Headlines

एन. रघुरामन यांचा कॉलम:मोबाइलने संकटकाळात आपली प्रतिक्रिया बदलली आहे का?




साडेचार दशकांपूर्वी, डोंबिवली ते सीएसएमटी (पूर्वीचे व्हीटी) हा माझा मुंबई लोकल ट्रेनचा प्रवास अनेक वर्षे एखाद्या आध्यात्मिक यात्रेसारखा होता. याचे कारण म्हणजे ट्रेनच्या डब्यात भजन गाणाऱ्या मंडळांची उपस्थिती. माझी आई खास करून काही स्नॅक्स डब्यात बांधून देत असे, जो आम्ही नैवेद्य समजून आधी देवाला अर्पण करायचो आणि मग सर्वांना वाटायचो. यामुळे रोजचा कंटाळवाणा प्रवास एका सुंदर भक्तिमय अनुभवात बदलत असे. हा नैवेद्य केवळ ग्रुपच्या लोकांनाच नाही, तर रोजच्या प्रवाशांना आणि अनोळखी सहप्रवाशांनाही दिला जायचा. लोकही पूर्ण श्रद्धेने तो प्रसाद स्वीकारत. संध्याकाळी हाच ग्रुप पुन्हा एकत्र येऊन घरी परतायचा. परतीच्या प्रवासात कोणी पत्ते खेळायचे, कोणी बुद्धिबळ, तर कोणी अंताक्षरी खेळायचे. काही अविवाहित मुले तर ट्रेनमध्येच भाज्या चिरून घ्यायचे, जेणेकरून घरी गेल्यावर स्वयंपाक करणे सोपे जावे. ग्रुपमधील प्रत्येक माणूस उतरताना आपली जागा दुसऱ्या प्रवाशाला द्यायचा. असे नाही की डब्याचा दरवाजा बंद करण्यावरून कधी वाद होत नसत, विशेषतः पावसाळ्यात, पण जेव्हा अशी बाचाबाची व्हायची, तेव्हा ग्रुपमधील एखादी व्यक्ती मध्यस्थी करून सर्वांना शांत करायची. पुढच्या दहा मिनिटांत दरवाजा बंद करण्याला विरोध करणारे लोकही स्वतः दरवाजा बंद करून ग्रुपसोबत भजन गायला लागायचे. त्या ग्रुपमध्ये एक आनंदी माणूस असायचा, ज्याला सगळे ‘समझोत्याचा बादशाह’ म्हणायचे. या ग्रुपचा मुख्य उद्देश हाच होता की, सर्वजण दिवसभर कष्टाचे काम करत आहेत, त्यामुळे कोणीही मनात नैराश्य घेऊन किंवा मूड खराब करून कार्यालयात किंवा घरी पोहोचावे. मंगळवारी रात्री घडलेली एक भयानक घटना ऐकून मला जुना हा प्रवास आठवला. मुंबईत पावसाची पहिली सर आली होती आणि मयंक लोहार (वय 22 वर्षे) व रोशन सुवर्णा हे दोघे लोकलच्या दरवाजाजवळ उभे होते. सहप्रवाशांनी दरवाजा बंद करण्यास सांगितले. मयंकने ते ऐकले, पण रोशनने नकार दिला. मयंकने जबरदस्तीने दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा नशेत असलेल्या रोशनने रागाच्या भरात बॅगेतून खंजीर काढला आणि मयंकच्या पोटावर व छातीवर वार केले. मयंकचा दवाखान्यात नेताना मृत्यू झाला. त्या फर्स्ट क्लास डब्यात 30 पेक्षा जास्त लोक होते आणि माझे असे मानणे आहे की, कोणालाच ही हिंसा आवडली नसेल. तरीही, कोणाही प्रवाशाने पीडिताची मदत केली नाही किंवा तो हल्ला रोखला नाही. काही लोकांनी पोलिसांना फोन नक्कीच केला, पण बहुतेक लोक मात्र तो हल्ला आणि त्यानंतरचे दृश्य मोबाइलवर चित्रित (व्हिडिओ बनवत) करत राहिले. सोशल मीडियावर आलेले व्हिडिओ याचा पक्का पुरावा आहेत. आपण, असे मानूया की प्रवासी घाबरले होते आणि धक्क्यात होते, पण त्यांना जोरात ओरडण्यापासून कोणी रोखले होते? सर्वांनी मिळून आरडाओरडा केला असता, तर हल्लेखोराचे लक्ष विचलित झाले असते. जर ते सर्वजण एखाद्या भजन मंडळीसारखे किंवा अंताक्षरी खेळणाऱ्या ग्रुपप्रमाणे एकमेकांवर विश्वास ठेवणारे असते, तर रोशन 30 जणांवर भारी पडू शकला नसता. दुर्दैवाने, त्या डब्यातील सर्व लोक पूर्णपणे ‘एकटे’ होते. कदाचित त्यांनी विचार केला असेल की, धोक्यापासून दूर राहून व्हिडिओ बनवणे हाच सुरक्षित मार्ग आहे. अन्यथा, मयंकवर वार केल्यानंतर रोशन धावत्या ट्रेनमधून उतरून पळाला कसा आणि पोलिसांच्या हाती लागण्यापूर्वी 15 तास गायब कसा राहिला? मानसशास्त्रीयदृष्ट्या, ट्रेनमधील सर्वजण असा विचार करत राहिले की, कोणीतरी दुसरा माणूस, कदाचित एखादा ताकदवान व्यक्ती मध्ये पडेल आणि याच विचारात सगळे तमाशा बघत राहिले.
फंडा असा आहे की, आपल्याला आपल्या मेंदूला हे सांगावे लागेल की, गर्दीत ‘एकटे’ चालण्यापेक्षा, आपण एक समाज म्हणून राहण्याची आणि सामूहिक भल्याचा विचार करण्याची गरज आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत