Headlines

Gaza Israel Conflict: गाझात 20 हजार मुलांना संपवलं; सैनिकांनी ‘गेम’ खेळून पोरांना अपंग केलं; इस्रायलचा क्रूर चेहरा


Gaza Israel Conflict: इस्रायल जाणूनबुजून गाझातील मुलांना लक्ष्य करत असल्याची माहिती संयुक्त राष्ट्राच्या स्वतंत्र आंतरराष्ट्रीय तपास आयोगाच्या अहवालातून समोर आली आहे. यामुळे इस्रायलचा क्रूर चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे.

israel gaza
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
तेल अवीव: पॅलेस्टाईन परिसरावर संयुक्त राष्ट्राच्या स्वतंत्र आंतरराष्ट्रीय तपास आयोगानं जिनिव्हातील UNHRC समोर आपला अहवाल सादर केला आहे. या आयोगाचे अध्यक्ष आणि ओडिशा उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एस. मुरलीधर यांनी अहवालात महत्त्वाच्या गोष्टी नमूद केल्या आहेत. इस्रायल जाणुनबुजून पॅलेस्टिनी मुलांना लक्ष्य करत असल्याचा उल्लेख अहवालात आहे.

या प्रकरणी आयोगानं इस्रायलकडे उत्तर मागितलं होतं. पण त्यांनी तपासात कोणतंही सहकार्य केलं नसल्याचं एस. मुरलीधर यांनी सांगितलं. ७ ऑक्टोबर २०२३ ते ७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत वेस्ट बँक आणि पूर्व येरुशलममध्ये २० हजारांहून जास्त मुलं मारली गेली आहेत. याशिवाय ४४ हजारांहून अधिक मुलं गंभीर जखमी झाले आहेत.
Maharashtra TimesChina Plane Crash: चीनमध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरसारखी घटना; बीजिंगच्या सर्वात उंच इमारतीवर विमान आदळलं; परिसरात खळबळ
लहान मुलांना दोप पद्धतींनी लक्ष्य केलं जात असल्याचं मुरलीधर यांनी सांगितलं. ‘लोकसंख्येची घनता अधिक असलेल्या भागांवर अनेकदा बॉम्ब हल्ले केले जात आहेत. दुसरी पद्धत आणखी धोकादायक आहे. त्यात क्वाडकॉप्टर (ड्रोन) आणि स्नायपर रायफल्सचा वापर केला जात आहे. या ड्रोन्समध्ये हाय प्रिसिजन थर्मल इमेजिंग कॅमेरे लावण्यात आलेले असतात. यामधून दूर बसलेल्या ऑपरेटरला मुलांच्या शरीराचा आकार अगदी स्पष्ट दिसतो. दूरवर बसून मुलांना मारणं एखाद्या खेळासारखं असल्याची कबुली काही इस्रायली सैनिकांनी कॅमेऱ्यासमोर दिली आहे,’ अशी माहिती मुरलीधर यांनी दिली.

या अहवालानुसार, मुलांना गंभीर जखमी करण्यासाठी त्यांच्या डोक्यावर किंवा मानेवर सिंगल शॉट स्नायपरनं गोळ्या घातल्या जात आहेत. आईचं दूध पिणाऱ्या अवघ्या १० महिन्यांच्या बाळाच्या डोक्यावर गोळी झाडण्यात आली. त्यामुळे तो आयुष्यभरासाठी अपंग झाला. हातात सफेद झेडा घेऊन उभ्या असलेल्या मुलांना, रुग्णवाहिकांच्या कर्मचाऱ्यांना, रेड क्रॉसकडे पळणाऱ्या कुटुंबियांनादेखील लक्ष्य केलं जात आहे.
Maharashtra TimesAsim Munir: भारताच्या कट्टर शत्रूला संपवण्यासाठी मोसादनं कट रचलेला, ठिकाणही ठरलेलं; ऐनवेळी काय घडलं?
रुग्णालयात डॉक्टरांनी एक नवीन श्रेणी तयार केली आहे. त्याला WCNSF (Wounded Child With No Survival Family) असं नाव देण्यात आलं आहे. दोन महिन्यांत हजारो मुलांना रुग्णालयात आणण्यात आलं आहे. या मुलांची संपूर्ण कुटुंब संपली आहेत. इस्रायली सैन्यानं अनाथालयांना, शाळांना आणि रुग्णालयांनादेखील लक्ष्य केलं आहे. गाझामधील ९७ टक्के शाळा आणि ३२ पैकी २७ विद्यापीठं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. विद्यार्थी मागील तीन वर्षे शिक्षणापासून दूर आहेत.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.

पत्रकारितेतील अनुभव
बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.

मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.

‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.

टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.

लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.

लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.

२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.

शैक्षणिक पात्रता
कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.आणखी वाचा