Headlines

टीम इंडियाने 5 धडाकेबाज गोल ठोकले अन् पाकिस्तानला वर्ल्ड कपमधून बाहेरचा रस्ता दाखवला, सरपंच हरमनप्रीतच्या टोळीचा धुमाकूळ!


IND vs PAK Hockey WC 2026 : हॉकी वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारताने पाकिस्तानचा ५-३ असा दणदणीत पराभव केला. हरमनप्रीत सिंग, अभिषेक आणि हार्दिक सिंगच्या गोलच्या जोरावर भारताने पुढच्या फेरीत प्रवेश केला, तर पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात आले.

India vs Pakistan Hockey
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : एफआयएच पुरुष हॉकी वर्ल्ड कप २०२६ मधील पूल ‘डी’ च्या अत्यंत अटीतटीच्या आणि ‘करा किंवा मरा’ सामन्यात भारतीय संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ५-३ असा दणदणीत पराभव केला आहे. नेदरलँड्सच्या अमस्टेलवीन येथील वैगनर स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या हायव्होल्टेज सामन्यात टीम इंडियाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत पाकिस्तानला डोकं वर काढण्याची कोणतीही संधी दिली नाही. या शानदार विजयासह भारतीय संघाने विश्वचषकाच्या पुढच्या फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे, तर पाकिस्तानला स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

पहिल्या क्वार्टरमध्येच भारताचा धडाका

सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारतीय संघाने मैदानावर आपला दबदबा निर्माण केला. कर्णधार हरमनप्रीत सिंगने ६ व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरच्या ‘रिबाउंड’वर जोरदार शॉट मारत भारताचे खाते उघडले. यानंतर अवघ्या पाच मिनिटांनी (११ व्या मिनिटाला) अभिषेकच्या उत्कृष्ट पासवर डी-एरियामध्ये उभ्या असलेल्या मनदीप सिंगने अत्यंत हुशारीने खेळ करत आणि विपक्षी डिफेंडरच्या डिफ्लेक्शनची मदत घेत चेंडू थेट गोलपोस्टमध्ये धाडला आणि भारताची आघाडी २-० अशी वाढवली. पहिल्या १५ मिनिटांच्या खेळात पाकिस्तानी संघ केवळ चेंडू मिळवण्यासाठी संघर्ष करताना दिसला.

Maharashtra TimesManav Suthar Records : 10 विकेट्स, विक्रमांची रास, तरी सामनावीर पुरस्कार पडिक्कलला; मानव सुथारसोबत अन्याय झाला?

दुसऱ्या क्वार्टरमध्ये गोलचा पाऊस अन् पाकिस्तानचा पलटवार

दुसऱ्या क्वार्टरची सुरुवातही भारताने जोरदार केली. २१ व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंगने या स्पर्धेतील आपला पाचवा गोल नोंदवला. मात्र, काही वेळातच पाकिस्तानच्या हन्नान शाहीदने सलग तिसऱ्या प्रयत्नात गोल करत धावसंख्या ३-१ अशी केली. त्यानंतर २४ व्या मिनिटाला अभिषेकने अप्रतिम गोल करत भारताला ४-१ अशी मजबूत आघाडी मिळवून दिली. पण त्याच मिनिटाला पाकिस्तानच्या सुफियान खानने पेनल्टी कॉर्नरवर गोल डागत हाफ-टाईमपर्यंत धावसंख्या ४-२ अशी आणली.

तिसऱ्या क्वार्टरमध्ये हार्दिकचा ‘पेनल्टी स्ट्रोक’

हाफ-टाईमनंतर भारतीय संघाने आपली आघाडी आणखी मजबूत करण्यावर भर दिला. ३५ व्या मिनिटाला (तिसऱ्या क्वार्टरच्या ५ व्या मिनिटाला) पाकिस्तानचा खेळाडू अर्शदने भारताच्या आदित्य लालगेवर फाऊल केला, ज्यामुळे पंचांनी भारताला ‘पेनल्टी स्ट्रोक’ बहाल केला. अनुभवी मिडफिल्डर हार्दिक सिंगने कोणतीही चूक न करता चेंडू अत्यंत सफाईदारपणे ‘बॉटम-लेफ्ट कॉर्नर’मध्ये धाडला आणि भारताची आघाडी ५-२ अशी भक्कम केली. या गोलमुळे भारतीय संघ सामन्यात पूर्णपणे सुरक्षित स्थितीत पोहोचला.

Maharashtra TimesIND vs SL : भारताकडून १६५ धावांनी पराभव; श्रीलंकेच्या हातून कुठे निसटली मॅच? भावुक कॅप्टन डी सिल्वाने सगळं सांगितलं

शेवटच्या क्वार्टरचा थरार अन् भारताचा विजय

शेवटच्या १५ मिनिटांच्या खेळाच्या सुरुवातीलाच (४६ व्या मिनिटाला) मिडफिल्डमध्ये भारताने चेंडू गमावल्याचा फायदा घेत पाकिस्तानने ‘काउंटर-अटॅक’ केला आणि हन्नान शाहीदने आपला दुसरा गोल करत धावसंख्या ५-३ अशी केली. सामन्याच्या अंतिम क्षणांमध्ये पाकिस्तानने अत्यंत आक्रमक खेळ करत सामन्यात परतण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, भारतीय बचावफळी आणि गोलकीपर सूरज करकेरा यांनी कमालीचा संयम दाखवत पाकिस्तानचे सर्व हल्ले परतवून लावले आणि भारताच्या ५-३ अशा शानदार विजयावर शिक्कामोर्तब केले.