Kalyan Water Cut: टँकरचालकांनी अवाच्या सवा दर आकारत नागरिकांची लूट चालवली आहे. त्यामुळे घोटभर पाणी मिळवण्यासाठी नागरिक कासावीस होत आहेत.

एकीकडे सलग ७ दिवस झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालेले असताना कल्याण डोंबिवली शहराला मात्र घोटभर पाणी मिळणे मुश्कील झाले आहे. रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे पालिकेच्या मोहिली १०० एम एलडी आणि मोहने १४४ एमएलडी या दोन्ही पम्पिंग स्टेशनमध्ये पाणी शिरले. गाळाचा उपसा होईपर्यंत हे दोन्ही प्लांट बारा तास बंद ठेवावे लागले. त्यानंतर मोहिलीचा पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. यामुळे कल्याणातील योगीधाम, रामबाग यासह डोंबिवली शहराला पाणी उपलब्ध झाले असले, तरी कल्याण पूर्व पश्चिम शहर मात्र तहानेने व्याकूळ झाले.
Thane News : आक्राळविक्राळ पाऊस अन् जीवघेणी हवा, वृक्ष कोसळले, जखमी पांडुरंगांची झुंज अपयशी, भुवड कुटुंबावर दु:खाचा डोंगर
मोहने पम्पिंग स्टेशन कडून बारावे प्लांटकडे जाणारी मुख्य जलवाहिनी नदी पात्रात फुटली. सलग दोन दिवस नदी पात्रातील पाण्याच्या वेगवान प्रवाहांमुळे दुरुस्तीत अडथळे निर्माण झाले. केडीएमसीच्या जलवाहिनी लगत असलेल्या स्टेमच्या १८५० मिमी व्यासाच्या नव्या जलवाहिनीला केडीएमसीची जलवाहिनी कापून जोडण्यात आली. हे काम मागील दोन दिवसांपासून अहोरात्र सुरू होते. तीन दिवसांपासून पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी जलवाहिनी दुरुस्तीसाठी ठाण मांडून बसले होते.
वापरासाठी लागणारे पाणी मिळविण्यासाठी टँकरचा आधार घेतला जात असला, तरी टँकरचालकांनी दोन ते अडीच हजारात बोअरिंग किंवा विहिरीच्या पाण्याचा टँकर देत नागरिकांची लूट चालवली आहे. मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांनी पावसाच्या पाण्याचा वापर केला.
Thane Accident: घोडबंदर रोडवर भीषण दुर्घटना! रिक्षावर टँकर कोसळून चालकासह दोघांचा करुण अंत; एक गंभीर
सातत्याने फोन
घोटभर तरी स्वच्छ पाणी मिळणार आहे का? अशी विचारणा करण्यासाठी लोकप्रतिनिधी, पालिका कर्मचारी आणि पत्रकारांना नागरिक सतत फोन करत होते. महापौर हर्षाली थवील यांच्यासहनगरसेविका हेमलता पवार, नगरसेवक महेश गायकवाड, मधुर म्हात्रे, माजी नगरसेवक रवी पाटील यांनी घटनास्थळी पाहणी करत नागरिकांना संयम ठेवण्याचे आवाहन केले.
पाणी संपल्याचे फलक
नागरिकांना पिण्याचे पाणी टँकरद्वारेदेखील बारावे प्लांटवरूनच पुरवले जात असून, हा प्लांटच बंद असल्याने पिण्याचे पाणी मिळण्याचे स्त्रोत बंद झाले. यामुळे नागरिकांना विकतच्या पाण्याच्या बाटल्यांचा आधार घ्यावा लागला. बाटल्या खरेदीसाठी कालपासून दुकानात झुंबड उडाली आहे. चौथ्या दिवशी अनेक दुकानांत पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याचे चक्क बोर्ड लावण्यात आले आहेत.

