Headlines

Chandrakant patil statement claim to link fingerprints on stones with aadhaar card attack from shivsena ravindra dhangekar; दिल्ली आंदोलनातील दगडांवरचे ठसे आधारकार्डशी लिंक केले जाणार; धंगेकरांनी हटके स्टाइलमध्ये घेतली चंद्रकांतदादांची फिरकी


Shivsena Ravindra Dhangekar: पुण्यात पुन्हा एकदा रवींद्र धंगेकर विरुद्ध भाजप असा संघर्ष उफाळून येत असल्याचं दिसत आहे.

chandrakant patil
धंगेकरांनी हटके स्टाइलमध्ये घेतली चंद्रकांतदादांची फिरकी(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अभिजीत दराडे, पुणे : नीट पेपर फुटीनंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली होती. याच मुद्द्याला धरून दिल्लीतील जंतर मंतर मैदानात कॉक्रोच जनता पार्टीने पुकारलेल्या आंदोलनाला देशभरातील तरुणांनी जोरदार पाठिंबा दिला होता. याच आंदोलनादरम्यान दिल्लीतील संसद मार्ग परिसरात ‘चलो संसद’ मोर्चादरम्यान पोलिसांकडून निष्ठूर लाठीचार्ज करण्यात आला होता. यावरच भाजप नेते आणि राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचं एक विधान सध्या कमालीचे चर्चेत आहेत. ‘आंदोलनामध्ये जे दगड वापरले गेले होते, त्याच्यावरचे ठसे आधारकार्डशी लिंक केले जाणार असून त्याआधारे तपास केला जाणार आहे’, असं अजब विधान चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलताना केले होते. यावरून आता चंद्रकांत पाटील हे विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. इतकंच नाही तर सत्तेत सहभागी असणाऱ्या शिवसेना नेत्यानेही चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे पुणे महानगरप्रमुख आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला आहे. “वाय झेड सेक्युरिटी असलेल्या माणसाची बुद्धिमत्ता वाय झेड झाल्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे चंद्रकांतदादा. अतिशय बुद्धिमान वैज्ञानिकांना सुद्धा प्रश्न पडावा अशी तल्लख बुद्धी चंद्रकांतदादांना लाभली आहे. आमच्या पुणेकरांचे भाग्य आहे की असा आमदार आम्हाला लाभला आहे आणि त्याहून मोठे भाग्य आपल्या राज्याचं आहे की अशी व्यक्ती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आहे. माझी विनंती आहे चंद्रकांतदादांनी दगडावरचे फिंगरप्रिंट आधार कार्डला लिंक करून दाखवावे, नाहीतर दादांचा सुद्धा राजीनामा घ्यायला काही हरकत नाही. आपल्या मुलांचे भवितव्यापेक्षा जास्त महत्त्वाचं काहीच नाही,” असं म्हणत रवींद्र धंगेकर यांनी चंद्रकांत पाटलांना फैलावर घेतले आहे.

रवींद्र धंगेकर आणि पुणे भाजपमधील नेत्यांचा संघर्ष तसा जुना आहे. धंगेकर काँग्रेसमध्ये असताना अनेक वेळा हा संघर्ष झाला होता. मात्र पुढे धंगेकरांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर हा संघर्ष कमी होईल असा अंदाज बांधला जात होता. परंतु त्यानंतर देखील हा संघर्ष अनेक वेळा पाहायला मिळाला आहे. नुकतेच रवींद्र धंगेकर यांच्यावर एका व्यावसायिकाच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. रवींद्र धंगेकर यांनी यामागे नाव न घेता चंद्रकांत पाटील हेच असल्याचे बोलून दाखवलं होतं. इतकंच नाही तर काल झालेल्या महानगरपालिकेवरील आंदोलनादरम्यान सुद्धा रवींद्र धंगेकर यांनी महापालिकेत भ्रष्ट कारभार सुरू आहे आणि याचा पैसा कोथरूड मार्गे मुंबईला जात असल्याची टीका केली होती.

संजय राऊतांनीही चंद्रकांत पाटलांना घेरलं

चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर रवींद्र धंगेकर हेच नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सुद्धा जोरदार टीका केली आहे. “चंद्रकांत पाटील यांना एखाद्या जागतिक विज्ञान विद्यापीठाचं कुलगुरू करता येईल का, याचा शोध घेणं गरजेचं आहे. कारण इतका मोठा शोध आत्तापर्यंत कोणीही लावला नव्हता. दगडावरच्या हातांचे ठसे घेऊन, ते आधार कार्डला लिंक करायचे, आधार कार्डाचा शोध केला ते नंदन निलेकणी जे आहेत, ते हा शोध ऐकून 2 दिवस कोमात गेले, काय करावं ते काही त्यांना सुचत नाही. मला कसं नाही हे समजलं,” असं म्हणत संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना खोचक टोला लागवला आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा