म.टा.प्रतिनिधी,ठाणे :वाहतूक नियमांच्या उल्लंघनप्रकरणी नागरिकांना तक्रार करण्यासाठी ठाणे वाहतूक शाखेने पोलिस आयुक्तालयामध्ये व्हॉट्सअॅप क्रमांक जारी केले आहेत. या क्रमांकावर आलेल्या तक्रारीची अगोदर पडताळणी केली जाईल. त्यानंतर कारवाई करण्यात येणार आहे.
१८ अधिकृत व्हॉट्सअॅप क्रमांक जारी
पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि पोलिस सहआयुक्त डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या आदेशानुसार हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.ठाणे पोलिस आयुक्तालयातील विविध वाहतूक उपविभागांसठी १८ अधिकृत व्हॉट्सअॅप क्रमांक जारी करण्यात आले आहेत. चुकीच्या दिशेने वाहन चालवणे, ट्रिपल सीट, फॅन्सी अथवा नियमबाह्य नंबर प्लेट, नो- पार्किंगमध्ये वाहन उभे करणे,डबल पार्किंग किंवा वाहतुकीस अडथळा निर्माण करणे, तसेच अन्य वाहतूक नियमांचे उल्लंघन आढळल्यास त्याची माहिती संबंधित वाहतूक उपविभागाच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवविता येणार आहे.
वाहनावर ई-चलानद्वारे कारवाई करण्यात येणार
प्राप्त तक्रारीतील छायाचित्रे आणि उपलब्ध माहितीच्या आधारे संबंधित पोलिस अधिकारी किंवा कर्मचारी तक्रारींची पडताळणी करतील.नियमभंग झाल्याचे स्पष्ट झाल्यास संबंधित वाहनावर ई-चलानद्वारे कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली.
आता नागरिकांचा कॅमेरा आणि पोलिसांची कारवाई या माध्यमातून नियमभंगकरणाऱ्यांवर तत्परतेने कारवाई होणार आहे. सुरक्षित ,आणि सुरळीत वाहतुकीसाठी नागरिकांनी सहकार्य करावे , असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी केले आहे.
सुस्पष्ट छायाचित्रे पाठवण्याचे आवाहन
मोबाइलद्वारे तक्रार करताना नागरिकांनी शक्यतो किमान तीन सुस्पष्ट छायाचित्रे पाठवावीत. विशेषत: वाहनाचा नोंदणी क्रमांक स्पष्ट दिसेल,अशा पद्धतीने फोटो काढण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. तक्रारीसोबत वाहन क्रमांक, घटनास्थळ आणि नेमका वाहतूक नियमभमग याची माहिती देणेही आवश्यक असल्याचे वाहतूक शाखेने स्पष्ट केले
लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.
कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.
महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.
२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.… आणखी वाचा