Weather Update: आठवड्याच्या सुरुवातील महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता. मोसमी वारे पुन्हा सक्रिय होऊन रखडलेला मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात व्यापला. पण त्यानंतर पुन्हा पावसाचा जोर मंदावला आहे.

केरळ किनारपट्टीवर पोहोचलेला मान्सून १५ जूनपर्यंत दक्षिण, पूर्व, ईशान्य भारतातील बहुतांश भागांमध्ये व्यापला होता. त्यानंतर मोसमी वाऱ्यांची वाटचाल अचानक थांबली. त्यानंतर काही भागांमध्ये पुन्हा पाऊस सुरू झाला. मुंबईमध्ये २३ ते २४ जूनदरम्यान २४ तास मुसळधार पाऊस झाला. पण त्यानंतर पुन्हा एकदा मुंबईत कोरडं वातावरण निर्माण झालं. तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. पुण्यातही गेल्या काही दिवसांपूर्वी मान्सून दाखल झाला असला तरी शहरात फक्त हलक्या सरींची नोंद झाली आहे. घाट परिसरात तर तुरळक पाऊसचं नोंदला गेला.
El Nino Impact: एल-निनोचा परिणाम आता थेट तुमच्या जेवणावर होणार, मासे महागणार; इन्कॉइसने दिला इशारा
मान्सूनचं आगमन होऊनही पाऊस कुठे रखडला?
भारतातील मान्सून काही कारणांमुळेच कमकुवत होतो. यंदा मान्सूनवर परिणाम करणारे पाच प्रमुख घटक आहेत. सर्वात पहिलं कारण म्हणजे कमकुवत असलेला ‘मॅडेन ज्युलिअन ओस्किलेशन’ (MJO). दर ३० ते ६० दिवसांनी विषुववृत्ताच्या भोवती निर्माण होणाऱ्या ढग आणि वादळी वाऱ्यांना MJO असं म्हणतात. हिंदी महासागरावर दाखल झाल्यामुळे भारतातील मान्सून सक्रिय होतं. पण यंदा जून महिन्यात हा पट्टा भारतापासून दूर गेला.
त्यानंतर ‘सोमाली जेट’मुळेही मान्सूनवर मोठा परिणाम झाला आहे. ‘सोमाली जेट’ पूर्व आफ्रिकेतून विषुववृत्तावर प्रवास करतो. अरबी समुद्रातील ओलावा भारतापर्यंत वाहून नेतो. पण यावेळी ‘सोमाली जेट’सुद्धा कमकुवत होता. मान्सूनची मुख्य वाहिनी असलेल्या कमकुवत सोमालीमुळे देशभरात मान्सूनवर परिणाम झाला.
वायव्य भात आणि पश्चिम आशियातील वाळवंटातून वाहणाऱ्या कोरड्या आणि उष्ण हवेमुळे मध्य भारतातील ढगांवर एक पडदा झाकला गेला आहे. या तिसऱ्या गोष्टीमुळे मोसमी वारे रेंगाळले आहेत. चौथं कारण म्हणजे तटस्थ द्विध्रुव (IOD). हिंदी महासागरातील द्विध्रुवामुळे मान्सूनला काहीशी चालना मिळते. पण यंदा तटस्थ राहिल्यामुळे त्या दिशेनेही कोणतीही मदत मिळाली नाही.
पाचवं आणि शेवटचं कारण म्हणजे बंगालचा उपसागर. यंदा उपसागर कमी दाबाचे पट्टे निर्माण करण्यात अपयशी ठरला. यामुळे पाऊस भारताच्या अंतर्गत भागांमध्ये खेचला जातो. पण तेही कमकुवत असल्यामुळे मोसमी वाऱ्यांना भारताच्या दिशेने खेचण्यासाठी कोणतीही प्रणाली उपलब्ध नव्हती.
पावसाच्या तुटीसाठी El Nino जबाबदार आहे का?
एल निनो सक्रिय झाल्याची घोषणा जरी झाली असली तरी त्याची तीव्रता हिवाळ्यापर्यंत वाढू लागते. जुलै, ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यांमध्ये मान्सूनवरील पकड मजबूत होते. त्यामुळे जून महिन्यात झालेल्या कमकुवत पावसाला एल निनो जबाबदार नाही हे स्पष्ट होतं.
जुलैमध्ये मान्सूनचं पुनरागमन होणार का?
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जूनच्या अखेरीस मान्सूनचा प्रवास कमीच राहील पण जुलैच्या सुरुवातीपासून पुन्हा मजबूत होणार आहे. पावसाचा जोर वाढण्यास महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून सुरुवात होईल. त्यानंतर पावसासाठी पोषक वातावरण कायम राहिल्यास संपूर्ण देशात विस्तार होईल. मुंबईसह कोकण किनारपट्टीवरील अनेक भागांमध्ये जुलै महिन्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातही कोसळणार.

