Headlines

Konkan Raigad Alibaug Flood Situation due to Heavy Rains Affects Traffic; कोकणालाही पाण्याचा वेढा; रायगडमधील पूरस्थिती गंभीर, अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली, वाहतुकीवर परिणाम


Konkan Rain Update News : पोलादपूर परिसरात अतिवृष्टीमुळे भूस्खलन व दरडी कोसळण्याचा वाढता धोका लक्षात घेऊन ३ ते ६ जुलैदरम्यान बंद ठेवण्यात आलेला पोलादपूर-महाबळेश्वर मार्ग (आंबेनळी घाट मार्ग) आता ७ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.

Konkan Rain Update News
कोकण पाऊस बातम्या(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, चिपळूण/अलिबाग : कोकणात पावसाचे धुमशान सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात संततधार सुरूच राहिल्याने खेडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत होती. रायगडमध्ये पूरस्थितीमुळे १४ गावांतील २६५ कुटुंबांतील ९३७ नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले, तर २००हून अधिक नागरिक व पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली.

शहरासह तालुक्यात झाडे कोसळण्याचे प्रकार

खेडमध्ये जगबुडी नदी सोमवारी रात्रीपर्यंत ७.२ मीटरवरून वाहत होती. चिपळूण शहरासह तालुक्यात झाडे कोसळण्याचे प्रकार घडले. दापोली तालुक्यातील बहुतांश भाग रविवारपासून दोन दिवस अंधारात होता. मंडणगड तालुक्यातील रत्नागिरी-रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या म्हाप्रळ-आंबेत पुलाला वाळू वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या दोन बार्जनी जोरदार धडक दिल्याने पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. दापोली-पालवणी-मंडणगड मार्गावरील दादर पूल पाण्याखाली गेला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा सर्वाधिक फटका वैभववाडी तालुक्याला बसला. कुंभवडे येथील हरिश्चंद्र राऊत यांचे घर कोसळले. वाभवे येथील उमेश गावडे यांच्या घरावर वडाचे झाड पडून नुकसान झाले. मुंबई-गोवा महामार्गावर ओरोस परिसरात मोठे झाड पडल्याने काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती.
Maharashtra TimesST Shivneri Bus : अतिवृष्टीचा एसटी प्रवाशांना फटका, मुंबई-पुणे शिवनेरीच्या फेऱ्या पुढील सूचनेपर्यंत रद्द, महामंडळाचा मोठा निर्णय

दरड कोसळल्याने हा घाट वाहतुकीसाठी बंद

रायगड जिल्ह्यात पावसाने थैमान घातल्याने रविवारी रात्रीपासूनच माणगाव-कोकण- पुणे जोडणारा ताम्हिणी घाटात रस्ता खचल्याने व दोन ठिकाणी दरड कोसळल्याने हा घाट वाहतुकीसाठी बंद झाला होता. रत्नागिरी- रायगड जिल्ह्याच्या हद्दीजवळ असलेल्या महाड विन्हेरे तुळशी खिंड नातू नगर या रस्त्यावरील तुळशी खुर्द गावाजवळ मध्यरात्री मोठी दरड कोसळली. रोहा, नागोठणे आणि महाड शहर जलमय झाले. रायगडमध्ये सोमवारी सकाळी १० वाजेपर्यंत सरासरी २३६.६० मिमी पावसाची नोंद झाली. सावित्री, अंबा आणि कुंडलिका नद्यांनी धोका पातळी ओलांडली असून, पाताळगंगा नदी धोका पातळीवरून वाहत आहे. नागोठणे येथे अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर मुंबई-गोवा महामार्ग पाण्याखाली गेला. अतिवृष्टीमुळे पनवेल, कर्जत आणि महाड येथे जीवितहानीच्या घटनाही घडल्या असून तीन व्यक्तींचा मृत्यू झाला तर पाच व्यक्ती बेपत्ता आहेत.

‘काळ’ रोखला उंबरठ्यावरच

खेड तालुक्यातील कशेडी घाटाजवळ खवटी मंडलिक कोंड येथे अख्खा डोंगरच मुंबई-गोवा महामार्गावर कोसळला. घरात झोपलेल्या जाधव कुटुंबाला मध्यरात्री उशिरा मोठा आवाज ऐकू आला आणि काळजात धस्स झाले. त्यांनी प्रसंगावधान राखत तत्काळ ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील तसेच विठ्ठल जाधव यांना घटनेची माहिती दिली. ‘नशिबाने आमची माणसे बचावली आहेत’ अशी प्रतिक्रिया विठ्ठल जाधव व कृष्णा जाधव या प्रत्यक्षदर्शींनी दिली.
Maharashtra TimesVasai-Virar Rain : वसई-विरारला झोडपले; पश्चिम रेल्वेसह लोकलवर परिणाम, प्रवाशांची रुळांवरुन जीवघेणी पायपीट, रस्ते, घर जलमय

बारा तासानंतर वाहतूक सुरू

खेडमध्ये दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्गावर दोन्ही बाजूंनी सुमारे ५०० वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. घटनास्थळी सोमवारी पहाटे साडेचार वाजता एक जेसीबी आणि दोन डम्परद्वारे दरड उपसण्याचे काम सुरू करण्यात आले. दुपारी १.५५ वाजता पहिले वाहन मुंबईच्या दिशेने सोडण्यात आले. रत्नागिरी रेल्वे स्थानकात नव्यानेच उभी करण्यात आलेली शेड कोसळली. त्यात जीवितहानी टळली.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा