Headlines

Mumbai municipal corporation to spend 702 crores for 1 km underground pedestrian path congress expresses opposition; मुंबई महापालिका सव्वा किलोमीटरसाठी तब्बल ७०२ कोटी खर्च करणार


म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: महालक्ष्मी रेसकोर्सवर सेंट्र्ल पार्क तयार केल्यानंतर मुंबईकरांसह पर्यटकांना तिथे सहजपणे पोहोचता यावे आणि त्यानंतर सायन्स सेंटर मेट्रो स्थानक, सागरी किनारा मार्गाच्या विहारपथापर्यंत त्यांचा मार्ग सुकर व्हावा, यासाठी ‘मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एमएमआरसीएल) १.३ किलोमीटरचा भूमिगत पादचारी मार्ग बांधणार आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी ‘एमएमआरसीएल’ करणार असून, मुंबई महापालिका ७०२ कोटी ४४ लाख ३५ हजार रुपये खर्च करणार आहे.

प्रस्ताव उद्या, बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत मांडण्यात येणार आहे. या १.३ किमी मार्गासाठी ७०२ कोटी रुपयांच्या खर्चभारामुळे काँग्रेसने या प्रस्तावाला विरोध दर्शवला आहे. मुंबई महापालिका आधीच २ लाख ४५ हजार कोटी रुपयांचे पायाभूत सुविधा प्रकल्प राबवत आहे. त्यातच महापालिकेवर चालू आर्थिक वर्षात सुमारे आठ हजार कोटींच्या देयकांची जबाबदारी आहे. त्यामुळे या पादचारी भुयारी मार्गाच्या खर्चाचा भार महापालिकेने का उचलावा, असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला आहे.

महालक्ष्मी रेसकोर्समार्गे ॲक्वालाइनच्या सायन्स सेंटर मेट्रो स्थानक ते सागरी किनारा मार्गाच्या विहारपथापर्यंत भूमिगत पादचारी मार्ग बांधण्यासाठी तत्कालीन मुंबई महापालिका आयुक्तांच्या दालनात २८ जुलै २०२५ रोजी बैठक झाली होती. या बैठकीला अप्पर मुख्य सचिव, मुंबई विकास रेल्वे कॉर्पोरेशनचे अधिकारी आणि ‘एमएमआरसीएल’चे अधिकारी, ‘एमएमआरसीएल’च्या तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक आणि विद्यमान महापालिका आयुक्त अश्विनी भिडे याही उपस्थित होत्या. या भुयारी पादचारी मार्गाच्या नियोजनाबाबत चर्चा करून त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय त्यावेळी झाला होता. या बांधकामाचा निधी मुंबई महापालिकेमार्फत उपलब्ध करून देण्याचे ठरले. तर, या प्रकल्पाची अंमलबजावणी ‘एमएमआरसीएल’मार्फत करून नगरविकास विभाग, मुंबई महापालिका आणि ‘एमएमआरसीएल’ यांच्यात सामंजस्य करार करून संस्थांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यावरही शिक्कामोर्तब करण्यात आले.

काँग्रेसने मात्र महापालिकेकडून उपलब्ध केल्या जाणाऱ्या निधीला विरोध केला आहे. महापालिका आधीपासूनच स्वतःच्या मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना निधी देत आहे. या सर्व विद्यमान आर्थिक बांधिलकींचा स्वतंत्रपणे विचार करूनच महापालिकडे आणखी ७०२ कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी निधी देण्याची जबाबदारी देणे हे योग्य नसून, याचे मूल्यांकन होणे गरजेचे असल्याचे महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांनी सांगितले.

आणखी भूमिगत पादचारी मार्गांचे प्रस्ताव

गेल्या वर्षी जुलैमध्ये मुंबई महापालिका मुख्यालयात ‘एमएमआरसीएल’सोबत झालेल्या बैठकीत काही भूमिगत पादचारी मार्गांविषयी चर्चा करण्यात आली होती. मेट्रोला भूमिगत पादचारी मार्ग कसे जोडता येतील, त्यासाठी लागणारा चटई क्षेत्र निर्देशांक यासह अन्य मुद्यांवर यावेळी मंथन करण्यात आले होते. त्यानंतर मेट्रो ३ जेव्हीएलआर ते कफ परेडची तीन स्थानके मुंबईतील बड्या व्यावसायिक आणि निवासी संकुलांना भुयारी पादचारी मार्गाने जोडण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आणि त्याला प्रथम मुंबई महापालिकेने मंजुरी दिली. मंजुरीनंतर तो ‘एमएमआरसीएल’कडे पाठवण्यात आला. मेट्रो-३ मधील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वरळी आणि अंधेरी एमआयडीसी अशा प्रकारे जोडण्यावर शिक्कामोर्तब करताना विविध कॉम्प्लेक्स जोडण्याच्या आठ प्रस्तावांना मंजुरीही त्यावेळी देण्यात आली. यामध्ये वरळीतील चार, वांद्रे- कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये तीन आणि अंधेरी एमआयडीसीत एका पादचारी भुयारी मार्गाची जोड मेट्रो-३ला देण्यात येणार आहे. ‘एमएमआरसीएल’कडूनच हे काम केले जाणार आहे.