कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) झपाट्याने वाढणारा वापर अनेक क्षेत्रांतील रोजगारांवर परिणाम करत असून, ग्राहकांची क्रयशक्ती घटल्यास अर्थव्यवस्थेतील मागणी आणि विकासालाही फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

रोजगारांत मानवाची जागा घेणारे ‘एआय’ स्वत: ‘मानव’ नाही. त्याला मानवासारख्या गरजा नाहीत; ते खात-पित नाही, कपडे घेत नाही, वाहन वापरत नाही, घर घेत नाही, खरेदीसाठी बाजारात वा मॉलमध्ये जात नाही. त्यामुळे ते ग्राहक नाही! रोजगार असलेले लोक आपल्या कमाईचा मोठा वाटा वेगवेगळ्या प्रकारच्या खरेदीसाठी वापरत असतात. त्यांचे काम ‘एआय’ करू लागल्याने आणि त्यांना अन्य रोजगार न मिळाल्याने ग्राहक म्हणून त्यांची क्षमता काही प्रमाणात कमी होणार, यात शंका नाही. विविध क्षेत्रांत सध्या ‘एआय’चा वाढत असलेला वापर आणि भविष्यातील त्याची आणखी वाढणारी क्षमता पाहता, प्रचलित रोजगारांत मोठ्या प्रमाणावर कपात होण्याची शक्यता अधिक आहे.
प्रत्येक नवीन तंत्रज्ञान आधीच्या तंत्रज्ञानापेक्षा अधिक गतीने लोकांपर्यंत पोहोचत असते. कम्प्युटर विकसित झाल्यानंतर तो सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी ३० ते ३५ वर्षे लागली. जगातील वीस टक्के लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ‘पर्सनल कम्प्युटर’ला पंधरा वर्षे, स्मार्ट फोनला चार ते पाच वर्षे आणि इंटरनेटला दोन वर्षे लागली. या उलट पहिल्या दोन वर्षांतच ‘एआय’ ४० टक्के लोकांपर्यंत पोहोचले आहे. थोडक्यात, अन्य कोणत्याही तंत्रज्ञानाच्या प्रसारापेक्षा ‘एआय’चा प्रसार अधिक गतीने होतोय. अडीच वर्षांपूर्वी ‘एआय’कडे लोक कुतूहल म्हणून पाहत; ‘हे तंत्रज्ञान चांगले असले, तरी मानवासारखे काम करू शकेल काय,’ अशी साशंकता व्यक्त करीत. मात्र, ‘ग्लोबल एआय डिफ्युजन रिपोर्ट’च्या २०२६च्या अहवालानुसार, सध्या जगात एक अब्जाहून अधिक लोक ‘एआय टूल्स’चा वापर करीत आहेत. स्मार्ट फोन, समाज माध्यमे आदींचा विचार करता वापरणाऱ्यांची संख्या दीड अब्जांहून अधिक जाते. हा वापर केवळ ‘एआय’शी गप्पा मारणे किंवा त्याच्याकडून माहिती घेणे यांपुरता मर्यादित नाही, तर अनेक जण आपल्या व्यवसायाला अनुकूल असे ‘एआय’ प्रारूप विकसित करण्यासाठी होत आहे. पुढील पाच वर्षांत ‘एआय टूल्स’ वापरणाऱ्यांची संख्या तीन अब्जांच्या घरात जाण्याचा अंदाज आहे.
‘एआय’चा हा वाढता वापर अनेक क्षेत्रांतील रोजगाराच्या मुळावर येत आहे. जागतिक स्तरावर तंत्रज्ञान कंपन्यांनी ‘एआय’साठी केलेल्या फेररचनांत गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत दीड ते दोन लाख नोकऱ्या गेल्याची आकडेवारी आहे. भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रावरील परिणामही ठळकपणे दिसत असून, २०२५-२६ या काळात ४० हजार रोजगार गेल्याचे सांगितले जाते. नजीकच्या भविष्यात ‘एआय’मुळे आणखी मोठ्या प्रमाणावर रोजगारकपात होण्याचा इशारा ‘गोल्डमन सॅक्स’, ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’, ‘मॅकेन्झी’ आदी संस्थांनी दिला असून, काही नव्या रोजगारांच्या निर्मितीची शक्यताही वर्तविली आहे. मात्र, ‘एआय’ रोजगाराच्या मुळावर येत आहे, हे कटू सत्य आहे. या पार्श्वभूमीवर ‘उत्पादन, रोजगार, वेतन, खरेदी (मागणी), पुन्हा उत्पादन’ हे पारंपरिक अर्थचक्र धोक्यात येण्याची आणि त्यामुळे मंदी निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. ती प्रत्यक्षात येऊ नये यासाठी ‘एआय’च्या वापराला मानवी चेहरा देण्याची, नवीन रोजगार निर्माण होण्याची आणि कल्पक उपायांची गरज आहे.
Shridhar.Loni@timesofindia.com

