कोल्हापूर -जुलैच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील अनेक भागांमध्ये सगळीकडे कडक पाऊस झाला ना? मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्राला पाऊसाने अगदी झोडपून काढला. पण आता पुढचे १० ते १२ दिवस राज्यातला पाऊस गायब होणार आहे. स्वतः हवामान विभागाने हा अंदाज वर्तवला आहे. ११ जुलैपासून राज्यातल्या बहुतांश भागांत पावसाचा जोर एकदम कमी होणार असून तापमानात लक्षणीय
वाढ होणार आहे.
अचानक या पावसाला ब्रेक का लागतोय?
तर यामागे दोन मोठी कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे अफगाणिस्तानकडून येणारे कोरडे वारे गुजरात मार्गे आपल्या महाराष्ट्रावर येत आहेत. या कोरड्या वाऱ्यांमुळे हवेतली आर्द्रता कमी होणार आणि पावसाचे ढग बनण्यात मोठा अडथळा येणार आहे. आणि दुसरं कारण म्हणजे प्रशांत महासागरातला एल निनो आता जास्तच तीव्र होतोय. या दोन्ही कारणांमुळे जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यातही पाऊस कमीच राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे..
या पावसाच्या ब्रेकमुळे आता तापमान वाढणार असून याचा थेट फटका आपल्या शेतीला बसू शकतो. ज्या भागांत अजून समाधानकारक पाऊस झालेला नाही, तिथे पेरण्या खोळंबण्याची शक्यता आहे. म्हणूनच कृषी विभागाने आपल्या शेतकरी बांधवांना एक कळकळीचं आवाहन केलंय की, जोपर्यंत जमिनीत पुरेसा ओलावा तयार होत नाही, तोपर्यंत पेरणीची अजिबात घाई करू नका, नाहीतर बियाणं वाया जाऊ शकतं. ही माहिती आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा आणि पुढील अपडेट्ससाठी पहात रहा तरुण भारत कोल्हापुर…
काही जिल्ह्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा
महाराष्ट्रातील अनेक भागांत उद्यापासून पावसाचा जोर ओसरणार आहे. मात्र, असे असले तरी आजचा दिवस काही जिल्ह्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.आज 5 जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज गुरुवारी पुणे घाटमाथा आणि सातारा घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. घाटमाथ्यावरील प्रवाशांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय रायगड, रत्नागिरी आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
