मुकुंदराजाचा सर्वपरिचित ग्रंथ म्हणजे ‘विवेकसिंधु’. त्याच्या पहिल्या प्रकरणात मुकुंदराज शंकराला नमन करून दुसऱ्याच ओवीत म्हणतात, ‘तूं निर्गुण निराकारु। निःसंगुनिर्विकारु।। तुझेया स्वरूपाचा पारु। नेणती ब्रह्मादिक।। म्हणजे तू गुणरहित, आकार नसलेला आणि विकाररहित आहेस. अशा या तुझ्या स्वरूपाचा पार म्हणजे अन्त, ब्रह्मादिकांनाही जाणता येत नाही’. मग त्याला जाणायचं कसं? मुकुंदराजसांगतात, ‘आत्मज्ञानामुळंच तुला जाणून घेता येतं’.
जाणत्यांनी, अभ्यासकांनी, साधकांनी सांगितल्याप्रमाणं आत्मज्ञान मिळवण्याची पहिली पायरी, त्याच्या सगुण रूपाचं अखंड स्मरण ठेवण्याची. हरिपाठामध्ये ज्ञानोबा माउली म्हणते, ‘हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा।। पुण्याची गणना कोण करी।।’ तोंडानं हरीचंच नाव घेत राहा. असं त्याचं सतत स्मरण करत राहिल्यानं पुण्याची इतकी पुंजी जमा होत राहील की ती मोजता यायची नाही. सुखाच्या मखमली दिवसांतही त्याची आठवण कायम ठेवा.
आपली अठरा पुराणंही हरीचंच गुणसंकीर्तन करतात, हे ध्यानात ठेवा… दुःखी, वेदनादायी, अपयशी दिवसांत हरी आठवतोच ना! पण अशा कठीण दिवसांतच नाही, तर प्रत्येक क्षणी हरीचं नाव घ्यायचं. प्रत्येक श्वास घेताना श्रीहरी, उच्छवास टाकतानाही श्रीहरी. खाताना, जेवताना, आंघोळ करताना, पाणी पिताना, अभ्यासाला सुरुवात करताना… श्रीहरीचं नाव घ्यायचं.
श्वासोच्छवास करणं जितकं सहजपणं होतं, तितकंच श्रीहरीचा आठव करणं व्हायला हवं. हे सारं फार कठीण आहे. मग काय करायचं? श्रीहरीची मूर्ती सतत नजरेसमोर ठेवायची. मनात अहोरात्र तेवती ठेवायची. मग हळूहळू ‘त्या’ची आठवण हा आपला सहजभाव होतो. तसा तो व्हायला किती दिवस लागतील? तर त्याचं काही गणित नाही. खुश्कीचा मार्ग नाही. मधला मार्ग आहे, असं सांगणारे असतातच. ते मोठाले शब्द वापरतात. भक्तांचे ताफे बाळगतात. अशांबद्दल एकनाथ महाराज सांगतात, ‘पोटी नाही परमार्थ। धरोनिया अर्थस्वार्थ। स्वये म्हणविती हरिभक्त। यानांवनिश्चित भजनदंभू।। धनजोडावयाकारणें। टिळेमाळामुद्रा धरणें। धनेच्छा उपदेश देणें। या नाव जाणणें दीक्षाभू।।…’

