Headlines

हिंगणा अनधिकृत पार्किंगच्या विळख्यात अडकले ; औद्योगिक क्षेत्रातील मुख्य रस्त्यांवर ट्रेलर्स , कंटेनर्स


Nagpur News: हिंगणा औद्योगिक क्षेत्रातील अनधिकृत पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. मुख्य रस्त्यांवर ट्रेलर्स, कंटेनर ट्रक सर्रास उभे असल्याने नागरिक आणि नियमित वाहन चालकांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास होताना दिसत आहे.

अनधिकृत पार्किंग
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.प्रतिनिधी, नागपूर : हिंगणा औद्योगिक क्षेत्रातील बिघडत्या परिस्थितीची दखल घेत एमआयडीसी इंडस्ट्रिज असोसिएशनने (एमआयए) हा मुद्दा संबंधित अधिकाऱ्यांकडे मांडला आहे. एमआयएचे अध्यक्ष पी. मोहन यांनी सांगितले की, या समस्येचे मूळ कारण म्हणजे स्वतंत्र आणि संघटित पार्किंग व्यवस्थेचा अभाव होय.

रात्रभर होणाऱ्या पार्किंगवर कडक कारवाई

मुख्य मार्गांवरून जड वाहने हटविण्यासाठी एमआयडीसी इस्टेटमध्ये स्वतंत्र ट्रक टर्मिनल आणि निश्चित पार्किंग हब तातडीने उभारावे, अशी मागणी पी. मोहन यांनी केली. तसेच, वाहतूक पोलिस आणि स्थानिक प्रशासनाने बेकायदेशीर लोडिंग-अनलोडिंग तसेच रात्रभर होणाऱ्या पार्किंगवर कडक कारवाई करावी, असेही एमआयएने स्पष्ट केले आहे.

पार्किंगची समस्या गंभीर बनली आहे

हिंगणा औद्योगिक क्षेत्रात अनधिकृत पार्किंगची समस्या गंभीर बनली आहे. मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर ट्रेलर्स, कंटेनर ट्रक आणि टेम्पो सर्रास उभे राहत असल्याने कामगार, नागरिक आणि वाहनचालकांना दररोज मनस्ताप सहन करावा लागत आहे. अधूनमधून जाणवणारी ही गैरसोय आता कायमस्वरूपी डोकेदुखी ठरत असून वाहतूक कोंडी, कमी दृश्यमानता आणि अपघाताचा धोका वाढला आहे.

दुतर्फा वाहतुकीसाठी केवळ एक अरुंद लेन शिल्लक

हिंगणा औद्योगिक क्षेत्रातून दररोज दुचाकीस्वार, कर्मचारी बसेस, आपत्कालीन वाहने आणि व्यावसायिक वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र, या भागात स्वतंत्र लॉजिस्टिक्स पार्किंग किंवा ट्रक टर्मिनलची सुविधा नसल्याने जड वाहने मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांच्या दुतर्फा उभी केली जातात. अनेक ट्रान्सपोर्ट ऑपरेटर आणि ट्रकचालक कारखान्यांच्या शिफ्टच्या वेळेतच रस्त्याच्या कडेला वाहने उभी करून लोडिंग-अनलोडिंग करतात. त्यामुळेदुतर्फा वाहतुकीसाठी केवळ एक अरुंद लेन शिल्लक राहते.

रस्ते अपघातप्रवण बनल्याची तक्रार

रात्रीच्या वेळी ही महाकाय वाहने पार्किंग लाइट, रिफ्लेक्टर किंवा हजार्ड सिग्नलशिवाय रस्त्यावर उभी असतात. अंधारे वळण, चौक आणि कारखान्यांच्या प्रवेशद्वारांजवळ उभ्या वाहनांमुळे समोरून येणारी वाहने दिसत नाहीत. परिणामी, हे रस्ते अपघातप्रवण बनल्याची तक्रार नागरिक करीत आहेत.

Maharashtra TimesTukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचा आता इंजिनिअरिंग कॉलेजच्या कॅन्टीनला दणका; मुंबईतील दोन हॉटेलचा परवानाही निलंबित, कारवाईचा धडाका सुरूच

वाहतूक व्यवस्थापनातील नियोजनाच्या अभावावर नाराजी व्यक्त

औद्योगिक पट्ट्यातून रोज प्रवास करणाऱ्यांनी वाहतूक व्यवस्थापनातील ढिसाळपणा आणि नियोजनाच्या अभावावर नाराजी व्यक्त केली आहे. गर्दीच्या वेळेत मुख्य एमआयडीसी रोडवरून वाहन चालवणे आव्हानात्मक ठरते. सोळाचाकी ट्रक आणि कंटेनरमुळे रस्त्याचा मोठा भाग व्यापला जातो. गेल्या आठवड्यात रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रेलरला चुकविताना एका दुचाकीस्वाराचा अपघात थोडक्यात टळल्याचे स्थानिकांनी सांगितले. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

वाहतूक पोलिसांची नियमित कारवाई

औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था, रात्रीच्या पार्किंगवर नियंत्रण, लोडिंग-अनलोडिंगसाठी वेळेचे नियमन आणि वाहतूक पोलिसांची नियमित कारवाई आवश्यक असल्याचे उद्योजक व नागरिकांचे म्हणणे आहे.

Maharashtra TimesMumbai News: ७० हजार सोसायट्यांच्या ‘डीम्ड कनव्हेअन्स’ चा मार्ग मोकळा ; स्वयंपुर्विकासाला गती, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली बैठक

रात्रीचा प्रवास धोकादायक

रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेला उभी असलेली जड वाहने अंधारात स्पष्ट दिसत नाहीत. त्यामुळे कामगार, दुचाकीस्वार आणि आपत्कालीन वाहनांसाठी हा मार्ग अधिक धोकादायक ठरत आहे.

कांचन परुळेकर

लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.

कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.

२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.आणखी वाचा