Headlines

वारीच्या वेळी पूर्वज उपवासाला काय खायचे माहितीये? निसर्गमित्र राजेंद्र भट यांनी सांगितली रंजक माहिती जाणून घ्या रेसिपी – what to eat during wari fast try this traditional amaranth rajgira ladoo recipe


आषाढी वारीत उपवासाच्या काळात पूर्वज साधा, सात्त्विक आणि पौष्टिक आहार घेत असत. निसर्गमित्र राजेंद्र भट यांनी एका व्हिडिओमध्ये सांगितले की,उपवासात राजगिऱ्याचे लाडू, रताळे आणि केळे खाल्ल्याने दिवसभर ऊर्जा मिळते. जाणून घ्या पौष्टिक आणि चविष्ट राजगिऱ्याच्या लाडूची सोपी रेसिपी.

Traditional Rajgira Laddoo Recipe
फोटो सौजन्य :- @Sanjeev Kapoor Khazana, @iStock
आषाढी वारी म्हटली की डोळ्यांसमोर लाखो वारकऱ्यांचा विठ्ठलनामाचा गजर, पायी चालण्याचा प्रवास आणि साधी, सात्त्विक जीवनशैली उभी राहते. वारीदरम्यान अनेक वारकरी उपवास करतात. मात्र, पूर्वीच्या काळात उपवास म्हणजे फक्त पोटभर खाणे नव्हते, तर शरीराला ऊर्जा देणारा आणि सहज पचणारा आहार घेण्यावर भर दिला जात होता. निसर्गमित्र राजेंद्र भट यांनी त्यांच्या एका व्हिडिओमध्ये याच पारंपरिक उपवासाच्या आहाराविषयी रंजक माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, पूर्वज उपवासाच्या दिवशी राजगिऱ्याचे लाडू, रताळे आणि केळे खात असत. हे पदार्थ शरीराला आवश्यक पोषण देतात, दिवसभर ऊर्जा टिकवून ठेवतात आणि पायी चालण्याचा थकवाही कमी करण्यास मदत करतात.यामध्ये विशेष महत्त्व आहे ते राजगिऱ्याच्या लाडूंचे. राजगिरा हा प्रथिने, कॅल्शियम, लोह आणि फायबरचा उत्तम स्रोत मानला जातो. त्यामुळे उपवासात तो खाल्ल्यास बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते आणि शरीरालाही आवश्यक ऊर्जा मिळते. (फोटो सौजन्य :- @Sanjeev Kapoor Khazana, @iStock)

आषाढी वारी उपवासाची रेसिपी

साहित्य

साहित्य
  • ¾ कप बारीक चिरलेला गूळ
  • 2 कप राजगिऱ्याच्या लाह्या (Puffed Amaranth)
  • ½ कप भाजून जाडसर कुटलेले शेंगदाणे
  • ¼ टीस्पून वेलची पूड
  • 2-3 टेबलस्पून पाणी

उपवासासाठी राजगिऱ्याचे लाडू

उपवासासाठी राजगिऱ्याचे लाडू

सर्वप्रथम एका नॉन-स्टिक कढईत चिरलेला गूळ आणि 2 ते 3 टेबलस्पून पाणी घाला. कढई मंद आचेवर ठेवून गूळ सतत ढवळत राहा. साधारण 1 ते 2 मिनिटांत गूळ पूर्णपणे वितळून एकसंध पाक तयार होईल. गूळ जास्त वेळ शिजवू नका, अन्यथा पाक कडक होऊन लाडू वळणे कठीण होऊ शकते.यानंतर या गुळाच्या पाकात राजगिऱ्याच्या लाह्या घाला आणि मोठ्या चमच्याने किंवा स्पॅटुल्याच्या मदतीने चांगले मिसळा. प्रत्येक लाहीवर गुळाचा थर व्यवस्थित लागेल, याची काळजी घ्या.

लाडू कसे बनवावे

लाडू कसे बनवावे

आता त्यात भाजून जाडसर कुटलेले शेंगदाणे आणि वेलची पूड घाला. पुन्हा सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत हलक्या हाताने ढवळा. हे मिश्रण मंद आचेवर आणखी 2 मिनिटे शिजू द्या, जेणेकरून गूळ, राजगिरा आणि शेंगदाण्यांची चव एकमेकांत छान मुरेल.गॅस बंद केल्यानंतर मिश्रण पूर्ण थंड होऊ देऊ नका. ते कोमट आणि हाताळण्याइतके गरम असतानाच हाताला थोडे पाणी किंवा साजूक तूप लावा. मिश्रणाचा छोटा भाग हातात घेऊन हलक्या दाबाने मध्यम आकाराचे गोल लाडू वळा. जर मिश्रण थंड होऊन घट्ट झाले, तर ते पुन्हा काही सेकंद मंद आचेवर गरम करून लाडू वळू शकता. सर्व लाडू तयार झाल्यानंतर ते एका ताटात काढून पूर्णपणे थंड होऊ द्या. त्यानंतर हवाबंद डब्यात भरून ठेवा. हे पौष्टिक आणि चविष्ट राजगिऱ्याचे लाडू अनेक दिवस ताजे राहतात. उपवासाच्या दिवशी, वारीच्या प्रवासात किंवा संध्याकाळच्या हेल्दी स्नॅक म्हणून हे लाडू उत्तम पर्याय ठरतात.

उपवासात राजगिरा का खावा?

उपवासात राजगिरा का खावा?

राजगिरा हा पोषक धान्यांपैकी एक मानला जातो. त्यामध्ये प्रथिने, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फायबर मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते, हाडे मजबूत राहण्यास मदत होते आणि पचनक्रियाही सुरळीत राहते.उपवासाच्या दिवशी अनेकदा पटकन भूक लागते. मात्र राजगिऱ्याचे लाडू खाल्ल्याने बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे वारंवार काहीतरी खाण्याची गरज भासत नाही.

रताळे आणि केळ्याचे महत्त्व

रताळे आणि केळ्याचे महत्त्व

राजेंद्र भट यांनी सांगितल्याप्रमाणे, पूर्वीच्या काळात उपवासात रताळे आणि केळे यांचाही मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असे.रताळ्यामध्ये नैसर्गिक कार्बोहायड्रेट, फायबर आणि जीवनसत्त्व ‘अ’ भरपूर असते. त्यामुळे ते शरीराला हळूहळू ऊर्जा पुरवते.केळ्यामध्ये पोटॅशियम, नैसर्गिक साखर आणि इतर खनिजे असल्यामुळे चालण्यामुळे येणारा थकवा कमी होण्यास मदत होते. तसेच स्नायूंना आवश्यक ऊर्जा मिळते.

मृणाल पाटील

लेखकाबद्दलमृणाल पाटीलमृणाल पाटील या महाराष्ट्र टाइम्स.कॉममध्ये कार्यरत असलेल्या अनुभवी पत्रकार आणि डिजिटल कंटेंट रायटर असून मीडिया क्षेत्रात त्यांना 11 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. टेलिव्हिजन, डिजिटल मीडिया, प्रिंट पत्रकारिता आणि जनसंपर्क या विविध क्षेत्रांमध्ये काम करत त्यांनी विश्वसनीय,अभ्यासपूर्ण आणि वाचकाभिमुख लेखनाची भक्कम ओळख निर्माण केली आहे. मनोरंजन, लाइफस्टाईल, फिचर स्टोरीज, ट्रेंडिंग विषय आणि सेलिब्रिटी मुलाखती या विषयांवर सखोल माहिती देणारे लेखन हे त्यांचे प्रमुख कौशल्य आहे.

मृणाल यांनी ‘प्रहार’ वर्तमानपत्रामध्ये प्रवास आणि खाद्यसंस्कृती विषयावर साप्ताहिक लेखन केले आहे. विविध शहरांची संस्कृती, स्थानिक परंपरा आणि खाद्यवैशिष्ट्ये यावर आधारित त्यांच्या लेखांना वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ‘TV 9’ या प्रतिष्ठित न्यूज चॅनलसाठी त्यांनी अनेक नामांकित कलाकारांच्या मुलाखती घेतल्या असून मनोरंजन पत्रकारितेमध्ये त्यांनी भक्कम अनुभव मिळवला आहे. तसेच आकाशवाणी मुंबईसाठी ‘मन की बात’ या कार्यक्रमासाठी व्हॉइस ओव्हरचे काम करण्याचा अनुभव देखील त्यांच्या कार्यात महत्त्वपूर्ण ठरला आहे.

जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी 30 पेक्षा अधिक क्लायंट्सचे यशस्वीपणे व्यवस्थापन केले असून ब्रँड कम्युनिकेशन, कंटेंट स्ट्रॅटेजी आणि मीडिया समन्वय यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या महाराष्ट्र टाइम्समध्ये ट्रेंडिंग आणि लाईफस्टाईल विषयांवर संशोधनाधारित, अचूक आणि विश्वसनीय माहिती देणारे लेख लिहिणे ही त्यांची विशेष ओळख आहे. तथ्य पडताळणी, विश्वासार्ह स्रोतांचा वापर आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती सादर करण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

लेखनासोबतच वाचन आणि सोलो ट्रॅव्हलिंग ही त्यांची आवड असून विविध ठिकाणांच्या संस्कृती, जीवनशैली आणि सामाजिक रचनेचा अभ्यास करण्यामध्ये त्यांना विशेष रस आहे. व्यायाम, हॉलिवूड चित्रपट आणि नव्या तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळवणे हे देखील त्यांचे आवडते छंद आहेत. आपल्या अनुभव, संशोधन आणि निरीक्षणांच्या आधारे वाचकांना दर्जेदार, अचूक आणि विश्वासार्ह माहिती देण्याचा त्या सातत्याने प्रयत्न करतात.

शैक्षणिक पात्रता
मृणाल पाटील यांनी 2017-18 मध्ये मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) पदवी प्राप्त केली आहे. डिजिटल मीडिया ट्रेंड्स, बदलती वाचक प्रवृत्ती आणि माहिती सादरीकरणाच्या आधुनिक पद्धतींचा त्या सातत्याने अभ्यास करतात.आणखी वाचा