Headlines

CJP Jantar Mantar Protest: उधाण आणि उपाय – cjp delhi jantar mantar protest special explained


पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायद्याचे विधेयक आणि जलदगती न्यायालयांची घोषणा करून देशभरात उसळलेले वादळ शांत करण्यासाठी सरकारने काही पावले उचलली आहेत. पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्याने आता ही संघर्षाची गाडी संवादाच्या रुळावर तरी आली आहे. मात्र, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आंदोलक ठाम असल्याने ही कोंडी फुटली, असे आत्ताच म्हणता येणार नाही.

सरकारने संवादासाठी दोन पावले पुढे टाकली, हे स्वागतार्हच. विद्यार्थी नेत्यांशी झालेल्या चर्चेमध्ये त्यांच्या काही मागण्यांबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे. मात्र, प्रारंभीचे मौन, तरुण मुला-मुलींवर निर्दयी लाठीमार आणि राजीनाम्यास नकार अशा वातावरणात हे आंदोलन दिवसेंदिवस चिघळत गेल्याने नव्या उपाययोजनांमधून तरुणाईच्या वादळाला कितपत उतार पडणार, हा प्रश्नच आहे.

वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील (नीट) पेपरफुटीमुळे दिल्लीत पेटलेल्या ठिणगीतून आता देशभरात वणवा पेटला आहे. त्यातच दिल्लीत ‘पॅलेट गन’चा वापर किंवा मुंबईमध्ये मुलांच्या खिशात अमली पदार्थ ठेवण्याच्या पोलिसांच्या धमक्या अशा अगोचरपणाने विद्यार्थ्यांचा संताप अधिकच उफाळला असून देशभरात त्याची धग जाणवत आहे. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता दिसू लागल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमांतून संवाद साधला. त्यामध्ये पेपरफुटी रोखण्यासाठी कडक कायदा आणण्याची घोषणा त्यांनी केली. त्यानुसार सार्वजनिक परीक्षा (अनुचित साधनांना प्रतिबंध) या कायद्यात दुरुस्ती करून गुन्हेगारांना दहा वर्षे तुरुंगवास आणि दहा कोटी रुपयांपर्यंत दंडाच्या शिक्षेची तरतूद प्रस्तावित आहे. जलदगती न्यायालयांच्या स्थापनेचेही नियोजन आहे.

दुसरीकडे वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्याने एका आघाडीवर सरकारने सुस्कारा सोडला; तसेच केंद्रीय मंत्री आणि कॉक्रोच जनता पक्षाच्या नेत्यांच्या चर्चेच्या पहिल्या फेरीत ‘नीट’मधील गैरप्रकारांमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबास अर्थसाह्य आणि दिल्लीतील आंदोलनामध्ये दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यास सरकारने तत्त्वत: मान्यताही दिली . मात्र, प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आंदोलक ठाम आहेत; तर राजीनामा हा उपाय नसल्याची सरकारची भूमिका आहे.

गेल्या २६ दिवसांत विद्यार्थीवर्गातून प्रचंड दबाव असल्याने मुख्य मागणी मान्य न होता माघार घेणे विद्यार्थी नेत्यांसाठीही सोपे नाही. एकीकडे सरकार कठोर कायद्यांची घोषणा करीत असले, तरी उत्तराखंडमध्ये कालच नव्याने आणखी एक पेपरफुटीचा प्रकार घडला; तसेच दोन वर्षांपूर्वीच्या ‘नीट’च्या पेपरफुटीचा सूत्रधार म्हणवला गेलेल्या संजीव मुखियालाच केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ‘पुराव्याअभावी’ ‘क्लीन चिट’ दिली. त्यामुळेच कठोर कायदे केले, तरी पेपरफुटी रोखण्यासाठी ते किती पुरे पडणार, याबाबत शंकाच आहे.

मुळात हे आंदोलन कोणा एका नेत्याच्या आदेशावर चालणारे संघटित आंदोलन नाही, हे लक्षात घ्यावे लागेल. देशभरातील विद्यार्थी वर्गाच्या आंदोलनामध्ये काही वेळा अनुभव-नियोजनाची कमी दिसून आली, तरी त्यात उत्स्फूर्ततेचा भाग अधिक आहे, ही गोष्ट ठायीठायी जाणवते. रस्त्यांवरील निदर्शनांइतकाच समाजमाध्यमांतून पडणारा ‘रील्स’चा पाऊस, हे सरकार खडबडून जागे होण्याचे खरे कारण आहे. नव्या पिढीची बिनधास्त भाषा आणि कोणाचाही मुलाहिजा न ठेवण्याचा पवित्रा यांमुळे भल्याभल्यांची भंबेरी उडाली आहे. या मुलांच्या भाषेत काही वेळा आक्षेपार्ह शब्द आणि आशय आढळल्याने अनेकांना सांस्कृतिक धक्के बसणे आणि त्यावर टीकाही होणे साहजिक आहे. मात्र, केवळ ‘अराजक’ म्हणून त्याला सोडून देणे, ही फसगत ठरेल.

शिक्षण-परीक्षा पद्धतीतील त्रुटी-गैरप्रकारांमुळे आलेले नैराश्य आणि भविष्याबाबतची अनिश्चितता यांतून व्यवस्थेवरचाच विश्वास उडाल्याचे हे निदर्शक आहे. केवळ पोलिस कारवाईतून त्याचे दमन करता येणार नाही. तरुण रक्ताला परिणामांची भीती वा पुरेशी जाणीव नसते, त्यातून अशा प्रतिक्रिया उमटतात, हे वडीलधाऱ्यांनी समजावून घेतले पाहिजे आणि या उद्रेकाचे ऊर्जेत रूपांतर करण्यासाठी त्यांचा विश्वास कमावला पाहिजे. आज ना उद्या ‘नीट’ सारख्या प्रश्नांतून मार्ग निघेलही, पण भविष्यात नव्या पिढील गृहीत धरता येणार नाही, हा धडा या आंदोलनाने दिला.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत