यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’ सोबत बोलताना अशाच एका महत्वाकांक्षी प्रकल्पाबद्दल माहिती दिली. दक्षिण मुंबईहून नवी मुंबई विमानतळापर्यंत कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी उलवे सागरी किनारा मार्ग बांधण्यात येत आहे. हा मार्ग अटल सेतूपासून सुरू होईल. दक्षिण मुंबईहून येणाऱ्या वाहनांना सध्या चिर्ले जंक्शन आणि अमरा मार्गे प्रवास करून विमानतळापर्यंत पोहोचता येतं. या नव्या कोस्टल रोडमुळे एक थेट दुवा निर्माण होणार आहे.
उलवे सागरी किनारा मार्गाचं 80 टक्के काम पूर्ण झालं आहे. यापूर्वी ऑगस्ट – सप्टेंबर 2026पर्यंत हा मार्ग प्रवासासाठी खुला होईल अशी अपेक्षा होती. पण पश्चिम आशियातील युद्ध परिस्थितीमुळे काही काम रखडलं आहे. त्यामुळे नोव्हेंबर 2026पर्यंत हा मार्ग तयार होण्याची शक्यता आहे. हा मार्ग तयार होताच दक्षिण मुंबईतील अटल सेतूपासून नवी मुंबई विमानतळ केवळ पाच मिनिटांत गाठता येणार आहे.
मेट्रो लाइन 8
याशिवाय मेट्रो लाइन 8चं बांधकामही सुरु होणार आहे. या 32 किलोमीटर मार्गाला राज्य सरकारकडून मंजुरी मिळाली आहे. सविस्तर प्रकल्प अहवालाचा सध्या अभ्यास सुरू आहे. 9.5 किलोमीटर लांब मार्गिका भूमिगत असेल. या मार्गाच्या बांधकामात काही अडथळे येत असून काही किरकोळ बदल होण्याची शक्यता आहे. यानंतर येत्या दोन आठवड्यात अंतिम अहवाल तयार केला जाईल. हा अहवाल सिडको राज्य सरकारसमोर निधीसाठी मांडणार आहे. त्यानंतर येत्या दोन महिन्यात यासाठी निविदा काढण्यात येतील.
नवी मुंबई विमानतळाच्या उत्तरेकडेही एक मार्ग उभारण्यात आला आहे. कळंबोलीहून विमानतळापर्यंत थेट मार्ग आहे. दरम्यान, पनवेलवरून विमानतळाच्या पूर्वेला जोडणारा मार्गही तयार झाला आहे. यासह पनवेल द्रुतगती महामार्गापासून विमानतळापर्यंत थेट रस्ता बांधण्याचं कामही सध्या सुरू आहे. या मार्गावर तीन पूल आहेत ज्यापैकी दोन पूल तयार आहेत. येत्या काही महिन्यात शेवटचा पूल सुद्धा तयार होईल.
मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील प्रवाशांसह पुणेकरांसाठी ही एक मार्ग तयार करण्यात येणार आहे. MSRDC एक क्लोवरलीफ इंटरचेंज बांधत आहे. या इंटरचेंजवरून पुलांपर्यंत पोहोचता येणार आहे आणि पुलांमुळे विमानतळ गाठता येणार आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा