Headlines

Onion Buffer Stock : दोन महिन्यांत कांद्याचे दर २० रुपयांवरुन ६० रुपये किलो;बफर स्टॉक असूनही कांदा महाग ,लागवड उत्पादन वाढूनही यंदा टंचाई


Onion Buffer Stock:उष्णतेतील चढ- उतार आणि मुसळधार पाऊस यांचा परिणाम आणि कांद्याचा पुरवठा याचा परिणाम कांद्याचा किंमतीवर होत आहे. सरकारी यंत्रणांनाही कांदा खरेदी करण्याचे उद्दिष्ट गाठण्यात अपयश आल्यामुळे यंदा उत्पादन वाढूनही बाजारात टंचाई निर्माण झाली आहे.

बफर स्टॉक असूनही कांदा महाग
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.प्रतिनिधी,नाशिक :मुसळधार पाऊस, उष्णतेतील चढ-उतार आणि पुरवठा साखळीतील तफावतीमुळे दोन महिन्यांत कांद्याचे दर सरासरी २० रुपयांवरून ६० रुपये किलोपर्यंत गेले आहेत. सरकारी यंत्रणांनाही कांदा खरेदी करण्याचे उद्दिष्ट गाठण्यात अपयश आल्यामुळू यंदा उत्पादन वाढूनही बाजारात टंचाई निर्माण झाली आहे. खरिपाचा कांदा बाजारात येईपर्यंत म्हणजे आणखी अडीच-तीन महिने तरी ग्राहकांना कांदा चढ्या दराने खरेदी करावा लागणार आहे.

साडेसहा लाख हेक्टरवर कांदा लागवड झाली.

राज्यात रब्बी हंगामात साडेपाच लाख हेक्टरवर उन्हाळ कांद्याची लागवड होते. वर्ष २०२५-२६मध्ये त्यात वाढ होऊन सुमारे साडेसहा लाख हेक्टरवर कांदा लागवड झाली. देशात अंदाजे ३०७ लाख टन कांदा उत्पादन झाले. देशाची गरज २०४ लाख टन असताना, सुमारे एक कोटी टन कांदा अतिरिक्त होता. मात्र, साठवलेल्या कांद्यापैकी ३५ ते ४० टक्के कांदा अतिउष्णतेमुळे खराब झाल्याचा अंदाज आहे.

देशात पुरेसा कांदा उपलब्ध असतानाही टंचाई

यंदा बांगलादेशला कांदा निर्यात होऊ शकली नाही. मध्य पूर्वेतील युद्धामुळेही निर्यातीत अडचणी आल्या. यामुळे देशात पुरेसा कांदा उपलब्ध असतानाही टंचाई निर्माण होऊन साठेबाजीचा संशय बळावला आहे. मार्च-एप्रिल महिन्यात सरासरी ८०० रुपये प्रतिक्विंटल दराने विकल्या जाणाऱ्या कांद्याचे दर तीनच महिन्यांत साडेचार हजारांवर पोहोचले आहेत.

मध्य प्रदेश, कर्नाटकातही नुकसान

जुलै ते सप्टेंबर या काळात नवीन कांदा बाजारात येत नसल्याने कांद्याचे दर चढेच असतात. सणासुदीमुळे वाढलेली मागणी, हवामानाशी संबंधित अडथळे, पुरवठा साखळीतील हालचाली या बाबींचा कांदा दरावर परिणाम झाला आहे. पाऊस लांबल्याने जुलै महिन्यात खरीप कांदा लागवड अल्प प्रमाणात झाली आहे.

यामुळे उत्पादनावर परिणाम होऊन आणखी तीन महिने कांदा दर कमी होण्याची शक्यता धूसर आहे. देशात सुमारे २५ राज्यांत कांदा उत्पादन होत असले, तरी प्रमुख उत्पादक महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, कर्नाटक या राज्यांतही कांदा रोपे खराब झाल्याने देशांतर्गत पुरवठ्यावर परिणाम होणार आहे.

खरेदीची टाळाटाळ नडली

मार्च-एप्रिलमध्ये कांद्याचे दर घसरल्याने केंद्राने नाफेड,‘एनसीसीएफ’मार्फत दोन लाख टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी खरेदी दरात वेळोवेळी वाढ करीत १२ रुपयांपासून २१ रुपयांपर्यंत दर वाढवले. मात्र, जून महिन्यापासून कांदा दरात वाढ होत गेल्याने या संस्थांनी १.२१ लाख टन कांदा खरेदी केला.

Maharashtra TimesNepal Flood: साताऱ्यातील १० महिला पर्यटक नेपाळमध्ये अडकल्या; शिंदेंच्या निकटवर्तीय नेत्याचाही समावेश, हॉटेलमधून काय माहिती दिली?

कांदा खरेदीचे उद्दिष्ट या संस्था गाठू शकल्या नाहीत

दोन लाख टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट या संस्था गाठू शकल्या नाहीत. खरेदी केलेल्या कांद्यापैकी किती खराब झाला, याची आकडेवारी उपलब्ध नाही. सध्या नाफेडकडे ५५ हजार टनांपेक्षा कमी कांद्याचा बफर स्टॉक आहे, तर ‘एनसीसीएफ’कडे सुमारे ६२ हजार टनांचा बफर स्टॉक आहे. हा कांदा बाजारात आणून ग्राहकांना दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

Maharashtra TimesNagpur Airport :फडणवीसांनी टार्गेट दिलं, पण नागपूर विमानतळाच्या महत्त्वाच्या प्रस्तावांना अद्याप मंजुरीच नाही

महानगरांना सर्वाधिक झळ

कांदा दरवाढीची सर्वाधिक झळ मोठ्या शहरांना बसत आहे. तेथे प्रतिकिलो दर ६० रुपयांवर गेले आहेत. चेन्नई, कोलकात्यात ६० रुपये, दिल्लीत ५५, तर मुंबईतही कांद्याचे दर प्रतिकिलो ५० रुपयांच्या पुढे गेले आहेत. या शहरांमध्ये आता नाफेड, एनसीसीएफ, केंद्रीय भांडार आणि मोबाइल व्हॅनच्या माध्यमातून ३५ रुपये प्रतिकिलो दराने कांदा विक्री केला जाणार आहे.

कांचन परुळेकर

लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.

कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.

२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.आणखी वाचा