Headlines

Heavy to Heavy Rainfall in Kalyan And Dombivli People Face Many Problems


कल्याण आणि डोंबिवली शहरांत मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शीळफाटा परिसरात तर अनेक वाहनं पाण्याखाली गेले आहेत. विशेष म्हणजे रात्रीपासून सुरु झालेला मुसळधार पाऊस अजूनही सुरुच आहे. त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.

Kalyan Dombivli Rain
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
ठाणे : कल्याण आणि डोंबिवली शहरांमध्ये पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातलेला बघायला मिळत आहे. या दोन्ही शहरांमध्ये मंगळवारी दिवसभर संततधार आणि अधूनमधून मुसळधार पडत होता. हळूहळू रिमझिम पावसाचे रुपांतर मुसळधार पावसात झाले. मंगळवारी रात्री मुसळधार पावसाला सुरुवात झाली. रात्रीभर मुसळधार पाऊस पडला. यानंतर सकाळी 9 वाजेच्या सुमारास त्याने अर्ध्या तासांसाठी उसंत घेतली. पाऊस आता पडणार नाही असं वाटत असतनाच अचानक पुन्हा पावसाचे ढग दाटून आले. शहरावर काळोख निर्माण झाला आणि पुन्हा जोरदार पावासाला सुरुवात झाली. तेव्हापासून आतापर्यंत प्रचंड मुसळधार पाऊस पडत आहे. त्याचा परिणाम आता शहरात बघायला मिळत आहे.

शिळफाटा परिसरात भयानक दृश्य

कल्याण-डोंबिवलीत सुरु असलेल्या पावसामुळे शिळफाटा परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. विशेष म्हणजे रस्त्यालगत उभ्या असलेले चारचाकी वाहनं हे जवळपास पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे. तसंच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचल्यामुळे इथे वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. तसेच पावसामुळे शीळरोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी पावसाचे व्हिडीओ शेअर करत निशाणा साधला आहे.

Kalyan News

राजू पाटील नेमकं काय म्हणाले?

“कल्याण-शीळ रस्ता आणि शिळफाटा भाग MMRDA तसेच MSRDC ने नालेसफाई न केल्यामुळे तसेच जुने नैसर्गिक नाले, त्यावर झालेली अनधिकृत बांधकामं यावर निर्णय न घेतल्याने महानगरपालिकेच्या कृपेने पुर्णपणे पाण्याखाली गेल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. एकंदरीतच संपूर्ण MMR मध्ये कमी-अधिक प्रमाणात हीच परिस्थिती आहे. त्यामुळे लोकांची ‘राजाने मारले व पावसाने झोडले’ अशी गत झाली आहे”, अशी टीका राजू पाटील यांनी केली. दरम्यान, पाण्यात अडकलेली वाहनं आता काढण्याचे काम सुरु आहे.

कल्याण पूर्व परिसरात सखल भागांमध्ये पाणी साचले

कल्याण आणि डोंबिवलीत सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. कल्याण पूर्वेत आडीवल, ढोकळी भागात घरांमध्ये पाणी शिरल्याची माहिती समोर आली आहे. तसेच कल्याण पूर्वेत अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने पाणी साचले आहे. मुसळधार पावसामुळे कल्याण आणि डोंबिवली या दोन्ही शहरांमध्ये वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे.

मुंबई-नाशिक महामार्ग जाम

फक्त कल्याण-डोंबिवली नाही तर अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, भिवंडी या परिसरातही जोरदार पाऊस पडत आहे. त्याचा परिणाम मुंबई-नाशिक महामार्गावर बघायला मिळत आहे. भिवंडी बायपास येथून मुंबईच्या दिशेला जाणाऱ्या मार्गाला प्रचंड मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. वाहनांच्या अनेक किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. अनेक तास वाहनं एकाच ठिकाणी रखडून पडले आहेत.

पाऊस थांबायचं नाव घेईना, पुन्हा जोर वाढला

विशेष म्हणजे कालपासून सुरु झालेला पाऊस आजही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. याउलट तो आणखी मुसळधार स्वरुपात पडत आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवली शहरातील नागरिकांची चिंता वाढली आहे. मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे थोड्या वेळासाठी पाऊस थांबला तर बरं होईल, अशी आशा नागरिकांची आहे. थोडा वेळ पाऊस थांबला तर पावसाच्या पाण्याचा निचरा होईल. त्यामुळे नागरिकांना पाऊस थांबण्याची आशा आहे. पण पाऊस थांबण्याच्या ऐवजी पुन्हा जोरात पडताना दिसत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक चिंतेत आहेत.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा