![]()
‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती’ असे म्हंटले जाते याचा अनेकदा आपणास अनुभव येतो. संतानी रंजल्या गांजलेल्यांसाठी परमेश्वराकडे दान मागितले. जे खळांची व्यंकटी सांडो हे मागणे मागितले. सारे जग मांगल्याच्या वाटेवर चालावे. सदाचार नांदवा ही सर्व संतांची भूमिका राहिली आहे. ज्ञानेश्वर माऊलीनी वाकयज्ञ पूर्ण झाल्यानंतर विश्वकल्याण विश्वात्मकाकडे मागितले. ‘भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात ही मंगलमय प्रार्थना केली.’ संताच्या हृदयी अपार स्नेह करुणा साठलेली असते. त्यामुळे संत विश्व कल्याणाचे मागणे मागतात आणि साधू कोणास म्हणावे हे ही एका वाक्यात सांगितले… ‘जे का रंजले गांजले
त्यासी म्हणे जो आपुले
तोची साधू ओळखावा
देव तेथेची जाणावा’ भारत साधूसंतस ऋषी-मुनींची पावन भूमी. याच भूमीत वाल्मिकींनी रामायण लिहिले. व्यास मुनींनी महाभारत, तर वेदांचे ज्ञान उपनिषदात मांडले. आगम निगम पुराणे आली. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहून भगवद्गीता मराठीत अनुवादित केली. संतांनी काय नाही दिले. अनेक सिद्धांत मांडले. तत्त्वज्ञानाचे भांडार खुले केले. अध्यात्मासोबत व्यक्ती, समाज, राष्ट्र विकासाचा मंत्र दिला. त्यामुळे जे भारतात नाही, असे ज्ञान जगात कुठे ही नाही. खगोल, विज्ञान, गणित सारे ऋषी मुनींनी मांडून ठेवले आहेच. भारतीय तत्वज्ञानास संत परंपरेचा पावन गंध आहे. मग तो भारताचा पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर कोणताही भाग राहो. ही भूमी संत तत्वज्ञानाने सदैव उजळत राहिली आहे. ती अनादी कालापासून. शतक कोणतेही असो संतांनी राष्ट्राला दिशा दिली आहे. मध्ययुगीन काळात भारतीय भूमीवर आक्रमणे सुरू झाली. भारतीय वैभव मिटत होते. भौतिक वैभवासोबत ज्ञान केंद्र मिटू लागली. त्या आभावाने एक अंधकार पसरत होता. गुलामीचे पाश आवळले जात असता समाज रसा तळाला जात होता. तत्वज्ञानावर जणू धुळ जमू लागली. अचानक पूर यावा आणि त्याने सारा संसार वाहून न्यावा अशी स्थिती मध्ययुगात झाली आणि संतांनी भक्ती चळवळ सुरू केली संपूर्ण भारतभर. ही भक्ती चळवळ होती समाजाला जागे करण्याची, समाज सुधारणेची. केवळ व्यक्ती विकास नाही तर राष्ट्र विकास साधू पाहणाऱ्या या संत परंपरेने मध्ययुग ढवळून टाकले. त्यात रामानुजन परंपरेतील रामानंद स्वामी यांनी उत्तरेत क्रांती घडवली. त्यांचे शिष्य कबीर कोष्ठी, धन्ना जाट, पिपा क्षेत्रीय, सेना न्हावी आणि रामदास चर्मकार समाजातील. रामानंद स्वामी यांच्या आखाड्यातून शरीर बळकटी सोबत अध्यात्म व जीवन व्यवहार यासोबतच समाज उन्नतीचे शिक्षण मिळू लागले. संत कबीर आणि संत रविदास हे रामानंदांचे शिष्य. यांची शिखांचे पहिले गुरू गुरुनानक देवजी यांच्याशी काशी येथे भेट झाली. जसा त्रिवेणी संगम व्हावा तेवढा हा मधुर संगम होता ज्ञानाचा. अर्थात संत व गुरू यांनी त्या-त्या राष्ट्राचे नेतृत्व केले. जे जे वाईट ते समाजाने त्यागावे व जे चांगले शाश्वत ते स्वीकारावे हा बोध देत होते याचा प्रत्यय आपणास येतो. संत रविदास महाराज यांचे 2026 हे 650 वे जन्म शताब्दी वर्ष. त्यांचे विचार आज ही अमर सुंगंध निर्माण करीत आहेत. देश स्वातंत्र्य झाल्याच्या 80 व्या वर्षात आज आपणास स्वातंत्र्य ही संकल्पना पूर्ण माहिती आहे किंवा ब्रिटिश विरोधी लढ्यात आपणास पारतंत्र्याची जाणीव होवून स्वराज्य स्वातंत्र्य अधिक कळले असे ही म्हणता येईल. त्या आधी महाराणा प्रताप यांना याची तीव्र जाणीव झाली आणि त्यांनी अकबर विरोधात शस्त्र उचलले. छत्रपतीनी पातशाही पालथी घालून औरंगजेबास चपराक लागवली. संत रामदासांनी महाराष्ट्र धर्म वाढवावा हा केलेला उपदेश ही आपणास परिचित असेल. मात्र त्या आधी एका संतांनी परतंत्र, पराधीनता या बद्दल भाष्य केले होते व गुलामीत जगण्यापेक्षा स्मशानात जावे, हा सज्जड इशारा दिल्याचे फारसे कोणी वाचले नसावे , असे संत म्हणजे संत शिरोमणी रविदास महाराज होत. त्यांनी गुलामी ला पाप म्हंटले आहे. ‘माणसास सुखकर
दोनच ठाव
एक स्वराज
दुसरा स्मशान गाव’ या पेक्षा मोठी चेतावणी काय असू शकते ? ते म्हणतात की, ‘माणसाने जगावे तर सन्मानाने नाही तर स्मशानात जावे. अर्थात जीवन म्हणजे स्वातंत्र्य आणि पराधीनता मृत्यूपेक्षा वाईट. त्यापेक्षा मृत्यू बरा हे विधान अत्यंत क्रांतिकारी आहे, असे म्हणायला हरकत नाही. आणि 14 व्या शतकात तर नक्कीच आहे. ‘पराधिनता पाप मोठे नाही, हे सर्वथा खोटे’ किंवा ‘पराधीन हा दास, पात्र न तो कोणाच्या प्रेमास’, हे त्यांचे विधान त्याकाळी केलेले होते. जेंव्हा दिल्लीवर सिकंदर लोदी या लोदी घराण्याचे राज्य होते. क्वचित एखाद्या संतांनी असे विधान केले असावे. खरे तर गुलामास गुलामीचा जाणीव झाल्याशिवाय तो पेठून उठू शकत नाही असे म्हंटले जाते आणि 14 व्या शतकात संत रविदास समाजाला आपल्या दोह्यातून ती जाणीव करून देतात. खरे तर स्वातंत्र्याची किंमत आता आपणास पूर्ण माहीत आहे. मानव हक्क म्हणून त्यास आता मान्यता मिळाली आहे. व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय, हे संविधानाने आपणास बहाल केले. त्यावेळी व आज त्याची पूर्ण जाणीव होते, पण पराधीन हा दास, तो कोणाच्या प्रेमास पात्र ठरू शकत नाही, कारण तो स्वतः साठी व इतरांसाठी काहीही करू शकत नाही. तो त्याचा मालक नाही, तर कोणीतरी त्याचा मालक असता. गुलामावर कोण प्रेम करेल हे वास्तव ते आपल्या दोह्यातून मांडतात. त्या काळातील तो अत्यंत पुढारलेला विचार असून आज ही अत्यंत प्रासंगिक आहे. अनेक जागतिक संघटनांनी या विषयावर काम केले. तेंव्हा कुठे मानवी गुलामी, वेठबिगारी, मानवी विक्री कमी झाली. अनेक देशांनी गुलामगिरीविरुद्ध लढा दिला. त्या सर्वांचे प्रेरणा स्थान संत रविदास हेच होत. त्यांनी पराधीनता हा वापरलेला शब्द केवळ राजकीय होता असे नाही, तो सामाजिक व आर्थिक गुलामगिरी या व्यापक अर्थाने ही असावा हे ही लक्षात येते. त्या नंतर जगभर व्यापक क्रांती झाली, तसा भारतात ही सामाजिक विषमतेविरुद्ध अनेक समाजसुधारकांनी आवाज उठवला आणि सामाजिक न्याय मिळाला. आज जेंव्हा आपण भारतीय संविधानातील प्रास्ताविकेत स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि राजकीय सामाजिक आर्थिक न्याय हे शब्द वाचतो, त्यावेळी संत रविदासांच्या या विचारांच्या उंची व खोलीची आपणास व्याप्ती कळते. राजकीय व सामाजिक विचारवंत म्हणून त्यांचे स्थान आहे. जगात कोणी राजकीय, सामाजिक विचार मांडण्यास सुरुवात केली त्या श्रेणीत ते आहेत याची जाणीव होते. स्वातंत्र्य ह्या संकल्पनेबरोबर ते आणखी एक राजकीय संकल्पना ते मांडतात ते म्हणजे ‘राज्य’. आपणास कौटिल्य किंवा प्लुटोची राज्य ही संकल्पना माहिती आहे. मात्र एक संत राज्याची संकल्पना काय मांडतात? तर यात न राजा आहे ना समाज वर्गीकरण, ना कोणते राज्याचे अंग. केवळ असे राज्य… ‘असे मागतो मी राज्य
जेथे मिळे सर्वा अन्न
न कोणता जिथे भेद
सारे राहती बंधू सम’ सर्वांना अन्न ही प्राथमिक गरज आणि दुसरी गरज भेद नसलेले आणि त्यात ही बंधू भाव असलेले राज्य ते मागतात. स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही तत्वत्रयी फ्रेंच राज्यक्रांतीतून मिळाली, असे आपण मानतो. ती तत्वे संत रविदासांच्या विचारात दिसतात आणि फ्रेंच राज्य क्रांतीच्या चारशे वर्ष आधीचा हा काळ आहे, हे विसरता येत नाही. भेद नसलेले म्हणजे समता असलेले राज्य आणि सारे बंधू सम नांदावेत हा बंधुतेचा विचार संत रविदासांच्या विचारातून जाणवतो आणि येवढेच नाही तर राज्य कसे असावे. यासाठी त्यांनी वापरलेली बे-गमपुरा ही संकल्पना एखाद्या प्रबंधाचा विषय ठरू शकते एवढी व्यापक उदात्त, आधुनिक आणि प्रगल्भ विचारांचा परिचय देणारी आहे. आज ज्यास आपण लोक कल्याणकारी राज्य म्हणतो या आधुनिक संकल्पनेशी जवळीक सांगणारी, तरी त्याहून अधिक पुढे असणारी, ही संकल्पना वर उल्लेख केल्याप्रमाणे संत ज्ञानेश्वरांनी ही पसायदान मागत विश्वकल्याणची प्रार्थना केली. ‘दुरितांचे तिमिर जावो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे’ म्हंटले. त्याप्रमाणेच एक अशा सुंदर जगाची, राज्याची कल्पना संत रविदास करतात आणि त्यांच्या राज्याचे नाव आहे ‘बे-गम पुरा’ अर्थात दुःख विरहित एखादे शहर, राज्य, ग्राम. त्यास महात्मा गांधींच्या शब्दात रामराज्य म्हणावे का? का त्या पुढील अधिक काही या संकल्पनेत सामावलेले आहे. गांधीजींच्या मते रामराज्याची राजकीय व्याख्या ‘धर्म, शांतता, सौहार्द आणि लहान-मोठे, उच्च-नीच, सर्व प्राणिमात्र आणि पृथ्वीच्यासुद्धा आनंदाचा विचार करून वैश्विक जाणिवेवर आधारलेले राज्य’ अशी करता येते. संविधानाला अपेक्षित लोक कल्याणकारी राज्य काय आहे. याचा विचार केला तर लोककल्याणकारी राज्य म्हणजे अशी राज्यव्यवस्था जिथे सरकार केवळ कायदा व सुव्यवस्था राखत नाही, तर नागरिकांचे सामाजिक व आर्थिक हित जोपासण्याची आणि सर्वांना समान संधी देण्याची मुख्य जबाबदारी स्वीकारते. यात शिक्षण, आरोग्य, अन्न आणि निवारा यांसारख्या मूलभूत गरजा पुरवण्यावर भर दिला जातो. संत रविदास 14 व्या शतकात काय संकल्पना मांडतात ? बे-गमपुरा संकल्पना लोककल्याणकारी राज्यापेक्षा ही अधिक पुढची अवस्था आहे का, तर त्याचे उत्तर निश्चित होय असेच आहे. ‘बेगमपुरा शहराचे नाव
दुःख चिंतेस नाही ठाव
खंत ना कर गुन्हा ना भय
उच ना नीच, राव ना रंक स्वातंत्र्य समतेची नांदी
सुख समृद्धी वसे शांती
सांगे रविदास चर्मकार
सारे व्हावेत स्नेही एक परिवार’ दुःख विरहित असे एक राज्य जिथे कोणतीही खंत कोणाला ही सतावणार नाही. कोणतीही भविष्याची चिंता असणार नाही. ना कोणीही गुन्हा करेल. अपराध नसल्याने भय ही असणार नाही. उच नीच भेद भाव नाहीत व गरीब श्रीमंत असे वर्ग नाहीत. प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र असेल, समाजात समता असेल आणि सुख आणि समृद्धी नांदेल आणि एवढेच नाही, तर सारे जणू एक परिवार आहेत असे राहतील. बंधुता तर यात अपेक्षित आहे. या पुढे जाऊन एकात्मता ही त्याना अपेक्षित आहे. आता ही संकल्पना आपण जगातील कोणत्याही विद्वानाने मांडलेल्या विचारांची ताडून पाहिली तर अधिक सरस आहे. आणि आजच्या लोककल्याणकारी राज्य संकल्पनेहून थोडी अधिक व्यापक असल्याचे जाणवते. दुःख, चिंता, खंत नसावी. सारे स्नेही व्हावेत, ही संकल्पना संत ज्ञानेश्वर यांचे ‘दुरितांचे तिमिर जावो, जे खळाची व्यंकटी सांडो, भूता परस्परे जडो’ शी जुळते. यातून संत रविदासांचे हृदय अपार स्नेह व करुणेने भरलेले आहे याची जाणीव होते. हे संत हृदयाचे बोल आहेत. मात्र, ते जेंव्हा कर नसावा, डर नसावा कोणताही अपराध घडू नये असे म्हणतात त्यावेळी ते एक राजकीय तत्ववेत्ता ठरतात. आणि एका अत्यंत आदर्श राज्यव्यवस्थेची अपेक्षा करतात. जिथे सर्व जण आत्मनिर्भर असतील. कौटिल्य ही ‘अत्यंत कमी कर असावा, जेणे करून लोक ते आनंदाने भरतील’, असे म्हणतात. जसे फुलातून मध सहज गोळा होतो तेवढे हे सुलभ असावे. मात्र, संत रविदास कर नसावा असे म्हणतात. ही त्याच्या पुढील अवस्था आहे. असे राज्य अस्तित्वात असू शकते. संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयकर नाही. सिक्कीममध्ये ही मूळ सिक्कीमवासियांना कर नाही. असे राज्य 14 व्या शतकात संत रविदास यांनी कल्पिले हे विशेष. असे राज्य अत्यंत आदर्श राज्याचा भाग असू शकेल आणि ते राज्य अत्यंत समृद्ध असेल. जिथे व्यापारातून मोठ्या प्रमाणात चलन निर्माण होऊ शकेल, असे समृद्ध व सुखी राज्याची संत रविदास कल्पना करतात. या पुढचे विशेष म्हणजे आज आपण पाहतो गुन्हाचे प्रमाण आणि न्यायालयातील सुनावणी संख्या. जर अपराध होणार नाहीत तर कोणालाही भय असणार नाहीत. अपराध विरहित राज्य निर्माण होण्यासाठी काही अंशी सर्व हातांना काम असेल तर चोरी, दरोडा असे गुन्हे बऱ्याच अंशी कमी होतील. जेंव्हा ह्युअनस्तंग भारतात आला, त्यावेळी इथे घराना दरवाजे कडी कोंडा नसल्याचे त्याने पाहिले होते. कदाचित अशी स्थिती संत रविदासाना अपेक्षित असेल. गरीब श्रीमंत ही दरी नसल्याने अशी आदर्श स्थिती येऊ शकते असा त्याना आशावाद वाटतो. क्षणभर डोळे बंद करून संत रविदासानी मांडलेली बेगमपुरा संकल्पना अनुभवण्याचा प्रयत्न केला, तर भारत एक लोकशाही राष्ट्र म्हणून या वाटेवर आहे. मात्र, असे पूर्ण राष्ट्र होणे आणि विकसित भारत 2047 जवळपास आर्थिक दृष्टीने सारखे असले तरी भयमुक्त आणि भेदमुक्त समरस भारताचे स्वप्न साकार करणेसाठी सर्व समाज घटक यांना परिश्रम घ्यावे लागतील. तेंव्हा कुठे सामाजिक व राजकीय दृष्टीने असे राज्य येऊ शकेल असा आशावाद वाटतो. (लेखिका ‘संत रविदास म्हणे!’या पुस्तकाच्या लेखिका व इतिहास अभ्यासक आहेत.)
Source link
'बे-गमपुरा'च्या वाटेवरून!:संत रविदास अन् कर नसणाऱ्या राज्याचे स्वप्न; वाचा लेखिका स्नेहलता स्वामी यांचा लेख…
