मोशी कचरा डेपो येथे बुधवारी दुपारी एक ते दोनच्या सुमारास कचऱ्याचा डोंगर कोसळून अँटनी लोरा या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची तीन मजली प्रशासकीय इमारत कोसळली. यानंतर पोलिस, अग्निशमन दल, महापालिका प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. ‘एनडीआरएफ’ला पाचारण करण्यात आले. या इमारतीमध्ये एकूण २३ कामगार होते.
Pune News: पत्नीनं घरी बोलावलं, पण त्याने मित्राच्या शब्दाचा मान ठेवला अन् तिथेच घात झाला! क्षणात संसार उद्ध्वस्त
‘एनडीआरएफ’ला बचावकार्यात अडचणी भासू लागल्याने भारतीय सैन्य दलाला पाचारण करण्यात आले. दोन्ही दलांनी प्रयत्न करून, इमारतीच्या आत अडकलेले सोमनाथ शेळके, सचिन दवडगाव, दादासाहेब आरडे, सुजाता शिंदे, रामप्रताप चव्हाण, रणवीर सिंह, विजय सपकाळ या कामगारांना बाहेर सुखरूप काढले. गुरुवारी पहाटे भूषण पाटील, महेश राऊत यांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. मात्र, गुरुवारी सकाळी भावेश वाणी यांना बाहेर काढले असता त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर, गुरुवारी आणि शुक्रवारी (दहा जुलै) दोन दिवस इमारतीच्या बाजूचा कचरा हटवून आणि इमारतीचा स्लॅब फोडून इतर कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र, इमारतीच्या आसपासच्या मोठ्या प्रमाणात कचरा असल्याने बचावकार्यात अडथळा निर्माण झाला होता.
गुरुवारी दुपारपासून ते शनिवारी (११ जुलै) दुपारपर्यंत हा कचरा हटविण्याचे काम सुरू होते. त्यानंतर शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास अक्षय सावंत या कामगाराचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पाचच्या सुमारास सुनील कोकरे या कामगाराचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर महेश कुंभार, सनी माने, राहुल गायकवाड, रणजीत पाटील, नागेश गायकवाड यांचे मृतदेह काढण्यात आले. मात्र, वामन कसबे यांचा मृतदेह सापडला नाही. कसबे यांनी प्रवेशद्वारावर प्रवेश केला. तशी ऑनलाइन नोंद केली. मात्र, मुख्य प्रशासकीय इमारतीत गेल्याची त्यांची नोंद नाही. त्यामुळे ते नक्की ढिगाऱ्याखाली कुठे अडकले आहे, याचा अंदाज बचाव पथकाला आलेला नाही. कामगारांच्या मृत्यूला महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप मृतांच्या नातेवाइकांनी केला आहे.
Parth Pawar : पार्थ पवारांचा साखरपुडा ठरला, काश्मिरची कन्या होणार पवारांची सूनबाई, कोण आहे कायनात धार?
मृतांच्या नातेवाइकांना ४० लाखांची मदत
या दुर्घटनेतील मृताच्या नातेवाइकांना कंपनीकडून २५ लाख, राज्य सरकारकडून दहा लाख आणि महापालिकेकडून पाच लाख असे एकत्रित ४० लाख रुपये देण्यात येणार आहेत. मृतांच्या पाल्यांच्या शिक्षणाचा खर्च आणि वारसाला कंपनीत नोकरी देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
दुर्घटनेच्या ठिकणी बचावकार्यात अनेक अडथळे होते. कुटुंबीय भावनिक अवस्थेत असून, बचावकार्य अधिक वेगाने व्हावे, असे वाटणे स्वाभाविक आहे; मात्र आतापर्यंत मोठ्या स्वरूपाचे दुर्लक्ष झाल्याचे समोर आलेले नाही. या संपूर्ण प्रकरणात दोषींवर कारवाई होईल. – सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री

