Headlines

एन. रघुरामन यांचा कॉलम:नाती राखीच्या धाग्याप्रमाणे अपग्रेड होऊ शकतात




जेव्हा एखादे पंडित तुमचे हात धुवायला लावतात, हातावर अक्षता ठेवतात, मूठ बंद करायला सांगतात आणि मंत्रोच्चार करत तुमच्या मनगटावर लाल-पिवळा धागा बांधतात, तेव्हा ती 10 रुपयांच्या बदल्यात होणारा 2 मिनिटांचा केवळ एक विधी नसतो. ते त्या साध्या सुती धाग्याला एक अर्थ प्राप्त करून देत असतात. हा धागा या गोष्टीची आठवण करून देण्यासाठी असतो की तुम्ही एक आध्यात्मिक नाते स्वीकारले आहे. हा एक रिमाइंडर आहे की तुमचे कर्म, शब्द आणि विचार त्या गोष्टींपासून दूर राहावेत, ज्यांना शास्त्र अपवित्र मानते. हा एक प्रतीकात्मक रिमाइंडर आहे की जेव्हा तुम्ही ईश्वरावर श्रद्धा ठेवता, तेव्हा त्या श्रद्धेसोबत आपले अंतर्मन पवित्र ठेवण्याची जबाबदारीही येते. कदाचित याच कारणामुळे आपल्या परंपरांमध्ये धाग्याला इतके शक्तिशाली स्थान आहे. धागा केवळ मनगटाला बांधला जात नाही, तर तो भाविकाच्या आत्म्याला त्या धारणेसोबत बांधतो की जे आध्यात्मिक नाते त्याने स्वीकारले आहे, ते निभावण्यासाठी त्याला योग्यही राहायचे आहे. राखीदेखील हाच विचार एका वेगळ्या रूपात समोर आणते. जेव्हा एखादी बहीण भावाच्या मनगटावर धागा बांधते, तेव्हा ती केवळ सणाचा विधी पार पाडत नसते. ती प्रेम, जबाबदारी आणि आपलेपणाचे असे नाते विणत असते, जे धाग्याचा रंग उडाल्यानंतर आणि तो जीर्ण झाल्यानंतरही तिच्यासोबत राहील. धागा मग तो सुती, रेशमी, चांदीचा किंवा सोन्याचा का असेना- जसे की आजकाल पाहायला मिळते- पण त्याची खरी किंमत त्या दोन व्यक्तींमध्ये निर्माण झालेल्या अदृश्य नात्यात असते. मित्रांकडून ऐकलेल्या गोष्टींचा विचार केल्यास, किमान लखनऊमध्ये तरी या धाग्यामध्ये मौल्यवान बदल होत आहेत. यंदा शहरातील बाजारांमध्ये एक विशेष बदल दिसत आहे. बाजारात साध्या सुती धाग्यांच्या आणि कार्टून राख्यांपासून ते सोने, चांदी, हिरेजडित राख्या, म्युझिकल बँड, पर्सनलाइज्ड ब्रेसलेट, बहिणींसाठी लुंबा आणि झाडांवर बांधल्या जाणाऱ्या राख्यांपर्यंत सर्व काही उपलब्ध आहे. जो कधीकाळी एका छोट्याशा विधीचा धागा असायचा, तो आता आपलेपणा, स्वतंत्र ओळख आणि बदलती कौटुंबिक नाती व्यक्त करण्याचे माध्यम बनला आहे. ज्याप्रमाणे एक बहीण आपले प्रेम अधिक कल्पक, मौल्यवान आणि व्यक्तिगत पद्धतीने व्यक्त करत आहे, कदाचित त्याचप्रमाणे तिच्याप्रती जिव्हाळा व्यक्त करण्याच्या आपल्या पद्धतीतही बदल करण्याची गरज आहे. या रक्षाबंधनाला तिला अशी एखादी भेट का देऊ नये, जी मिठाई संपल्यानंतर आणि फोटो विसरले गेल्यानंतरही बऱ्याच काळापर्यंत तिचे रक्षण करेल? ही एखादी मेडिकल इन्शुरन्स पॉलिसी असू शकते, जी गंभीर आजाराच्या परिस्थितीत तिच्या कुटुंबाचे लाखो रुपये वाचवेल. ती कधी आजारी पडावी असे आपल्यापैकी कोणालाच वाटत नाही, पण जबाबदार प्रेमाने यासाठी तयार राहणे आवश्यक आहे. हा तिच्या नावावर केलेला एखादा गुंतवणूक पर्याय असू शकतो. तिच्या रिटायरमेंट फंडमध्ये दिलेले योगदान असू शकते. त्या प्रोफेशनल कोर्सची फी असू शकते, जो तिने कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे पुढे ढकलला होता. त्या स्वप्नासाठी राखून ठेवलेली रक्कम असू शकते, जे तिने इतरांच्या अधिक महत्त्वाच्या गरजांसाठी गुपचूप सोडून दिले होते. काही कुटुंबे अशा खबरदारीच्या गुंतवणुकीवर विश्वास ठेवत नसतील, कारण ते पारंपरिक बचतीसारखे दिसत नाहीत. उदाहरणार्थ, इन्शुरन्स अशी एक गोष्ट वाटू शकते, ज्यावर आपण असा पैसा खर्च करत आहोत, जो वापरण्याची वेळ कधीच येऊ नये, अशी आपली अपेक्षा असते, पण यातच त्याचे सौंदर्य दडलेले आहे. कधी कधी सर्वात चांगली भेट तीच असते, जिचा वापर करण्याची गरज भेट स्वीकारणाऱ्याला कधीच पडू नये, अशी आपण प्रार्थना करतो. एक भाऊ असे म्हणू शकतो की, ‘या वर्षी मी तुला फक्त माझी आठवण देत नाहीये, तर अशी एक सोबतही देत आहे, जी मी दूर असलो तरी तुझ्या पाठीशी राहील.’ फंडा हा आहे की, आज जेव्हा बहीण तुमच्या मनगटावर धागा बांधेल, तेव्हा लक्षात ठेवा की याचा संदेश नेहमी हाच राहिला आहे की, ‘तू माझ्यासाठी महत्त्वाची आहेस.’ आजच्या जगात कदाचित या संदेशाला एका मौल्यवान बदलाची गरज आहे की, ‘तू माझ्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त महत्त्वाची आहेस आणि मी असे काहीतरी करेन, ज्यामुळे तुझा उद्या अधिक सुरक्षित, आनंदी आणि भक्कम होईल.’



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत