Headlines

Manoj jarange patil aggressive warnings strong criticism of bandu jadhav and eknath shinde shinde; चॅलेंज दिलं, तरीही शिंदेंचा कार्यक्रम घेतला; बंडू जाधवांवर जरांगे संतापले


योगेश काकफळे, जालना: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाच्या दुसऱ्याच दिवशी आक्रमक भूमिका घेतली आहे. परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जरांगे पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. परभणी येथे शेतकऱ्यांच्या नावाखाली आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावरून त्यांनी बंडू जाधव यांना थेट इशारा दिला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी आरोप केला की, एकीकडे मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष करत आहे, मी स्वतः अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलो आहे, तर दुसरीकडे मराठा समाजाच्या नावाने राजकारण करणारे नेते कार्यक्रमांचे आयोजन करत आहेत. परभणी येथे खासदार बंडू जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांच्या नावाखाली कार्यक्रम आयोजित केला असल्याचे सांगत जरांगेंनी त्यावर आक्षेप घेतला.

यावेळी जरांगे पाटील यांनी बंडू जाधव यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत टीका केली. “बंडू जाधव, तू जो कार्यक्रम आयोजित केला आहेस, त्याचा परिणाम तुला आणि एकनाथ शिंदे यांना भोगावा लागेल,” असा थेट इशारा त्यांनी दिला. मराठा समाज आरक्षणासाठी उपाशीपोटी आंदोलन करत असताना दुसरीकडे कार्यक्रमांचे आयोजन करून समाजाच्या भावनांशी खेळ केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

तुझ्यासारख्या नेत्यांना बाप मानणारे आम्ही नाही. आमच्यासाठी समाज सर्वस्व आहे, अशा शब्दांत जरांगे पाटील यांनी बंडू जाधव यांच्यावर निशाणा साधला.

परभणी येथे आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम उधळून लावण्यासाठी आपण स्वतः परभणीत आलो असतो, असेही जरांगे पाटील यांनी म्हटले. मात्र, परभणीला पोहोचेपर्यंत रात्रीचे दहा वाजतील आणि तोपर्यंत कार्यक्रम संपून जाईल, असे सांगत त्यांनी परभणीला जाणे टाळल्याचे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी बंडू जाधव यांच्यावर आक्रमक टीका करत संताप व्यक्त केला. ज्यांनी मराठा समाजाचे वाटोळे केले, त्यांचाच कार्यक्रम तुम्ही शेतकऱ्यांच्या नावाखाली घेत आहात. इकडे आम्ही उपाशी मरत आहोत आणि तिकडे तुम्ही कार्यक्रमाच्या तोफा उडवत आहात. याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.

दरम्यान, लातूर, नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील मराठा समाजाने सध्या शांत राहावे, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले. मात्र, येणाऱ्या काळात या प्रकरणाचा राजकीय पातळीवर जाब विचारला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस असून, मराठा आरक्षणाच्या मागणीवरून त्यांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे. बंडू जाधव आणि एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या या टीकेमुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत