Headlines

नवी मुंबईतील स्थानकांचा तिढा कायम; ‘सिडको’कडून मध्य रेल्वेकडे ताबा देणार, रेल्वे प्रवाशांची गैरसोय कायम राहणार| Maharashtra Times


Navi Mumbai Railway Stations: सिडकोने 2008 पासून कोणत्याही औपचारिक कराराशिवाय नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या बांधकामावर 4,000 कोटी रुपये आणि देखभालीवर 400 कोटी रुपये खर्च केले असून, जाहिरातींमधून केवळ 52 कोटी रुपये कमावले.

नवी मुंबई रेल्वे स्थानकं
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या देखभाल, दुरुस्ती आणि प्रवासी सुविधांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. गेल्या दोन दशकांपासून सुरू असलेल्या सिडको-मध्य रेल्वे समन्वयाचा तिढा कायम आहे. सिडकोच्या अखत्यारितील सर्व स्थानकांची देखभाल मध्य रेल्वेने करावी, असे स्पष्ट केले असून सिडकोकडे असलेल्या उत्पन्नाच्या हक्कासह संपूर्ण स्थानक आणि परिसराचा ताबा द्यावा, अशी भूमिका मध्य रेल्वेने घेतली आहे. यामुळे नवी मुंबईतील रेल्वे प्रवासी सुविधांची गैरसोय कायम राहणार आहे.

सहा महिन्यांत प्रक्रिया पूर्ण

मध्य रेल्वेवरील हार्बर आणि ट्रान्सहार्बरवर बहुतांशी रेल्वे स्थानकांत प्रवासी सुविधांची वानवा आहे. यासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील मुख्यालयात विशेष बैठक शुक्रवारी बोलावली. बैठकीत मध्य रेल्वे, सिडकोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी स्थानक हस्तांतरण, उत्पन्नाचे हक्क आणि देखभालीबाबत चर्चा पार पडली. खासदार नरेश म्हस्के यांनी सिडकोच्या अखत्यारितील उपनगरीय रेल्वे स्थानकांची देखभाल मध्य रेल्वेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पुढील सहा महिन्यांत पूर्ण होईल, असा दावा केला असला तरी रेल्वे अधिकाऱ्यांनी याबाबत अद्याप दोन्ही संस्थांमध्ये अंतिम करार झालेला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Maharashtra TimesMonsoon Update: केरळमध्ये मान्सूनआगमन पाच दिवस आधीच! महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरही पावसाळी वातावरण; हवामान विभागाचा दिलासादायक अंदाज

हार्बर आणि ट्रान्स-हार्बर रेल्वे तिकिटांवर अतिरिक्त अधिभार आकारत असून त्यातून दरमहा सरासरी सुमारे पाच कोटी रुपयांचे उत्पन्न सिडकोला मिळते. रेल्वे प्रशासन स्थानकांचा ताबा घेण्यास तयार आहे, मात्र त्यासोबत व्यावसायिक वापरातील जागा, त्यांचे भाडे आणि परिसरातील संबंधित मालमत्ता यांचाही ताबा द्यावा लागणार आहे. सिडकोने वाशी, सीबीडी बेलापूर आणि सीवूड्स-दरावे स्थानक परिसरात कार्यालये व व्यावसायिक संकुले उभारली होती. कालांतराने ही ठिकाणे नवी मुंबईतील महत्त्वाची व्यावसायिक केंद्रे बनली, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले

बैठकीतील मुद्दे

– नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि विविध पायाभूत प्रकल्पांमुळे रेल्वेवरील ताण वाढणार असल्याने स्थानकांचे व्यवस्थापन एकाच यंत्रणेकडे असणे आवश्यक
– स्थानकांचे नूतनीकरण, बंद तिकीट खिडक्या सुरू करणे तसेच रबाळे, दिघा आणि ऐरोली परिसरातील भुयारी मार्ग व पादचारी पुलाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी

Maharashtra TimesCentral Railway: मुंबईकरांनो कृपया लक्ष द्या! मध्य रेल्वेवर आजपासून 3 दिवस विशेष ब्लॉक, कोणत्या लोकलवर परिणाम? पाहा वेळापत्रक

मध्य, हार्बरवर उद्या मेगाब्लॉक

ठाणे ते कल्याण आणि पनवेल ते वाशीदरम्यान मध्य रेल्वेने उद्या, रविवारी ब्लॉक घोषित केला आहे. दादर स्थानकात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग आणि नायगाव स्थानकात पादचारी पुलाचे गर्डर उभारण्यासाठी पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येत आहे. यामुळे रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर ब्लॉक असणार नाही.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा