Headlines

Anuj Prabhu : ‘खूप नर्व्हस होतो, राज ठाकरे आणि आनंद दिघेंचं राजकारणाव्यतिरिक्त नातं दाखवायचं होतं’, अनुज प्रभूनं सांगितला ‘धर्मवीर’ सिनेमाचा किस्सा


Anuj Prabhu : अनुज प्रभूनं ‘धर्मवीर’ या सिनेमात राज ठाकरेंची भूमिका साकारली होती. आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेत्यानं भूमिका साकारण्याचा अनुभव सांगितला आहे.

Anuj Prabhu On His Raj Thackeray Role In Dharmaveer Movie
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – मराठी अभिनेता अनुज प्रभू सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेमध्ये विश्वाची भूमिका साकारत असून त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. अनुजनं यापूर्वी काही सिनेमांमध्येही काम केलंय. त्यापैकी एक म्हणजे प्रवीण तरडे यांचा ‘धर्मवीर’ हा सिनेमा. ‘धर्मवीर’ सिनेमामध्ये अनुजनं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका साकारली होती. अशातच आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेत्यानं राज ठाकरेंची भूमिका साकारण्याचा अनुभव सांगितला आहे.

अनुज प्रभूनं सांगितला किस्सा

‘धर्मवीर’ सिनेमातील भूमिकेबद्दल बोलताना अनुज म्हणाला की, ‘मी खूप नर्व्हस होतो. ज्यावेळी मला कळलं की, मी राज ठाकरे साहेबांच्या भूमिकेचं ऑडिशन देतोय, तेव्हाच नर्व्हस होतो. मी पुण्यात होतो आणि तिथून ठाण्यात जात होतो. प्रवासात असताना खूप विचार डोक्यात येत होते. ऑडिशनलाच मी पहिला जो टेक दिला, तो मिमिक्रीकडे जाणारा टेक होता. राज ठाकरे यांच्या भाषणाचा प्रभाव खूप दिसत होता. कास्टिंग डायरेक्टर शंतनू म्हणाला की, जरा मिमिक्रीकडे जातंय. त्याने मला खूप चांगलं उदाहरण दिलं. तो म्हणाला, ‘संजू सिनेमामध्ये रणबीर कपूरने संजय दत्तची मिमिक्री केली नाहीये. त्याने आपला संजू साकारलाय. तो संजय दत्तचा आवाज मिमिक करायला अजिबात जात नाही. तो आवाज रणबीरचाच आहे. ते आपल्याला कळतं. तरीही आपल्याला कळतं की, तो संजू आहे.’

Celebrity Corner : धर्मवीरमधले राज ठाकरे ते लक्ष्मी निवासचा विश्वा, गोव्याच्या अनुज प्रभू सोबत गप्पा

‘मग मी विचार केला आणि तशी तयारी केली. सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी अनेक दिग्गज कलाकार होते आणि त्यांच्यासोबत काम करताना नर्व्हस होतो. ‘धर्मवीर’ सिनेमामध्ये राज ठाकरे आणि आनंद दिघे यांचा जो सीन आहे, त्यात जास्त फोकस राज ठाकरे यांच्यावर आहे, त्यामुळे प्रेक्षकांपर्यंत ते पोहोचवायचं होतं. पण, प्रवीण सरांनी मला समजावलं आणि म्हणाले, ‘राज ठाकरे आणि आनंद दिघे यांचं राजकारणाव्यतिरिक्त पण चांगलं नातं होतं, ते दाखवायचंय.’ एखाद्या दिग्दर्शकाने एवढं समजावणं ही खूप मोठी गोष्ट आहे. पहिल्यांदा चुका झाल्या, पण नंतर सीन शूट केला’ असं अभिनेत्यानं शेवटी सांगितलं.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा