संत साहित्यातला तसेच लोकसाहित्यातला वासुदेव मनाचा ठाव घेणारा. भाविकांना दिशा देणारा. सामान्यांना अंतर्मुख करणारा. गावखेड्यातील लोकपरंपरेत थेट काळजात पोचणारा. जाग आणणारा अन् टाहो फोडणारा. ‘दान पावलं…’ म्हणता म्हणता मनाची विशालता – तळमळ लख्ख लख्ख करणारा. सावळ्या रूपाला ‘मानसी नित्य राहो’ असा साद घालणारा हा वासुदेव पहाटपण साजिवंत करून शतकानुशतके काळवेळ पावन करत आलाय.
साध्या सोप्या, सरळ भाषेत जनमानस जागविले. विचार दिला. आचार दिला. तत्त्वज्ञान सांगितले. शहाणपण दिले. अवघ्या चिंता त्यागून संतपदी ध्यान असो ही वासुदेवाची आस आणि भावना. संत सज्जन – भाविकांच्या सहवासात चित्त असावे ही सोज्वळ भावना. भक्तियोग अक्षय टिकावा. अद्वैताची चाल हवी. द्वैतसंग तो टळो. निजरूपाचे – आत्मतत्त्वाचे दर्शन व्हावे, ही वासुदेवाच्या उपदेशाची उदात्त धारणा. सत् कथेचा श्रवणीय आनंद लाभावा. सदैव जीभेने नामसंकीर्तन, नाममंत्र वदावे. हेच ते दान पावणे आहे.
नामाचा टाहो आणि भगवंताचे चरण हेच दान अपेक्षित असणारा संत एकनाथ महाराजांचा वासुदेव, दोष भंग पावतील ही भविष्यवाणी कशी कथितो पहा –
मी वासुदेव नामे फोडितो नित्य टाहो।
देखिले पाय आता मागतो दान द्या हो।
एका जनार्दनी दोष जाती भंगा।।
नित्य वासुदेव स्मरण ही संतांची कलियुगातील शिकवण. विषयवासना, व्यर्थ संसार श्रम यांत अडकू, गुंतू नये ही वासुदेवाची हात जोडून कळकळीची विनवणी. तीन प्रहर टळूनही निजणाऱ्या जीवाला खडसावणारा तुकयाबंधू संत कान्होबा महाराजांचा वासुदेव देखील जागे होऊन दानाचा उपदेश करताना दिसतो.
पानफूल, फळ यथायोग्य ते अर्पावे असे आवाहन करणारा वासुदेव विन्मुख होऊ नये असेही आवर्जून बजावतो. दान-मान, त्याग, अर्पण समर्पण भाव हा खराखुरा वासुदेवाचा उपदेश. जागरुकता, सत्यवचन आणि सेवावृत्तीची सूचकता ही वासुदेवाची वाणी. क्रोध, संताप, लुबाडणूक, अभिलाषा या दुर्गुणांना वासुदेवाच्या वाणीत मुळीच थारा नाही!

