Headlines

Mumbai Manhole Accident Bombay High Court slams BMC over Pre monsoon Work; बाळ गमावलेल्या पालकांना काय वाटत असेल? महापालिका असंवेदनशील कशी? अधिकाऱ्यांचा निर्लज्जपणा! हायकोर्टाचा तीव्र संताप


Mumbai Manhole Accident : एखाद्याचा जीव जाईपर्यंत महापालिका वाट का पाहत बसते? हे असेच चालणार आहे का? मानवी जीवन अमूल्य असून त्याचे संरक्षणच सर्वोच्च प्राधान्याचे आहे. जीव गेल्यानंतर कार्यवाही करणार आहात का?’ असे संतप्त सवाल न्या. अजय गडकरी व न्या. कमल खाता यांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान महापालिकेसमोर उपस्थित केले.

Mumbai Manhole Accident Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : ‘आत्तापर्यंत उच्च न्यायालयाने इतके आदेश देऊनही मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे एका नागरिकाचा मृत्यू झाला. अनुचित घटना घडून गेल्यानंतर तुम्ही (महापालिका) काय केले हे महत्त्वाचे नाही. तुम्हाला नागरिकांचे जीव गेल्यावरच जाग का येते?’, असा तीव्र संताप व्यक्त करत मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी मुंबई आणि ठाणे महानगरपालिकांवर ताशेरे ओढले. ‘बाळ गमावलेल्या पालकांना काय वाटत असेल? ठाणे महापालिका असंवेदनशील कशी? अधिकाऱ्यांचा निर्लज्जपणा आहे’ अशा कठोर शब्दांत खंडपीठाने आपली नाराजी व्यक्त केली.

‘जीव जाईपर्यंत महापालिका वाट का पाहते?’

‘मॅनहोल उघडे राहत नसल्याचा दावा मागील सुनावणीत मुंबई महापालिकेने केल्यानंतरही हा प्रकार घडला आणि आता प्रतिज्ञापत्र व केलेल्या कामांच्या अहवालाची कागदपत्रे आम्हाला दाखवली जातात. मुंबईतील पावसाळी परिस्थिती ही दरवर्षीची आणि सर्वज्ञात आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना अपेक्षित आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच आवश्यक उपाययोजना का करता येत नाहीत? एखाद्याचा जीव जाईपर्यंत महापालिका वाट का पाहते? हे असेच चालणार का? मानवी जीवन अमूल्य असून त्याचे संरक्षणच सर्वोच्च प्राधान्याचे आहे. जीव गेल्यानंतरच कार्यवाही करणार का?’, असे संतप्त प्रश्न न्या. अजय गडकरी व न्या. कमल खाता यांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान महापालिकेसमोर उपस्थित केले.

महापालिकेने काय सांगितलं?

रस्त्यांवरील खड्डे व उघडे मॅनहोल हे प्राणघातक ठरत असल्याने न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या कठोर निर्देशांचेही पालन होत नसल्याचे, ॲड. रुजू ठक्कर यांनी २ जुलै रोजी साकीनाका येथील उघड्या मॅनहोलमध्ये पडून ५५ वर्षीय अस्लम शेख यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आणत खंडपीठाला सांगितले. त्यामुळे त्याविषयी खंडपीठाने विचारणा केली असता, त्या घटनेनंतर महापालिका आयुक्तांनी संबंधित चार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली असून, चौकशी समितीही स्थापन केल्याचे ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी प्रतिज्ञापत्राच्या आधारे सांगितले. तसेच, शेख यांच्या कुटुंबाला दहा लाखांची भरपाई देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
Maharashtra TimesMumbai Crime : आई फोन का नाही उचलत! लेकीची चिंता वाढली, नातेवाईकांनी पवार कुटुंबाचं दार तोडलं, घरात भयंकर दृश्य, २३ वर्षांचा शेजारी अटक
शिवाय, ‘यापुढे अशी अनुचित घटना घडणार नाही, याची खबरदारी घेऊ. मुंबईत कुठेही मॅनहोल उघडे असल्यास पुढील १२ तासांत बंदिस्त केले जातील. तसेच दुरुस्तीसाठी कोणतेही मॅनहोल उघडण्यात आल्यास तिथे बॅरिकेड्स लावण्यासह एक कर्मचारी तैनात केला जाईल’, अशी हमी त्यांनी दिली. त्यावर नागरिकांचे जीव गेल्यानंतरच अशी जाग का येते? असा उद्विग्न प्रश्न खंडपीठाने उपस्थित केला.

व्हॉट्सॲप क्रमांकाची व्यापक प्रसिद्धी

रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावर तत्काळ कारवाई होण्याच्या दृष्टीने यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकाची वृत्तवाहिन्या व वर्तमानपत्रांच्या माध्यमातून व्यापक प्रसिद्धी देण्यात येईल. जेणेकरून २४ तासांत खड्डे बुजवण्याची कार्यवाही होईल, अशी हमी यावेळी महापालिकेतर्फे देण्यात आली. तसेच, आत्तापर्यंत आलेल्या एकूण १३०० तक्रारींपैकी १,२२५ तक्रारींचे निरसन झाल्याची माहितीही दिली.

VIDEO | मुंबईकरांसाठी महापौर रितू तावडे आणि किशोरी पेडणेकर एकत्र

ठाणे महापालिका इतकी अवंसेदनशील कशी?

ठाण्यातील धर्मवीर नगर येथील ज्ञानसाधना महाविद्यालयाजवळ असलेल्या पर्जन्य जलवाहिनीच्या उघड्या चेंबरमध्ये पडून सुमारे दोन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना नोव्हेंबर २०२५ मध्ये घडली होती. अशा प्रकरणांत मृत्यूबाबत पीडित कुटुंबाला सहा लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा न्यायालयाचा ऑक्टोबर २०२५चा सरसकट आदेश आहे. तरीही सहा महिन्यांत या बाळाच्या बाबतीत कोणताच निर्णय झाला नसल्याचे ॲड. रुजू यांनी मागील सुनावणीत निदर्शनास आणले होते. तेव्हा, आयुक्तांकडून याविषयी वेळ दिला जात नसल्याबद्दल खंडपीठाने नाराजी व्यक्त केली होती.
Maharashtra TimesSiya Goyal : सिया-चेतनचा चार महिन्यापूर्वी गुपचूप विवाह? केतन अग्रवाल केसमध्ये सर्वात मोठा गौप्यस्फोट, व्हॉट्सॲप चॅटमधून लग्नाची गोष्ट समोर
त्या पार्श्वभूमीवर, ७५ हजारांची भरपाई निश्चित केल्याचे महापालिकेच्या वकिलांनी सांगितले. त्यावरूनही खंडपीठाने महापालिकेला फैलावर घेतले. ‘चेंबर उघडे राहिल्याची चूक तुम्ही मान्य करता, तरी भरपाई फक्त ७५ हजारांची कशी? न्यायालयाच्या आदेशांना तुम्ही बांधील आहात की नाही? आपले बाळ गमावलेल्या पालकांना काय वाटत असेल? ठाणे महापालिका इतकी असंवेदनशील कशी? अधिकाऱ्यांचा हा निर्लज्जपणा आहे’, अशा कठोर शब्दांत खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. अखेरीस याप्रश्नी मंगळवार, १४ जुलै रोजी भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश महापालिकेला दिले.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा