![]()
अक्कलकोट तालुक्यातील हंजगी-अक्कलकोटदरम्या न सध्या सुरत-चेन्नई महामार्गाचे काम गतीने सुरू आहे. या महामार्गावरील उड्डाणपुलाच्या कामासाठी हंजगी येथील पाझर तलावातून मोठ्या प्रमाणात मुरुमाचा उपसा केला जात आहे. मात्र, मुरुम वाहतूक करणाऱ्या अवजड गाड्यांमुळे
.
अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या अथक प्रयत्नांतून हंजगी-बागेहळ्ळी-अक्क लकोट रस्त्याला न्याय मिळून त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, सुरत-चेन्नई महामार्गासाठी मुरूम वाहतूक करणाऱ्या अवजड गाड्यांमुळे अवघ्या एका महिन्यातच हा रस्ता खराब झाला आहे. रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून, संपूर्ण रस्ता उखडल्याने पावसाळ्यात वाहनधारकांसह पायी जाणारे शेतकरी, महिला, शाळकरी विद्यार्थी आणि वयोवृद्ध नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
मुरूम वाहतूक करणाऱ्या अतिलोढ गाड्यांमुळे अपघातांचे प्रमाणही वाढले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या हंजगी-बागेहळ्ळी ग्रामस्थांनी सुरत-चेन्नई महामार्गाच्या कामासाठी मुरूम वाहतूक करणाऱ्या गाड्या रोखला. जोपर्यंत हंजगी- बागेहळ्ळी- अक्कलकोट रस्त्याचे पुन्हा डांबरीकरण केले जात नाही, तोपर्यंत मुरुमाच्या गाड्या बंद करण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे. हंजगी-बागेहळ्ळी रस्त्यासाठी यापूर्वी ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन करत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णयही घेतला होता. मोठ्या संघर्षानंतर या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. मात्र, सुरत-चेन्नई महामार्गासाठी धावणाऱ्या अतिलोढ गाड्यांमुळे हंजगी- बागेहळ्ळीकरांच ्या जखमेवर मीठ चोळले जात असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलिस यांना पूर्वी भेटूनही कारवाई नाही रस्त्याच्या प्रश्नी या पूर्वीही हंजगी-बागेहळ्ळी ग्रामस्थांच्या वतीने ग्रामसभेत ठराव घेऊन संबंधित जिल्हाधिकारी, तहसीलदार तसेच संबंधित दक्षिण पोलिस ठाण्याला निवेदन केले. मात्र, त्यानंतरही मुरुमाची वाहतूक सुरूच राहिल्याने आज हंजगी-बागेहळ्ळी ग्रामस्थांनी मुरूम वाहतूक करणाऱ्या बारा चाकी अवजड गाड्या रोखून तीव्र संताप व्यक्त केला. जोपर्यंत हंजगी-अक्कलकोट रस्त्याचे पुन्हा डांबरीकरण होत नाही, तोपर्यंत सुरत-चेन्नई महामार्गाच्या कामासाठी मुरुम वाहतूक करणाऱ्या गाड्यांना या मार्गावरून जाऊ दिले जाणार नाही, अशी भूमिका हंजगी-बागेहळ्ळी ग्रामस्थांनी घेतली आहे. आता याबाबत प्रशासन काय भूमिका घेणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
दिवसरात्र एक करून रस्त्यासाठी पाठपुरावा केला “दिवसरात्र एक करून हंजगी-बागेहळ्ळी रस्त्याला निधी मिळावा, यासाठी पाठपुरावा करून रस्ता डांबरीकरण करून घेतला आहे. मात्र, केवळ एका महिन्यातच हा रस्ता अतिशय खराब झाला आहे. याच मुरुमाच्या गाड्यांमुळे मी मरता-मरता वाचलो. या गाड्यांमुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. प्रथम हंजगी-बागेहळ्ळी रस्त्याचे डांबरीकरण करा आणि त्यानंतरच मुरुमाची वाहतूक सुरू करा.” -अप्पाराव ठाणेदार, शेतकरी, बागेहळ्ळी
