Headlines

Uddhav Thackeray Reaction on Flight Journey With Devendra Fadnavis


उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या विमान प्रवासावर भाष्य केलं. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबई ते नागपूर असा एकाच विमानाने प्रवास केला. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. पण हा योगायोग असल्याचं दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केलं. या प्रवासाविषयी भाष्य करताना उद्धव ठाकरेंनी नवा दावा केला आहे.

Uddhav Thackeray
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पु्न्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या विमान प्रवासावर भाष्य करताना नवा दावा केला आहे. दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकाच विमानातून प्रवास केला होता. या विमानात दोन्ही नेते आजूबाजूला बसले नसले तरी एकाच रांगेत बसले होते. दोघांच्या विमान प्रवासावरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या याच विमान प्रवासाबाबत भाष्य करत असताना आपल्याला त्यांच्यातील हतबलता दिसली, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

“काल-परवा माझ्यासोबत तिकडे विमानात बसले होते. पण हतबल होते. कळतच नव्हतं की, हे मुख्यमंत्री आहेत, असे काय झाले आहेत? आत्मविश्वास पूर्णपणे गमावलेला हा माणूस. कारण त्यांना कळतंय, आपले पंख कापत आहेत आणि कापणारे आपलेच बॉस आहेत”, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला.

“आपण करायचं काय? आणि न्याय तरी कुणाकडे मागायचा? कोणतं दार ठोकायचं? कारण ते दार उघडलं तर पंख कापणार. हे दार उघडलं तरी पंख कापणार. मग जे काही वाचलं आहे. ते वाचवून, जेवढी दिवस आहेत तेवढे दिवस ढकललेले बरे, या परिस्थितीत देवेंद्र फडणवीस आहेत”, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांचं प्रत्युत्तर

“माझी सवय आहे की, मी विमानात बसलो की, माझ्या मोबाईलवर मी काहीना काही डाऊनलोड केलेले असते. एखादा सिनेमा असतो किंवा OTT वरील वेब सीरिज असते, मी ते पाहतो. त्यामुळे सुरु झाल्यापासून ते नागपूरला उतरेपर्यंत मी ते पाहत होतो. त्यामुळे माझी हतबलता त्यांना नेमकी कुठे दिसली?” असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.

“दुसरी गोष्ट म्हणजे मी मनुष्य असल्याने मला पंखच नाहीयत. माझे पंख कोण छाटणार आहे?”, असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. “काही काळजी करु नका. उद्धवजींच्या सदिच्छा या मी स्वीकारतो”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

‘आजूबाजूला बसलो असतो तरी गप्पा मारल्या असत्या’

“सर्व्हिस फ्लाईटमध्ये ज्यात कोणीही बसू शकतं, अशा फ्लाईटमध्ये योगायोगाने आम्ही एकत्रित आल्यानंतर जितक्या चर्चा झाल्या, त्या चर्चा बघितल्यानंतर वाटते की, आपण राजकीय व्यवस्थेत आहोत की वेड्यांच्या बाजारात आहोत? असा प्रश्न पडावा. पण काही हरकत नाही. समजा आम्ही आजूबाजूला असतो तर गप्पा मारल्या असत्या, त्याला काय अडचण आहे?”, असंदेखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा