Headlines

एनर्जी ड्रिंक्स खरेच एनर्जी देतात?| Maharashtra Times


डॉ. प्रीतम गायकवाड:
रात्रीचे दोन वाजले आहेत. परीक्षा अवघ्या काही तासांवर आली आहे. जागे राहण्यासाठी एक विद्यार्थी एनर्जी ड्रिंकचा कॅन उघडतो. जिममध्ये जाणारा तरुण व्यायामापूर्वी ते पितो, तर दिवसभराचे काम पूर्ण करण्यासाठी एखादा व्यावसायिक क्विक-कॉमर्स अॅपवरून एनर्जी ड्रिंक मागवतो. हल्ली थकवा घालवण्याचा हा एक झटपट उपाय बनला आहे. २०२६ मध्ये भारतातील एनर्जी ड्रिंकचा बाजार सुमारे ८२ कोटी अमेरिकी डॉलरपर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे. यावरून तरुणांमध्ये या पेयांचे वाढते आकर्षण दिसून येते.

एनर्जी ड्रिंक्सची सुरुवात लाइफस्टाइल उत्पादन म्हणून झाली नव्हती. १९६२ मध्ये जपानमध्ये थकवा कमी करण्यासाठी अशा प्रकारचे पेय प्रथम तयार करण्यात आले. आज मात्र खेळ, गेमिंग, अभ्यास, रात्रीच्या पार्ट्या आणि व्यग्र जीवनशैलीशी त्यांची सांगड घातली जाते. या पेयांचा संदेश स्पष्ट असतो, एक कॅन प्यायल्यावर तुम्ही अधिक ताजेतवाने आणि सक्रिय वाटू शकता. मात्र काही वेळ ताजेतवाने वाटणे म्हणजे शरीराला खरी ऊर्जा मिळणे नव्हे.

बहुतेक एनर्जी ड्रिंक्समध्ये कॅफीन, साखर, टॉरीन आणि ग्वाराना हे घटक असतात. यामधील कॅफीन हा मुख्य उत्तेजक घटक असून तो काही काळासाठी झोप किंवा थकव्याची भावना कमी करून सतर्कता वाढवतो. साखरेमुळे झटपट ऊर्जा मिळाल्यासारखे वाटते, पण ती लवकरच कमी होते. टॉरीन हा शरीरात नैसर्गिकरीत्या आढळणारा घटक असला तरी तो काही ऊर्जा वाढवणारा जादुई पदार्थ नाही. ग्वारानामध्येही कॅफीन असते, त्यामुळे एकूण कॅफीनचे प्रमाण लोकांच्या अपेक्षेपेक्षा जास्त असू शकते.

पूर्वी भारतात एनर्जी ड्रिंक्सचा वापर मुख्यतः ट्रकचालक, खेळाडू आणि जिममध्ये जाणारे लोक करत असत. आता मात्र त्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. किशोरवयीन मुले, महाविद्यालयीन विद्यार्थी, गेमर्स, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, नोकरदार आणि पार्टीला जाणारे लोकही नियमितपणे हे पेय घेतात. कमी किंमत, घरपोच सेवा, सोशल मीडियावरील प्रचार आणि आकर्षक जाहिराती यामुळे त्यांचा वापर शहरांबरोबरच लहान शहरांमध्येही वाढला आहे.

एकच एनर्जी ड्रिंक पिणे ही नेहमीच मोठी समस्या नसते. खरा धोका असतो दिवसभरात वेगवेगळ्या स्रोतांतून कॅफीनचे जास्त प्रमाणात शरीरात जाण्यात. एखादी व्यक्ती सकाळी चहा घेते, नंतर ऑफिसमध्ये कॉफी पिते, व्यायामापूर्वी प्री-वर्कआउट सप्लीमेंट घेते आणि रात्री एनर्जी ड्रिंकही पिते. बहुतांश लोक दिवसभरात किती कॅफीन घेतले याचा हिशोब ठेवत नाहीत, पण शरीरावर चहा, कॉफी, सप्लिमेंट्स किंवा एनर्जी ड्रिंक – कॅफीनचा स्रोत कोणताही असला तरी त्याचा एकत्रित परिणाम होतो.

एनर्जी ड्रिंक्समध्ये मद्य मिसळून पिण्याची सवयही अतिशय धोकादायक आहे. कॅफीनमुळे मद्यपानानंतर येणारी झोप काही प्रमाणात कमी वाटू शकते; पण त्यामुळे रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण कमी होत नाही. त्यामुळे व्यक्तीला आपण पूर्णपणे शुद्धीत आहोत असे वाटू शकते; परंतु निर्णयक्षमता, शरीराचा तोल आणि प्रतिक्रिया देण्याची क्षमता यावर मद्याचा परिणाम कायम राहतो. परिणामी अधिक मद्यपान, धोकादायक वर्तन, शरीरातील पाण्याची कमतरता, रक्तदाब वाढणे आणि हृदयाचे ठोके अनियमित होण्याचा धोका वाढतो. सध्या भारतात ‘एनर्जी ड्रिंक’साठी स्वतंत्र नियामक मानक नाही. कॅफीनयुक्त पेयांसाठी काही मर्यादा असल्या तरी लेबलिंग आणि जाहिरातींबाबत अजूनही चिंता आहे. ‘ऊर्जा वाढवते’ अशा दाव्यांवरही नियामकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. अशा दाव्यांमुळे लोकांना हे पेय अशक्तपणा किंवा थकवा दूर करणारे उपाय वाटू शकतात. प्रत्यक्षात थकवा हा झोपेचा अभाव, शरीरातील पाण्याची कमतरता, ताण, रक्ताल्पता किंवा इतर आजारांमुळेही असू शकतो.

अधिक प्रमाणातील कॅफीनचा हृदय आणि मेंदूवर विपरीत परिणाम होऊ शकतो. हृदयाचे ठोके वेगाने पडणे किंवा अनियमित होणे, छातीत अस्वस्थता, हात थरथरणे, घाम येणे, मळमळ, चक्कर येणे किंवा रक्तदाब वाढणे अशी लक्षणे दिसू शकतात. वेळेत उपचार न मिळाल्यास ही लक्षणे गंभीर होऊ शकतात आणि काही वेळा जीवघेणीही ठरू शकतात.

कॅफीनमुळे झोपेचा दर्जाही खालावतो. झोप कमी आणि नीट न झाल्याने दुसऱ्या दिवशी अधिक थकवा जाणवतो आणि पुन्हा एनर्जी ड्रिंक घेण्याची इच्छा होते. अशा प्रकारे एक दुष्टचक्र सुरू होते. झोपेच्या कमतरतेमुळे आलेला थकवा काही काळासाठी कॅफीन कमी करते, पण नंतर पुन्हा थकवा जाणवतो. हळूहळू शरीराला नेहमीसारखे काम करण्यासाठीही कॅफीनची गरज भासू लागते. नेहमीचे पेय मिळाले नाही तर डोकेदुखी, चिडचिड आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचण जाणवू शकते. फार मोठ्या प्रमाणात कॅफीन घेतल्यास क्वचित प्रसंगी फिट्स येणे किंवा हृदयाच्या ठोक्यांमध्ये गंभीर बिघाड होऊ शकतो.

लहान मुले आणि किशोरवयीन मुलांनी एनर्जी ड्रिंक्स टाळावीत. आधीच कमी झोप घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ही पेये समस्या अधिक वाढवू शकतात. उच्च रक्तदाब, चिंता, हृदयविकार, हृदयाचे अनियमित ठोके किंवा कुटुंबात अचानक हृदयविकाराचा इतिहास असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनीही यांचा नियमित वापर टाळावा.

निरोगी प्रौढांमध्ये अधूनमधून एनर्जी ड्रिंक घेणे रोजच्या सवयीइतके धोकादायक नसले तरी दिवसभरातील सर्व कॅफीनचा विचार करणे आवश्यक आहे. चहा, कॉफी, कोला, चॉकलेट, सप्लिमेंट्स आणि एनर्जी ड्रिंक्समधून मिळणारे कॅफीन एकत्र मोजले पाहिजे. कमी प्रमाणातील सर्व्हिंग निवडणे, लेबल वाचणे आणि एका दिवसात अनेक कॅफीनयुक्त पदार्थ टाळणे हे सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे आहे. एनर्जी ड्रिंक्स हे पाणी, अन्न किंवा झोपेचा पर्याय कधीच ठरू शकत नाहीत आणि त्यांचे मद्यासोबत सेवनही करू नये.

छातीत दुखणे, बेशुद्ध पडणे, हृदयाची तीव्र धडधड, गोंधळल्यासारखे वाटणे किंवा फिट्स येणे अशी लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावेत. ऊर्जा मिळवण्यासाठी घरगुती आणि अधिक आरोग्यदायी पर्याय उपलब्ध आहेत. लिंबूपाणी आणि नारळपाणी शरीराला पुरेसे पाणी व क्षार देतात. ताक हलके असून पचनासाठीही चांगले असते. आलं, लिंबू आणि मध घातलेला चहा सौम्य स्वरूपात ताजेतवाने वाटण्यास मदत करतो. बीटरूट-आवळ्याचा रस, खजूर आणि सुका मेवा यांमुळे अधिक टिकणारी ऊर्जा मिळू शकते.

खरी ऊर्जा ही पुरेशी झोप, संतुलित आहार, पुरेसे पाणी आणि नियमित हालचाल यांमधून मिळते. एनर्जी ड्रिंक काही काळासाठी थकवा दडपून टाकू शकते, पण शरीराला आवश्यक असलेली विश्रांती त्याने भरून निघत नाही. त्यामुळे थकवा का जाणवतो, हे समजून घेणे आणि त्यावर झोप, योग्य आहार व पुरेसे पाणी या माध्यमातून उपाय करणे हेच दीर्घकालीन आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे.

(लेखक आपत्कालीन वैद्यकीय शाखातज्ज्ञ आहेत.)

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत