Headlines

Sonam Wangchuk: भयसूचक संवादहीनता – sonam wangchuk hunger strike special explained


वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील (नीट) पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले ज्येष्ठ शिक्षण व पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केल्यानंतर हे आंदोलन निवळणार की आणखी चिघळणार, असा प्रश्न उभा राहिला आहे.

संसदेच्या अधिवेशनात ‘नीट’ घोटाळा आणि प्रधान यांच्या राजीनाम्यावरून गदारोळाची चिन्हे आहेत. त्याबरोबरच संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारामध्ये प्रधान यांचे खाते वा मंत्रिपदाचे काय होणार, हेही कळेलच. मात्र, यापूर्वीच्या अनेक आंदोलनांप्रमाणेच चर्चेची दारे बंद करून आंदोलनकर्त्यांकडे ढुंकूनही न पाहण्याचा सरकारचा पवित्रा आणि एकाच मागणीसाठी लढणाऱ्या विरोधकांमध्येच परस्पर संशयातून झालेले आरोप-प्रत्यारोप यातून समोर आले. मतभेदाच्या मुद्द्यांवर तोंडावर बोट ठेवण्याच्या नव्या संस्कृतीने गल्ली ते दिल्ली हातपाय पसरल्याची जाणीवही या निमित्ताने पुन्हा झाली. नव्या पिढीच्या मानसिकतेची दखल घेऊन ‘जंतर मंतर’पर्यंतचे अंतर सरकारला पार करता येऊ नये, ही संवादहीनता लोकशाहीसाठी भयसूचक आहे.

‘नीट’ पेपरफुटीबाबत काँग्रेससह विरोधी पक्षांनी रान उठवले; नव्याने स्थापन झालेल्या ‘कॉक्रोच जनता पक्षा’ने याच मागण्यांसाठी धरणे धरले. या पक्षाचे सहानुभूतीदार असलेले वांगचुक यांनी तेथेच बेमुदत उपोषण सुरू केले. मात्र, ‘कोणाच्याही राजीनाम्यासारख्या मागण्यांना आम्ही बधणार नाही,’ हा सत्ताधाऱ्यांचा अहं याहीवेळी संवादहीनतेला कारणीभूत ठरला आहे. आंदोलनकर्त्यांकडे शक्यतोवर दुर्लक्ष आणि जोडीनेच त्यांना ‘आंदोलनजीवी’ किंवा ‘देशविरोधी’ म्हणून हिणवणे, अशी हातोटी त्यांनी शेतकरी आंदोलन किंवा ‘सीएए-एनआरसी’ विरोधातील आंदोलनातही वापरली होती; त्याचेच प्रत्यंतर या वेळीही आले. २० दिवस या उपोषणावरून पुरेशी चर्चाही झाली नाही आणि दबावही उभा राहिला नाही.

समाजमाध्यमांच्या व्यासपीठावर ताकद दाखवणारा ‘सीजेपी’ आंदोलनाच्या तंत्रात अननुभवी ठरला. दुसरीकडे ‘सीजेपी’चे संस्थापक अभिजित दीपके यांनी पूर्वी आम आदमी पक्षासाठी काम करताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीकेमुळे काँग्रेसही या आंदोलनापासून काहीसा फटकून राहिला; उलटपक्षी ‘काँग्रेसच्या आंदोलनावरून लक्ष हटवण्याचा हा डाव आहे,’ अशीही टीका सुरू झाली. अखेरीस वांगचुक यांच्या प्रकृतीविषयी चिंतेची स्थिती निर्माण झाल्यानंतर काँग्रेससह अन्य विरोधकांनी उपोषणस्थळी येऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला. आंदोलन हाताबाहेर जाण्याची चिन्हे दिसू लागताच दिल्लीच्या पोलिस आयुक्तांची तडकाफडकी बदली झाली आणि नव्या आयुक्तांनी पहिल्याच फटक्यात वांगचुक यांना रुग्णालयात दाखल करण्याची ‘कामगिरी’ पार पाडली. सातत्याने माध्यमे-समाजमाध्यमांतून दिसून येणारा रोष थोपवण्याचा सरकारचा हा प्रयत्न दिसतो.

‘नीट’ घोटाळ्याचा मुद्दा प्रामुख्याने सुशिक्षित, मध्यमवर्ग-उच्च मध्यमवर्गातील लाखो घरांतील आकांक्षा असलेल्या तरुणांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. ‘जंतर मंतर’च्या आंदोलनात ठळकपणे दिसलेल्या तरुणाईच्या भावना सरकारपर्यंत पोहोचल्या असतीलच. दुसरीकडे अयोध्येतील श्रीराम मंदिरातील दानपेटीतील चोरी-अपहाराचा मुद्दाही लाखो रामभक्तांच्या श्रद्धेचा विषय आहे. हे दोन्ही घटक सत्ताधारी पक्षाचे खंदे समर्थक आहेत. त्यामुळेच ‘सीजेपी’ किंवा विरोधकांबाबत सरकारचा पवित्रा काहीही असला, तरी या पाठीराख्यांची नाराजी ओढवून घेणे सत्ताधाऱ्यांना परवडणारे नाही.

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकांमुळे काँग्रेस आणि समाजवादी पक्षानेही अयोध्येच्या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळेच हे दोन्ही विषय सरकारला सहजी झटकून टाकता येणार नाहीत. गेल्या अधिवेशनात माघारी घेतलेले मतदारसंघ फेररचनेचे विधेयक यंदा पुन्हा येण्याची शक्यता आहे. त्यावरूनही सरकार संवादाचा मार्ग अवलंबणार, की फोडाफोडीचा; हे स्पष्ट होईल. त्याबाबत काँग्रेसवर रागावलेला द्रविड मुन्नेत्र कळघम आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचे सध्या तरी दोन्ही डगरींवर पाय दिसतात. त्यांनी सरकारपक्षाला साथ दिल्यास विरोधकांच्या आघाडीला मोठा धक्का बसेल. या साऱ्या घटनाक्रमातून अधिवेशनातील वादळाचीच चाहूल लागली आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत