Nashik Heavy Rain: गोदावरी नदीच्या पाणीपातळीत सलग दोन दिवस मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाढ झाली. यामुळेच निफाडमधील चांदोरी व सायखेड्यात पूरस्थिती तयार होऊन सातशे कुटुंबांना स्थलांतर करावे लागले.

पूरग्रस्त भागात जाऊन नागरिकांच्या परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली
या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदमचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार व ग्रामीणच्या अपर पोलिस अधीक्षक विमला एम. यांनी पूरग्रस्त भागाला प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची सविस्तर पाहणी केली. पूरग्रस्त भागात काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहनांची वाहतूक शक्य नसल्याने सीईओ पवार यांनी ट्रॅक्टरवरून पूरग्रस्त भागात जाऊन नागरिकांच्या परिस्थितीची प्रत्यक्ष माहिती घेतली. नदीकाठच्या व बाधित वस्त्यांची पाहणी करून स्थानिक प्रशासनाकडून सुरू असलेल्या मदत व बचाव कार्याचा आढावा घेण्यात आला.
अन्नधान्य व इतर मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश
यानंतर सर्व विभाग प्रमुख, आपत्ती व्यवस्थापन समिती तसेच संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत पूरग्रस्त नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या. स्थलांतरित नागरिकांना तात्पुरता निवारा, स्वच्छ पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा, स्वच्छता, अन्नधान्य व इतर मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले. महसूल, ग्रामपंचायत, आरोग्य, पोलिस आणि इतर सर्व विभागांनी समन्वयाने काम करून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती प्रभावीपणे हाताळावी, असेही यावेळी सांगण्यात आले.
तातडीने पंचनामे करा, अशी मागणी व्यावसायिकांसह स्थानिक नागरिकांनी केली
ग्रामपंचायतीमार्फत सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आलेल्या कुटुंबांची भेट घेऊन त्यांच्या राहण्याच्या व इतर आवश्यक सुविधांची पाहणी करण्यात आली.तातडीने पंचनामे करा पूर ओसरताच स्थानिक प्रशासनाने चांदोरी चौफुली ते बाजार तळ परिसरातील सायखेडा येथील नुकसान झालेल्या व्यावसायिकांच्या अस्थापनांचे सरसकट पंचनामे करावेत, अशी मागणी व्यावसायिकांसह स्थानिक नागरिकांनी केली आहे.

