श्रीलंकेतील कसोटी मालिकेसाठी भारताला जसप्रीत बुमराह, साई सुदर्शन आणि वॉशिंग्टन सुंदर या प्रमुख खेळाडूंचे योगदान मिळणार नाही. बुमराह आणि साई सुदर्शन दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर पडले आहेत, तर वॉशिंग्टन सुंदर १५ ऑगस्टपासून गॉल येथे सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीत खेळू शकणार नाही. यामुळे सीओईच्या कारभारावर टीका होत आहे.
‘आमच्यात समन्वय’
‘भारताच्या पुरुष आणि महिला संघांचे व्यवस्थापन, ‘एसएसएम’ म्हणजेच क्रीडा विज्ञान (स्पोर्ट्स सायन्स) आणि वैद्यकीय कर्मचारी. तसेच निवड समित्या यांच्याशी सीओईचा उत्तम समन्वय आहे’, असे लक्ष्मण म्हणाले. ‘निवड समितीचे अध्यक्ष सीओईशी संपर्क साधून संबंधित खेळाडूंचा फिटनेस अहवाल मागवतात. आम्ही खेळाडूंची सद्यस्थिती त्यांना पाठवतो. त्या अहवालाची एक प्रत संबंधित मुख्य प्रशिक्षक आणि बीसीसीआयलाही दिली जाते. ही ठरलेली प्रक्रिया आहे’, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘दुखापतींचे दुष्टचक्र’
यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या टी-२० विश्वचषकानंतर नंतर बुमराह डाव्या गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त आहे. त्याची पुनर्वसन प्रक्रिया सध्या सीओईमध्ये सुरू आहे. साई सुदर्शन अजूनही उजव्या पायाच्या अंगठ्याच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही. बुमराहच्या जागी आकिब नबी याची उशिरा बदली खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. मात्र, साई सुदर्शनच्या जागी बोर्डाने अद्याप कोणाचीही निवड केलेली नाही.
‘बुमराह आणि साई सुदर्शन यांची अंतिम निवड फिटनेस अहवालानंतरच होणार होती, हे आधीच स्पष्ट करण्यात आले होते. दुखापतीतून सावरण्याचे मूल्यांकन टप्प्याटप्प्याने केले जाते. पुनर्वसनाची गती अपेक्षेपेक्षा संथ असेल, तर त्याबाबत निवड समिती अध्यक्ष आणि मुख्य प्रशिक्षकांना माहिती दिली जाते’, असे लक्ष्मण म्हणाले.
टीकेस कारण की…
खेळाडूंच्या दुखापतींच्या वाढत्या घटनांमुळे सीओईच्या भूमिकेकडे अधिक लक्ष वेधले गेले आहे. क्रीडा विज्ञान आणि वैद्यकीय विभागाचे प्रमुख पद रिक्त असतानाही सीओईचे कामकाज सुरू असल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या विभागाचे माजी प्रमुख नितीन पटेल यांनी वर्षभरापूर्वी राजीनामा दिला
होता. मात्र, ही जागा रिक्त भरण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे लक्ष्मण यांनी स्पष्ट केले. ‘पटेल बाहेर पडल्यानंतर या पदासाठी योग्य व्यक्ती शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. अँड्र्यू लीपस यांनी शेवटच्या क्षणी माघार घेतली. त्यानंतर डॉ. दिनशॉ पारडीवाला, डॉ. आशिष सोनी आणि मी अशा पॅनलने पाच उमेदवारांची निवड केली’, असे लक्ष्मण म्हणाले.
‘भारतीय क्रिकेट ते चार आठवडे आधी बैठक होते. संघ रवाना होण्यापूर्वी या बैठका घेतल्या जातात. त्या वेळी पुनर्वसन प्रक्रियेत असलेल्या खेळाडूंची अचूक स्थिती आम्हालाही माहीत नसते. त्यामुळे एखाद्या खेळाडूची निवड ‘फिटनेसच्या अटीवर’ करण्यात आली आहे, असे नमूद केले जाते’, असे भारतीय क्रिकेट बोर्डाचे (बीसीसीआय) सचिव देवजित सैकिया यांनी सांगितले.
संघनिवडीच्या वेळी खेळाडूंची स्थिती वेगळी
खेळाडूंच्या दुखापतींबाबत सेंटर ऑफ एक्सलन्स (सीओए) आणि निवड समितीत सध्याच्या सुरुवातीपासूनच समन्वय नसल्याची टीका होत आहे. काही खेळाडूंना फिटनेसचे सर्व निकष पूर्ण करण्यापूर्वीच मुक्त करण्यात आल्याची चर्चाही आहे. सध्या जवळपास १३ खेळाडू ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ मध्ये उपचार घेत आहेत. या पार्श्वभूमीवर सैकिया यांनी रविवारी ‘सीओई’ चे प्रमुख व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांची भेट घेतली.
‘संघ रवाना होण्यापूर्वी २१ किंवा २८ दिवस आधी संघनिवड केली जाते. एखादा खेळाडू उपचार घेत असेल, तर तो पूर्ण फिट झाल्यानंतरच संघात सहभागी होईल, असे स्पष्ट केले जाते. फिट झाल्याशिवाय खेळाडूला मुक्त केले जात नाही. त्याचे फिटनेसचे निकष ठरलेले असतात’, असे सैकिया म्हणाले.
खेळाडूंसाठी ‘ब्राँको टेस्ट’
खेळाडूंची क्षमता आणि गती तपासण्यासाठी आधुनिक ‘ब्राँको टेस्ट‘ केली जाते. आता भारतीय खेळाडूंसाठीही या चाचणीचा उपयोग केला जाणार असल्याची माहिती लक्ष्मण आणि सैकिया यांनी दिली. त्याचबरोबर तंदुरुस्तीसाठी नितीशकुमार रेड्डीसारखे खेळाडू वैयक्तिक प्रशिक्षकांची मदत घेत असल्याच्या वृत्तांचे त्यांनी खंडन केले.

