Headlines

आम्हाला आमच्याच लोकांनी फसवले, अमित ठाकरे नेमकं काय म्हणाले?


अमित ठाकरे सोमवारी छत्रपती संभाजीनगर शहराच्या दौऱ्यावर होते. यावेळी अमित ठाकरे यांनी मनविसेच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. या दरम्यान पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी रोखठोक प्रतिक्रिया देखील दिली.

Amit Thackeray
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
छत्रपती संभाजीनगर : आम्ही स्थानिक पदाधिकाऱ्यांवर विश्वास ठेवला आणि आम्हाला आमच्याच लोकांनी फसवले, असे स्पष्ट करत, आम्ही थांबलो नसून पुन्हा प्रयत्न सुरू केले आहेत. विकासासाठी काम करणार आहोच; शिवाय निवडणुकांकडेही गांभीर्याने पाहणार आहोत, असे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी सोमवारी (२४ ऑगस्ट) पत्रकारांशी बोलताना सांगितले.

शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी अमित ठाकरे यांनी गुरुवारी विविध महाविद्यालयांना भेट दिली. त्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत वेगवेगळ्या विषयांवर मोकळेपणाने मते मांडली.

अमित ठाकरे काय म्हणाले?

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभांना मोठी गर्दी होते. भाषणांना मोठी दाद मिळते आणि उपस्थित केल्या जाणाऱ्या विषयांना सर्वस्तरीय प्रतिसादही मिळतो; पण त्याचे परिवर्तन मतांमध्ये होत नाही, या विषयी अमित ठाकरे यांना छेडले असता ते म्हणाले, ‘हो, नाशिकसारख्या ठिकाणी जिथे काम केले तिथे यश मिळाले नाही म्हणून नक्कीच वाईट वाटते.’

‘आमच्याच लोकांनी फसवले’

“मुकणे धरणातून पाणी आणून ४० वर्षांपासूनचा प्रश्न मिटवला. जिथे-तिथे रस्ते केले. आता काम केलेल्या रस्त्यांच्याच निविदा काढल्या जात आहेत. पण आपण थांबलेलो नाही, काम सुरूच आहे आणि विकासावर भर दिला जात आहे. आम्ही इथेही स्थानिकांवर विश्वास ठेवला होता, पण आमच्याच लोकांनी फसवले”, असे अमित ठाकरे म्हणाले.

Maharashtra TimesMumbai Lady Don Sapna : दाऊदला मारण्याचा प्लॅन आखणारी द लेडी डॉन सपना दिदी कोण होती?

सत्ताधाऱ्यंनी राजकारण बिघडवल्याचा अमित ठाकरेंचा आरोप

“आता पुन्हा प्रयत्न सुरू केले आहेत आणि विकासावर कायम भर असणार आहेत. लोकांनीही हिंदू-मुस्लीम किती दिवस करायचे, याचा विचार केला पाहिजे. खरे म्हणजे भाजप एका तपापासून सत्तेवर असतानाही ‘हिंदू खतरे में है..’ असे भासवले जात असेल तर काय उपयोग? खरे म्हणजे सत्ताधाऱ्यांनी संपूर्ण राज्यातील राजकारण बिघडवून टाकले आहे”, असेही अमित ठाकरे म्हणाले.

‘विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेणार’

राज्यभरातील विद्यार्थ्यांचे प्रश्न, समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पुणे-मुंबईमध्येही स्वच्छतागृहापासून ते स्वच्छतेपर्यंतचे कितीतरी प्रश्न समोर येत आहेत. भरमसाठ शुल्कांचाही विषय आहेच. छत्रपती संभाजीनगर शहरातील समस्याही जाणून घेणार आहे व त्यासाठीच शहरात दाखल झालो आहे. त्याशिवाय मराठवाड्यातही दौरा करणार असून, प्रश्न जाणून घेणार असल्याचे ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान, अमित ठाकरे राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये जावून विद्यार्थ्यांची भेटीगाठी घेत आहेत.