Headlines

Bhuvneshwar Kumar opens up on Team India comeback and transition phase virat kohli ravi shastri ; माझी निवड का होत नाही, मी कुठे चुकलो? विचारच सोडला! भुवीचं टीम इंडियातील कमबॅकवर पहिल्यांदाच थेट भाष्य


Bhuvneshwar Kumar On Team India Comeback : आयपीएल २०२६ मधील धमाकेदार कामगिरीनंतर भुवनेश्वर कुमारने टीम इंडियातील पुनरागमनावर मौन सोडले आहे. त्याने आरसीबी पॉडकास्टमध्ये या सगळ्यावर भाष्य केले आहे. भुवी नेमकं काय म्हणाला?

bhuvneshwar kumar
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारतीय संघात सध्या बदलाचा काळ सुरू आहे. तरुण खेळाडूंना संधी दिली जात असली तरी चाहत्यांना मात्र जुन्या खेळाडूंची आठवण येत आहे. त्यातच मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार या दोन स्टार गोलंदाजांची नावे सातत्याने चर्चेत आहेत. आयपीएल २०२६ मध्ये १६ सामन्यांत २८ विकेट्स घेऊन दुसऱ्या क्रमांकाचा यशस्वी गोलंदाज ठरलेल्या भुवनेश्वर कुमारने आता भारतीय संघात पुनरागमन करण्यावर एक अत्यंत महत्त्वाचे विधान केले आहे.

संघात पुनरागमनाबद्दल काय म्हणाला भुवी?

आरसीबी पॉडकास्टमध्ये बोलताना भुवनेश्वर कुमारने सांगितले की, आता भारतीय संघात पुनरागमन करण्याबाबत त्याच्या मनात कोणताही विचार चालत नाही. भुवी म्हणाला, “मी पूर्णपणे शांत आहे. याचे श्रेय मी माझ्या कुटुंबाला देईन. माझ्या घरी क्रिकेटवर अजिबात चर्चा होत नाही. माझी संघात निवड का झाली नाही किंवा माझी कुठे चूक झाली, असा विचार मी करत नाही. म्हणूनच आज माझ्या मनात कोणताही पश्चात्ताप नाही.”

“खेळाडूंचा एक काळ असतो”

संघातील बदलांवर बोलताना भुवीने स्पष्ट केले की, “खेळाडूंचा एक काळ असतो. जुन्या खेळाडूंची जागा तरुण खेळाडू घेतात आणि हा खेळाचाच एक भाग आहे. माझ्याआधीही अनेकांसोबत हे घडले आहे आणि माझ्या नंतरही घडेल. हीच खेळाची खरी सत्यता आहे. मी जिथे आहे तिथे खूप आनंदी आहे.”

Maharashtra TimesIND vs SL : टीम इंडियाला मोठा धक्का! जसप्रीत बुमराह श्रीलंका कसोटी खेळणार नाही, त्याच्याजागी धाकड गोलंदाज घेणार एन्ट्री

“आता खेळावर प्रेम!”

भुवीने पुढे सांगितले की, “मी भारतासाठी खेळलो आहे. पुन्हा संधी मिळाली तर चांगलीच गोष्ट आहे, पण आता मी फक्त क्रिकेटवर प्रेम आहे म्हणून खेळत आहे. मी डोमेस्टिक क्रिकेट, यूपी टी२० लीग आणि आयपीएल खेळत राहतो, जेणेकरून मी मॅचसाठी तयार राहीन. आधी माझे ध्येय टीम इंडियासाठी खेळणे हे होते, पण आता मला क्रिकेटचा खरा अर्थ समजला आहे, ‘कंट्रोल द कंट्रोलेबल्स’ आणि खेळाचा आनंद घ्या.”

Maharashtra TimesAjinkya Rahane Pension : अजिंक्य रहाणेला निवृत्तीनंतर महिन्याला पेन्शनमध्ये BCCIकडून किती पैसे मिळणार? कोणत्या खेळाडूंना पेन्शन लागू होत नाही?

विराट कोहली आणि रवी शास्त्रींना दिले श्रेय

भारतात तयार झालेल्या ‘पेस बॉलिंग रेव्होल्यूशन’चे श्रेय भुवीने विराट कोहली आणि रवी शास्त्री यांना दिले आहे. तो म्हणाला की, “विदेशी भूमीवर जाऊन जिंकणे आणि एक मजबूत फास्ट बॉलिंग अटॅक तयार करणे, हा विराट आणि रवी शास्त्रींचा स्पष्ट दृष्टिकोन होता. त्या काळात भारतातही वेगवान गोलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्ट्या तयार केल्या गेल्या, ज्यामुळे परदेशात खेळण्याची चांगली तयारी झाली.” याशिवाय माजी क्रिकेटपटू प्रवीण कुमारनेही कारकिर्दीत खूप मदत केल्याचे भुवीने नमूद केले.