मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “काँग्रेस हा दिशाहीन पक्ष झाला आहे. अलीकडच्या काळात या त्या पक्ष्यांमध्ये बोलघेवडे लोक आहे , बोलघेवड्या लोकांचा तो पक्ष झालेला आहे. या पक्षामध्ये सध्या बोलबच्चन करणारे लोक मोठ्या प्रमाणात भरले आहेत. रोज बोलायचे, माध्यमांसमोर वक्तव्य करायचे आणि त्यातून राजकीय वातावरण निर्माण करायचे, एवढेच काँग्रेसचे काम राहिले आहे. राहुल गांधी यांनी महिलांच्या अधिकारांबाबत स्टेजवरून मोठ्या प्रमाणात भाष्य केले. मात्र महिलांना राजकीय अधिकार मिळवून देण्यासाठी सर्वात क्रांतिकारी प्रयत्न म्हणजे महिला आरक्षण विधेयक आहे. संसदेत ३३ टक्के महिला खासदार पोहोचल्या पाहिजेत, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करत आहेत. मात्र राहुल गांधी या महिला आरक्षणाला विरोध करतात,” असा आरोप फडणवीस यांनी केला.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, चित्रा वाघ यांनी काल जो प्रश्न उपस्थित केला, त्याचे उत्तर राहुल गांधी यांनी आधी दिले पाहिजे, संविधानामध्ये संसदेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. संसदेत महिलांना ३३ टक्के प्रतिनिधित्व मिळावे, हा महिलांना अधिकार देण्याच्या दिशेने मोठा निर्णय आहे. महिला आरक्षणामुळे महिलांनाच राजकीय प्रतिनिधित्व मिळणार आहे. त्यामुळे त्याला विरोध करायचा आणि दुसरीकडे पुण्यात जाऊन महिलांच्या प्रश्नांवर भाषण करायचे, ही दुटप्पी भूमिका राहुल गांधी यांनी सोडली पाहिजे, असे फडणवीस म्हणाले.
दरम्यान, नागपुरातील ‘जेन झी’ कार्यक्रमाबाबत बोलताना फडणवीस यांनी या कार्यक्रमाला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचा दावा केला. हा कार्यक्रम सहभागाचा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम लोकांना जबरदस्तीने आणून आयोजित केलेला नव्हता, तर ऑरगॅनिक पद्धतीने तरुण तरुणींनी सहभाग घेतला. गेल्या काही दिवसांपासून विविध माध्यमांतून नागपूरमध्ये या कार्यक्रमाच्या अनुषंगाने स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. कोणालाही पैसे देऊन किंवा वाहनांची व्यवस्था करून गर्दी जमवण्यात आलेली नाही. तरुण-तरुणींनी स्वेच्छेने या कार्यक्रमात सहभाग घेतल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या ढोल-ताशा परंपरेचे प्रदर्शन करत चार हजारांहून अधिक युवक-युवती सहभागी झाले. जवळपास ५८५ ध्वजधारकांनी आपल्या पथकांसह सहभाग घेत नवीन विक्रम प्रस्थापित केल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. शिक्षण, कौशल्य, स्टार्टअप आणि कला या क्षेत्रांमध्ये तरुणांचा सहभाग वाढवणे आणि विकसित महाराष्ट्र तसेच विकसित भारताच्या निर्मितीसाठी तरुणांना योग्य दिशा देणे, हा कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
आदिवासी विद्यार्थी आंदोलनावरही फडणवीस यांनी काँग्रेसवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने मोठ्या प्रमाणात निर्णय घेतले असून, राज्यातील २० हजार विद्यार्थ्यांना अभ्यास, भोजन आणि निवासासाठी प्रत्येकी ६० हजार रुपये देण्याची योजना सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. राहुल गांधी यांच्या कार्यक्रमात बोललेल्या काही विद्यार्थ्यांची राजकीय पार्श्वभूमी तपासल्यास ते कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत, हे स्पष्ट होईल, असा दावाही त्यांनी केला.
एसआयआर प्रक्रियेबाबत फडणवीस यांनी ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याचे सांगितले. आक्षेप आणि शंकांवर पुन्हा तपासणी केल्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यामुळे पात्र मतदारांचा समावेश होण्यास मदत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघात २३ हजार मृत व्यक्तींची नावे आणि २० हजारांहून अधिक डुप्लिकेट नावे असल्याचा दावा करत मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी एसआयआर प्रक्रिया आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

