जुलैमधील पावसाचे ‘क्लायमेट ट्रेंड्स’तर्फे विश्लेषण करण्यात आले असून, देशातील ६० टक्के क्षेत्रामध्ये अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे. देशभरात जुलै महिन्यामध्ये सरासरी २८०.४ मिलीमीटर पाऊस पडतो. २६ जुलैपर्यंत उपलब्ध आकडेवारीनुसार केलेल्या विश्लेषणामध्ये १ ते २६ जुलैदरम्यान देशभरात २३८.२ मिलीमीटर पाऊस पडला. सर्वसाधारणपणे या कालावधीत २३३.९ मिलीमीटर पाऊस नोंदला जातो. त्यामुळे जुलैमध्ये सरासरीहून कमी पावसाचा अंदाज चुकल्याचे दिसते. जूनमध्ये ४० टक्क्यांपर्यंत पावसाची तूट होती. ही तूट ३० जुलैपर्यंत १५ टक्क्यांपर्यंत कमी झाली. सध्या भारतात होणाऱ्या पावसामागे दोन महत्त्वाचे घटक कारणीभूत आहेत.
जुलै २०२६ मध्ये ‘एल निनो’मुळे पावसावर होणारा नकारात्मक परिणाम भरून काढून, पश्चिम प्रशांत महासागरातील (फिलिपिन्सच्या पश्चिमेकडील) वाढते तापमान मान्सूनसाठी तारणहार ठरत आहे. आतापर्यंत, म्यानमारमार्गे तीन कमी दाबाच्या प्रणाली पुढे सरकल्या आहेत, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे माजी महासंचालक डॉ. के. जे. रमेश यांनी दिली. मान्सूनच्या काळात वाढलेल्या पश्चिमी प्रकोपामुळे अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणात आर्द्रता येत आहे, ज्यामुळे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे, असेही ते म्हणाले.
ठाणे, पालघर, रायगडला ऑरेंज अॅलर्ट
मध्य छत्तीसगडच्या पश्चिम भागावर आणि लगतच्या पूर्व मध्य प्रदेशावर असलेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र नैर्ऋत्य दिशेकडे सरकले आहे. आज, शुक्रवारी या क्षेत्रामुळे उत्तर मध्य महाराष्ट्र, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्याचा काही भाग तसेच नाशिक आणि पुणे घाट परिसरामध्ये पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. शुक्रवारी कोकण विभागात पालघर, ठाणे तसेच रायगड जिल्ह्याला ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. या काळात वाऱ्यांचा जोरही काही काळासाठी ७० किलोमीटर प्रति तास होऊ शकेल.
मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता
शहरात गुरुवारी पावसाने विश्रांती घेतली असली, तरी पुढील दोन दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर जोरदार, काही ठिकाणी अति जोरदार पावसाची शक्यता असल्याने भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) ‘रेड ॲलर्ट’ दिला आहे.
पुणे शहर आणि जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने तुरळक ठिकाणी आणि थोड्याच वेळासाठी हजेरी लावली. दिवसभर आकाशात ढग दाटून आले होते, जोरदार पावसाची चिन्हे होती. पण, संध्याकाळीच काही भागांत हलक्या सरी पडल्या. दुपारी जोराचे वारे वाहत असल्याने उकाडा जाणवला नाही. दिवसभरात कमाल २७.४ आणि किमान २३.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. जिल्ह्यात भोर, वेल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला; तर घाटात मध्यम आणि काही भागांत मुसळधार पाऊस पडला.
सध्या बंगालच्या उपसागरात अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, छत्तीसगड राज्यावर ते सक्रिय आहे. शुक्रवारपर्यंत हे क्षेत्र मध्य प्रदेशच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. त्याच्या प्रभावामुळे शनिवारपर्यंत राज्यात सर्वदूर पाऊस पडणार असल्याची शक्यता ‘आयएमडी’ने व्यक्त केली आहे. प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अधिक पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
मराठवाडा-विदर्भात जोरदार पाऊस
छत्तिसगड आणि परिसरातील बदलत्या हवामान प्रणालींमुळे महाराष्ट्रात जोरदार पाऊस सुरू आहे. विदर्भात गेल्या दोन दिवसांपासून विदर्भात पावसाने थैमान घातलं आहे. तसेच, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही मुसळधार पाऊस सुरू आहे. येत्या २४ तासांत ही स्थिती आणखी वाढण्याची शक्यता असून यवतमाळ जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, हिंगोली, परभणी आणि जालना जिल्ह्यांमध्येही रेड अलर्ट दिला असून पावसाचा जोर कायम राहणार आहे.

