Headlines

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांची बोट उलटली; 15 जणांचा करुण अंत, उंच उसळणाऱ्या लाटांमुळे घात?


Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांच्या बोटीला भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत १५ जणांचा करुण शेवट झाला असून २१ जणांना वाचवण्यात यश आलं आहे.

vietnam boat accident
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
हनोई: व्हिएतनामच्या फू क्वोक बेटाजवळ शनिवारी भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट समुद्रात उलटली. या भीषण दुर्घटनेत १५ भारतीयांचा मृत्यू झाला आहे. तर २१ जणांना सुरक्षित वाचवण्यात यश आलं आहे. अपघातानंतर स्थानिक प्रशासनानं तातडीनं मदत आणि बचाव कार्य सुरू केलं. सध्या भारतीय दूतावास संपूर्ण घटनाक्रमावर लक्ष ठेवून आहे. स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. दुर्घटनेचा फटका बसलेल्या कुटुंबांच्या मदतीसाठी हो ची मिन्ह शहर सिटी आणि हनोईत आपत्कालीन केंद्र तयार करण्यात आलं आहे.

रॉयटर्स वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, दुर्घटनाग्रस्त बोटीत एकूण ३६ जण होते. यात ३२ भारतीय पर्यटक, ३ क्रू मेंबर आणि १ अटेंडंटचा समावेश होता. दुर्घटनेत १५ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला असून २१ जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे.
Maharashtra TimesPhu Quoc Island Accident : व्हिएतनाममध्ये 15 भारतीय पर्यटकांचा बुडून मृत्यू, फु क्वोक बेटाजवळ स्पीडबोट उलटून दुर्घटना
स्थानिक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, दुर्घटनाग्रस्त झालेली बोट बंदराच्या दिशेनं परतत होती. त्यावेळी किनाऱ्यापासून ४०० मीटर दूरवर समुद्रात बोट उलटली. त्यावेळी समुद्रात उंच लाटा उसळत होत्या. याच कारणामुळे अपघात झाला. अपघातामागील नेमक्या कारणांचा शोध अद्याप सुरू आहे. फू क्वोक व्हिएतनाममधील सर्वात मोठं बेट आहे. गेल्या काही वर्षांमध्ये या बेटावर भारतीय पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. हे बेट भारतीय पर्यटकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या संख्येनं भारतीय पर्यटक सुट्ट्या घालवण्यासाठी येतात.
Maharashtra TimesSpain Fire: कारमध्ये बसलेल्या पर्यटकांचा होरपळून शेवट; भीषण वणव्यात 12 जणांचा अंत, 23 जण बेपत्ता
अपघाताची माहिती मिळताच व्हिएतनाममधील भारतीय दूतावासानं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली. ‘एक अतिशय दु:खद घटना घडली आहे. काही तासांपूर्वी व्हिएतनामच्या फू क्वोक बेटाजवळ अनेक भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली. अपघातामागील नेमक्या कारणांचा शोध घेतला जात आहे. स्थानिक अधिकाऱ्यांकडून शोध मोहीम राबवली जात आहे. बचाव अभियान सुरू आहे,’ अशी माहिती व्हिएतनाममधील भारतीय दूतावासाकडून देण्यात आली.

बोट उलटताच स्थानिक प्रशासनानं तातडीनं मदत कार्य सुरू केलं. पाण्यात बुडणाऱ्यांची सुरक्षित सुटका करण्यासाठी बचाव पथकांनी धाव घेतली. सध्याच्या घडीला मदत कार्य पूर्ण वेगात सुरू आहे. बचाव अभियान पूर्ण करण्याला प्राधान्य देण्यात आलं असून त्याच सुमारास पीडितांना सर्वेतोपरी मदत दिली जात आहे.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.

पत्रकारितेतील अनुभव
बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.

मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.

‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.

टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.

लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.

लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.

२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.

शैक्षणिक पात्रता
कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.आणखी वाचा