येत्या दोन दिवसांत उर्वरित भागांतही ते दाखल होतील. त्यानंतर पुन्हा काही दिवस तो विश्रांती घेईल, असा हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे. मान्सून दाखल झाला असला, तरी पुढील काळात पाऊस कसा होणार, याची शाश्वती नसल्याने अजूनही चिंतेचे मळभ पूर्णपणे दूर झालेले नाही. कोरड्या जमिनीमध्ये पावसाने काहीशी ओल दिली असली, तरी धरणे अजूनही कोरडीच आहेत; गावोगावी टँकर अजूनही सुरूच आहेत. हे चित्र पालटण्यासाठी आणखी काही दिवस सातत्यपूर्ण पावसाची आवश्यकता आहे.
मुंबई व कोकणात जोरदार पाऊस झाला, तर पुण्यात बुधवार सकाळपर्यंत रिमझिम सुरू होती. या महिन्याच्या सुरुवातीपासूनच शेतकरी पेरण्यांच्या तयारीत होते. ताज्या पावसाने जमिनीत काहीशी ओल धरली असली, तरी पेरण्यांसाठी ती पुरेशी नाही; त्यामुळेच दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी आता किमान ६० मिमी. पाऊस होईपर्यंत पेरण्या करू नका, हा सरकारचा सल्ला पाळावा लागेल. पावसाने दडी मारल्याने फटका मूग-उडदासारख्या पिकांना फटका बसू शकतो. पावसाचे आगमन लांबल्याने धरणेही कोरडी पडलेली आहेत. राज्यातील प्रमुख धरणांमध्ये अजूनही फक्त २०-२५ टक्के साठा आहे; पुण्यासारख्या भागांत तर हे प्रमाण दहा टक्केच आहे.
पहिला पाऊस जमिनीत मुरतो आणि जमिनीची तहान भागवल्यानंतर पाणी ओढ्या-नाल्यांमधून वाहू लागते. त्यानंतरच धरणांमध्ये पाणी साठू लागते. त्यासाठी आणखी काही दिवस पाऊस होणे गरजेचे आहे. त्यामुळेच प्रमुख शहरांमध्ये पाणीकपात आणि गावोगावी-दुर्गम भागांमध्ये टँकर सुरूच आहेत. त्यातही उच्च न्यायालयातील सुनावणीमध्ये यंत्रणांची असंवेदनशीलता उघड झाली. मेळघाटातील गावकऱ्यांच्या पाणी मिळत नसल्याच्या तक्रारींवर अधिकाऱ्यांनी खुशाल ‘टँकर सुरू आहेत,’ असे उत्तर दिले; मात्र पाणी मिळत नव्हते आणि दूषित पाण्याने माणसे आजारी पडू लागली; ही वस्तुस्थिती समोर आल्यानंतर न्यायालयाने या बाबूंची कानउघाडणी केली. आता तरी सोपवलेली कामे इमानेइतबारे होतील, अशी आशा आहे. अजूनही राजस्थान, पंजाब, दिल्ली, हरियाणा असा बहुतेक उत्तर भारत कोरडा आहे. आता पाऊस आला, तरी तो सरासरी गाठणार का आणि पिकांना गरज असेल, अशा पद्धतीने वेळोवेळी होणार का, असे प्रश्न कायम आहेत.
ग्रामीण भागात पावसाचे आगमन आशा उंचावणारे असले, तरी या पहिल्याच पावसाने प्रमुख शहरांमधील पायाभूत सुविधांचा बोजवारा उडवून दिला. मुंबईत गेले काही दिवस वाजतगाजत नालेसफाईचे पाहणी दौरे पार पडले होते; मात्र पहिल्याच पावसात किंग्ज सर्कल, अंधेरी सबवे आणि मानखुर्द अशा विविध भागांमध्ये साचलेल्या पाण्याने नालेसफाईचे पितळ उघडे पाडले. यापूर्वी काही नागरिकांचे प्राण घेणाऱ्या उघड्या गटारांचा सापळाही कायम आहे. खुद्द महापौर रितू तावडे यांच्या दौऱ्यात त्यांच्या समोरच एक अधिकारी अशा गटारात पडल्याने महापालिका प्रशासनाचा कारभार समोर आला.
मुंबई-गोवा मार्गाचे काम पूर्ण होण्याचे नवनवे मुहूर्त पुन्हा कागदावरच राहिल्याचे दिसून आले. ठिकठिकाणी पावसाने खचलेल्या या महामार्गाची दुर्दशा पुन्हा नागरिकांच्या त्रासात भर घालत आहे. अन्य शहरांमध्येही थोड्याबहुत फरकाने हेच चित्र दिसून आले. पुण्या-मुंबईत रस्त्यांवर पाण्याची तळी साचल्याने बहुतांश भागांमध्ये पावसाबरोबरच वाहतूक कोंडीचेही आगमन झाले आहे. अगदी गल्लीबोळांतही काँक्रिट रस्ते करण्याच्या अट्टहासामुळे जमिनीत पाणी मुरण्यास जागा शिल्लक नाही आणि ड्रेनेज यंत्रणा तुंबलेली असल्याने ही स्थिती उद्भवते, याची जाणीव ’विकासजीवीं’ना कधी होणार, हा प्रश्नच आहे. एकीकडे पुरेशा पावसाची प्रतीक्षा आणि दुसरीकडे नागरिकांची सुविधा अशा विविध पातळ्यांवर सज्ज राहण्याचा इशाराच पहिल्या पावसाने दिला, असे म्हणावे लागेल.

