Duleep Trophy 2026-27 Final Venue Changed : दुलीप ट्रॉफी २०२६ च्या अंतिम सामन्याच्या ठिकाणात बीसीसीआयने मोठा बदल केला आहे. हा सामना आता ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ ऐवजी दुसऱ्या एका स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

कुठे रंगणार फायनलचा थरार?
सुरुवातीच्या वेळापत्रकानुसार, दुलीप ट्रॉफीचा हा विजेतेपदाचा महामुकाबला बीसीसीआयच्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये (Center of Excellence) खेळवला जाणार होता. मात्र, आता बीसीसीआयने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार हा सामना चेन्नईच्या ऐतिहासिक एमए चिदंबरम स्टेडियमवर ( MA Chidambaram Stadium ) पार पडणार आहे. हा अंतिम सामना ६ ते १० सप्टेंबर दरम्यान खेळवला जाईल. विशेष म्हणजे, ही संपूर्ण स्पर्धा २३ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत खेळवली जाणार असून, फक्त फायनल वगळता बाकी सर्व सामने (उपांत्यपूर्व आणि उपांत्य) आधी ठरल्याप्रमाणे ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्येच खेळवले जातील.
BCCI ने का घेतला हा निर्णय?
अचानक फायनलचे मैदान का बदलण्यात आले? असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. यावर बोर्डाने हा मोठा बदल करण्यामागे केवळ क्रिकेट चाहत्यांचे हित असल्याचे स्पष्ट केले आहे. बीसीसीआयने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, “देशांतर्गत क्रिकेटमधील या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यासाठी, प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येऊन फायनलचा सामना थेट पाहण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळेच हा सामना आता चेन्नईत खेळवला जाईल.”
सचिव देवजीत सैकिया काय म्हणाले?
या महत्त्वपूर्ण बदलाबाबत भाष्य करताना बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया म्हणाले, “दुलीप ट्रॉफी ही आमच्या क्रिकेट कॅलेंडरमधील अत्यंत महत्त्वाची स्पर्धा आहे आणि ती आपली एक समृद्ध परंपरा पुढे नेत आहे. या स्पर्धेतील क्रिकेटचा दर्जा नेहमीच उच्च असतो आणि आमच्या चाहत्यांना हा फायनलचा सामना स्टेडियममधून थेट पाहण्याची संधी मिळावी, अशी आमची प्रामाणिक इच्छा होती.”
ते पुढे म्हणाले, “सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये प्रेक्षकांच्या उपस्थितीवर काही निर्बंध आहेत, त्यामुळे आम्हाला वाटले की फायनल अशा ठिकाणी आयोजित करणे योग्य राहील, जिथे चाहते येऊ शकतील आणि या ऐतिहासिक क्षणाचा भाग होऊ शकतील.”
लाईव्ह कव्हरेजबाबतही मोठी अपडेट
स्पर्धेच्या थेट प्रक्षेपणाबाबत माहिती देताना सैकिया पुढे म्हणाले, “आम्ही यंदा या स्पर्धेच्या कव्हरेजमध्येही वाढ केली आहे. दुलीप ट्रॉफीच्या सर्व सामन्यांचे ‘लाईव्ह स्ट्रीमिंग’ (Live Streaming) केले जाणार आहे. यासोबतच एक उपांत्यपूर्व फेरी (Quarter-Final), एक उपांत्य फेरी (Semi-Final) आणि अंतिम सामन्याचे (Final) थेट प्रक्षेपण टेलिव्हिजनवर केले जाईल.बीसीसीआयच्या या निर्णयामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, चेन्नईच्या स्टेडियमवर फायनलचा थरार अनुभवण्यासाठी चाहते आतापासूनच सज्ज झाले आहेत.

