Headlines

राज्यात कंत्राटदार नाही का? गुजराती कंत्राटदारांना सिंहस्थ कामे दिल्याचा राज ठाकरे यांचा आरोप


Raj Thakre Nashik :राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर होते राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन कुंभमेळा आणि खड्ड्यांवरून सत्ताधारी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला.

राज ठाकरे
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.विशेष प्रतिनिधी,नाशिक : शहरात खड्डे पडले, त्यात माणसे गेली. मात्र, या प्रशासनाला त्याचे काही नाही, ते ढिम्मच आहे. माणसे मेल्याचे त्यांना सोयरसुतक नाही. फक्त कमिशन कसे मिळेल, हाच भाग आहे. अनेक कंत्राटदार गुजरातचे आहेत. महाराष्ट्रात कंत्राटदार जन्मालाच आले नाहीत का, असा सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.

राज ठाकरेंची पत्रकार परिषद

नाशिक दौऱ्यावर आलेल्या राज ठाकरेंनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन कुंभमेळा आणि खड्ड्यांवरून सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. गुजरातमधील कंत्राटदारांना प्राधान्य दिले जात आहे. प्रत्येकाला फक्त कमिशनशी देणेघेणे आहे. २०१५ चा कुंभमेळा नियोजनबद्ध झाला होता, तेव्हा नागरिकांना त्रास झाला नाही. आज मात्र संपूर्ण शहर खड्ड्यांनी व्यापले आहे आणि अपघातात नागरिकांचे बळी जात आहेत.

२००३ आणि २०१५ च्या कुंभमेळ्याचा अनुभव

सन २००३ आणि २०१५ चा अनुभव सांगत त्यांनी प्रशासनावर टीका केली. प्रशासनाला कोणतेही सोयरसुतक नाही. स्मार्ट सिटी योजनेचे काय झाले, विकासाच्या घोषणांचे पुढे काय झाले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कुंभमेळ्याच्या कामांसाठी गुजरातमधील कंत्राटदारांना प्राधान्य दिल्याचा आरोप करीत त्यांनी प्रत्येकाला फक्त कमिशनशी देणेघेणे आहे, असा घणाघात केला.

Maharashtra TimesPune Crime : पुण्यात माणुसकीला काळीमा! चारित्र्यावर संशय, संगनमत करुन सासरच्यांसह पतीने गरोदर बायकोला डेटॉल पाजलं

शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू

भाजपला मते दिली, आता भोगा!
शहरातील वृक्षतोडीवरही ठाकरेंनी हल्लाबोल केला आहे. शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू असल्याचे सांगत ठाकरे म्हणाले, यावर अनेक आंदोलने झाली.पण, प्रशासन ढिम्म आहे. हे सगळे चालू असताना निवडणुकीत लोक त्याच पक्षाला निवडून देत असतील, तर त्याची जबाबदारीही त्यांनीच स्वीकारली पाहिजे. सिंहस्थाच्या नावाखाली विकासाऐवजी कमिशनखोरीला चालना मिळत असल्याचा घणाघात त्यांनी यावेळी केला.

राज ठाकरेंनी केली दिलगिरी व्यक्त

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा नाशिकचा धावपटू दिलीप गावित आणि त्यांचे प्रशिक्षक वैजनाथ काळे यांना भेट न दिल्याच्या प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी स्पष्टीकरण देत दिलगिरी व्यक्त केली. ‘गावित भेटीसाठी आले होते, याची आपल्याला कल्पनाच नव्हती. त्यामुळे भेट नाकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,’ असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. ‘दिलीप गावित येऊन गेल्याच्या बातम्या मी पाहिल्या. त्यांना कोणी बोलावले, याची मला माहिती नव्हती.

Maharashtra TimesNashik Solar Cooker : सोलर कूकरसाठी घरपट्टीत मिळावी सवलत ; माजी मंत्री विजय नवल पाटील यांचे आवाहन

निर्माण झालेला गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न ठाकरे यांनी केला

ते आले आहेत, हेही मला कोणी सांगितले नाही. ते आले आणि मी भेटणार नाही, असे मी का करेन,’ असे सांगत त्यांनी भेट न झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. सध्या दिल्लीला गेलेले गावित नाशिकला परतल्यानंतर आपण त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या प्रकरणावरून निर्माण झालेला गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न ठाकरे यांनी केला.

टीम मटा ऑनलाइन

लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.आणखी वाचा