Headlines

आईचा ओरडण्याचा आवाज ऐकून मुलगा गेला धावत; विजेच्या तारेचा झाला स्पर्श आणि दोन्ही मायलेक…| Maharashtra Times


प्रतीक तांबोळी, भंडारा: साकोली तालुक्यातील मालूटोला येथे रविवारी एक हृदयद्रावक घटना घडली आहे. शेतात काम करत असताना विजेच्या तारेच्या संपर्कात आल्याने एका मायलेकाचा मृत्यू झाला. ही घटना रविवार, ५ ऑक्टोबर रोजी साकोली तहसीलमधील मालूटोला गावातील शेतशिवारात घडली. मृतांमध्ये आई महानंदा प्रभुदास इलमकर (वय ५०) आणि मुलगा सुशील प्रभुदास इलमकर यांचा समावेश आहे. दोघेही मालूटोला येथील रहिवासी होते.

सौर कुंपणावर पडली जिवंत विद्युत तार

वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी महानंदा यांनी त्यांच्या शेतात सौरऊर्जेवर चालणारे सौर कुंपण बसवले होते. मात्र, अचानक पाऊस आणि वादळामुळे महावितरणची मुख्य विद्युत तार तुटून या सौर कुंपणावर पडली. परिणामी, कुंपणामधून उच्च व्होल्टेजचा प्रवाह वाहू लागला. या तारेच्या संपर्कात आल्याने सुरुवातीला शेतातील वासराचा मृत्यू झाला.

Maharashtra TimesPune News : …नाहीतर निल्या घायवळ फरारच झाला नसता, पोलिसांची 2019 ची एक चूक पडली महागात, नेमकी कोणती?

वासराला वाचवताना आईचा मृत्यू

महानंदा शेतात गेली असता तिला वासरू जमिनीवर पडलेले दिसले. ती त्याच्याकडे गेली असता अनवधानाने विजेच्या तारेच्या संपर्कात आली आणि विजेचा तीव्र धक्का बसल्याने ती जागीच कोसळली. आईच्या ओरडण्याचा आवाज ऐकून मुलगा सुशील घटनास्थळी धावला. त्यालाही आईला वाचवण्याच्या प्रयत्नात तारेला स्पर्श झाला आणि त्याचाही जागीच मृत्यू झाला. काही क्षणांतच आई आणि मुलगा दोघांनीही प्राण गमावले.

महानंदा आणि सुशील दुपारी शेतात गेले, पण रात्रीपर्यंत परतले नाहीत. त्यामुळे पती प्रभुदास इलमकर रात्री सुमारास ८ वाजता शेतात गेले. तिथे पोहोचताच त्यांच्या डोळ्यांसमोर हृदयद्रावक दृश्य उभं राहिलं, पत्नी आणि मुलगा मृत अवस्थेत पडलेले दिसले. त्यांनी तात्काळ गावात येऊन गावकऱ्यांना माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच गावकरी घटनास्थळी धावले. तिथे तुटलेल्या विजेच्या तारा, जळालेल्या गवताच्या खुणा आणि मृत मायलेकाचं दृश्य पाहून सर्वजण स्तब्ध झाले. गावकऱ्यांनी तत्काळ साकोली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली, पण हाकेंना निमंत्रणच नाही, ओबीसींच्या बैठकी काय घडलं?

या भयानक दुर्घटनेत कुटुंबातील दोन्ही कमावते सदस्य आई महानंदा आणि मुलगा सुशील यांचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचे सावट पसरले आहे. गावकऱ्यांनी प्रशासनाकडे पीडित कुटुंबाला त्वरित आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत