India medal tally cwg 2026 : ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने १३ सुवर्णपदकांसह एकूण ३९ पदके जिंकून इतिहास रचला आहे. ६१ वरून पदकांची संख्या ३९ वर घसरलेली दिसताच चाहत्यांमध्ये चिंता पसरली होती, पण क्रीडा विश्लेषकांनी या कामगिरीला ऐतिहासिक का म्हटले?

केवळ ३९ पदकंच का? काय आहे यामागील गणित?
२०२२ च्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने ६१ पदके जिंकली होती. मग या वेळी केवळ ३९ पदकेच का मिळाली, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. मात्र, यामागचे मुख्य कारण खेळांची आणि खेळाडूंची घटलेली संख्या हे आहे. २०२२ च्या स्पर्धेत १९ खेळ समाविष्ट होते, तर या वेळी ग्लासगोमध्ये केवळ १० खेळच ठेवण्यात आले होते. कुस्ती, बॅडमिंटन, नेमबाजी, टेबल टेनिस, हॉकी आणि क्रिकेट यांसारख्या भारताच्या हक्काच्या खेळांना या वेळी स्थान नव्हते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, २०२२ मध्ये एकट्या या खेळांमधून भारताला तब्बल ३० पदके मिळाली होती.
कमी खेळाडू आणि यश जोरदार
खेळांची संख्या कमी झाल्यामुळे भारताने खेळाडूंचे पथकही लहान पाठवले होते. गेल्या वेळी २१० खेळाडू गेले होते, तर या वेळी केवळ १२३ खेळाडू सहभागी झाले होते. या १२३ पैकी तब्बल ३८ खेळाडूंनी वैयक्तिक किंवा सांघिक रूपात पदके जिंकली आहेत. जर आपण यशाच्या टक्केवारीचा विचार केला, तर २०२२ मध्ये भारताचा यशोदर २९% होता, जो या वेळी वाढून ३१% वर पोहोचला आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारताला ५-६ सुवर्ण आणि एकूण ३१ पदके मिळतील असा अंदाज वर्तवला जात होता, पण भारतीय खेळाडूंनी तो अंदाज चुकीचा ठरवत ३९ पदकांची मोठी कमाई केली.
बॉक्सिंगमध्ये भारतीय मुक्केबाजांची ऐतिहासिक कामगिरी
भारताला मिळालेल्या ३९ पदकांपैकी ३७ पदके ही केवळ पाच खेळांमधून आली आहेत, ज्यामध्ये बॉक्सिंगचा वाटा सर्वात मोठा राहिला. १४ मुक्केबाजांच्या पथकापैकी १० जणांनी पदके जिंकून देदिप्यमान यश मिळवले. यात ७ सुवर्ण आणि ३ रौप्य पदकांचा समावेश आहे. म्हणजेच भारताच्या दर चार पदकांमागे एक पदक हे बॉक्सिंगमधून आले आहे. जॅस्मिन लंबोरिया, साक्षी, प्रीती पवार, अंकुश पंघाल आणि लव्हलिना बोरगोहेन यांनी रिंगमध्ये अप्रतिम खेळ दाखवला.
ॲथलेटिक्स आणि वेटलिफ्टिंगमधील चित्र
ॲथलेटिक्समध्ये भारताने १० पदके जिंकली असली तरी एकही सुवर्णपदक जिंकता आले नाही. स्टार खेळाडू नीरज चोप्राला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले, तर त्याच्यासोबत पदार्पण करणाऱ्या यशवीर सिंहने कांस्यपदक पटकावले. गुलवीर सिंहने १०,००० मीटर शर्यतीत रौप्य आणि ५,००० मीटर शर्यतीत कांस्य मिळवले, तर तेजस्वी शंकरने ‘डेकॅथलॉन’मध्ये ऐतिहासिक पदक जिंकले. दुसरीकडे, वेटलिफ्टिंगमध्ये भारताला एकूण ८ पदके मिळाली, ज्यामध्ये एकमेव सुवर्णपदक स्टार लिफ्टर मीराबाई चानू हिने मिळवून दिले.
ज्युडो आणि पॅरा खेळाडूंचा सुवर्ण संघर्ष
पॅरा ॲथलेटिक्समध्ये ११ पैकी ६ खेळाडूंनी पदके (३ सुवर्ण, २ रौप्य, १ कांस्य) पटकावून चमकदार कामगिरी केली. तर पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये भारताला १ पदक मिळाले. ज्युडो या खेळात तर भारताने इतिहास रचला. अस्मिता डे आणि हर्ष सिंह यांनी सुवर्णपदक जिंकून भारताची मान अभिमानाने उंचावली. ज्युडोमध्ये भारताला एकूण ४ पदके मिळाली.
पुढचे लक्ष्य एशियन गेम्स आणि २०३० चे स्वप्न
ग्लासगोमधील कामगिरीवरून हे स्पष्ट होते की, कमी संधी आणि मर्यादित खेळाडू असूनही भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट जिद्द दाखवली आहे. आता खेळाडूंचे पुढचे लक्ष्य सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशियाई स्पर्धा (Asian Games) हे असेल. तसेच, २०३० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे यजमानपद भारताकडे असण्याची दाट शक्यता असल्याने, मायदेशात भारतीय खेळाडू यापेक्षाही दमदार कामगिरी करतील अशी आशा क्रीडाप्रेमींना आहे.

