Nashik Trimbakeshwar Simhastha Kumbh Mela : जागोजागी खोदलेले रस्ते दोन महिन्यांपासून तसेच पडले आहेत. रस्ते खोदतांना जलवाहिन्या आणि मलजलवाहिन्या फुटल्याने सर्वत्र निर्माण झालेला चिखल आणि दुर्गंधी यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. रहदारीसाठी रस्ते बंद झाल्याने व्यावसायिकांना आपली दुकाने बंद ठेवण्याची वेळ आली आहे. तेथील कामगारांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. नागरिकांना नित्य व्यवहार करताना चक्रव्यूह पार करावे लागत असल्याचे दिव्य करावे लागत आहे.

पाण्याअभावी हवालदिल
अधिकमास रविवारी (दि. १४) संपतो आहे म्हणून शहरात दाखल होणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय होती. निवासी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी होती. तथापि त्यांना लॉजिंग सुविधा देणारे वीज आणि पाण्याअभावी हवालदिल झाले आहेत. टँकरने पाणी आणले तर ते छतावरच्या टाकीत पोहचवण्यासाठी वीज नसते. खाद्य पदार्थ विक्रेत्यांना रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावे लागणारे पदार्थ टिकवायचे कसे असा प्रश्न पडला आहे. आइस्क्रिमसारख्या पदार्थांची विक्री थांबली आहे. शहरातील खोदलेल्या रस्त्यांनी भूमिगत वीजवाहक तारा तुटतात तसेच जलवाहिन्या फुटतात त्यामुळे या सेवा विस्कळीत झाल्या आहेत. ऑप्टिक फायबर केबल तुटल्याने इंटरनेटसेवा विस्कळीत आहे. त्यावर अवलंबून असणारे डिजिटल पेमेंट, बॅकिंग आणि इतर सर्व व्यवहार कधी बंद, तर कधी चालू अशी हेलकावे घेत आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये नेहमीच मुसळधार पाऊस असतो. पावसाळा सुरू झाल्यानंतर शहरातील जीवनमान किती विस्कळीत होईल, याची कल्पनाच केलेली बरी!
Smart Meter : स्मार्ट मीटर’ मोहिमेला वेग, पण मीटरबाबत नागरिकांचा संताप, कारण काय? स्मार्ट मीटरचे नेमके फायदे कसे?
पाच वर्षांपासून यातना
त्र्यंबक नगरीत सातत्याने विकास कामे सुरू आहेत. यामध्ये कधी प्रसाद योजनेतून सुरू असलेली कामे, तर कधी शासनाच्या निधीतून होणारी रस्त्यांची आणि गटारींची कामे यांचा समावेश आहे. पाच वर्षांपूर्वी त्र्यंबकेश्वर शहारत भुयारी गटारीचे काम सुरू करण्यात आले. त्यासाठी शहरातील खोदलेल्या रस्त्यांनी वाहतुकीचा बोजवारा उडवला. थातूर मातूर काम करीत बुजवण्यात आलेल्या रस्त्यांच्या खड्ड्यांमध्ये पावसाळ्यात पाणी साचल्याने निर्माण होणारी बिकट परिस्थिती नागरिकांनी सलग चार वर्ष अनुभवली. आता सिंहस्थ विकासकामांनी संपूर्ण शहराचीच नाकाबंदी झाल्याने त्याचा फटका येथील पर्यटनालादेखील बसत आहे.
Nashik News : शाळांमध्ये उत्सवी प्रवेश, पण आदिवासींना नाही गणवेश! फाटक्या कपड्यांमध्ये पोरांचं स्वागत, आदिवासी विद्यार्थी गणवेशापासून वंचित; जबाबदार कोण?
रहदारीसाठी रस्तेच नाहीत
येथे आलेले भाविक पूजा करणाऱ्या गुरुजींचा अथवा निवास व्यवस्था असलेल्या लॉजिंगचा ठावठिकाणा मोबइलवर लोकेशनच्या आधारे शोधतात. मात्र त्यामुळे फसगत होत आहे. रात्री आलेल्या भाविकांना तर मोबइलमध्ये नकाशात दिसणारा रस्ता प्रत्यक्षात खोदून ठेवल्याचे अगदी जवळ गेल्यानंतर लक्षात येते. अनेकदा माघारी फिरण्याची देखील सोय नसते. खोदलेले रस्ते आणि त्यात आहे त्या रस्त्यावर भाविक, प्रवासी अथवा स्थानिक रहिवासी यांनी उभी केलेली वाहने यामुळे रहदारीसाठी रस्ताच शिल्लक राहत नाही. अशा परिस्थितीत रुग्णवाहिका चालवणे व रुग्णाला वेळेत उपचारासाठी घेऊन जाणे अशक्य होत आहे.

