MPSC New Exam System: ‘एमपीएससी’ च्या परीक्षाही विलंब आणि गैरप्रकारांवरून अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडतात. त्या पार्श्वभूमीवर रेल्वे, जेईईसारख्या राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा आणि केरळ-तेलंगण, बिहार आणि कर्नाटकासारख्या काही राज्यांच्या धर्तीवर हे बदल होत आहेत.
mpsc(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) आपल्या परीक्षा पद्धतीत काही बदल करण्याबाबत घेतलेला निर्णय, या प्रक्रियेत सुधारणांसाठी महत्त्वपूर्ण ठरावा. विशेषत: भावी डॉक्टरांपासून ते भावी शिक्षकांपर्यंतच्या अनेक परीक्षांना पेपरफुटीसह अनेक अनियमिततांनी ग्रासलेले असताना हे पुढचे पाऊल ठरते. त्यामध्ये सर्व संवर्गाच्या पूर्वपरीक्षा या संगणकाधारित (सीबीटी) पद्धतीने घेण्यात येणार आहेत. त्याशिवाय परीक्षेनंतर २१ दिवसांत निकाल जाहीर करण्याचे नियोजन आणि एका वर्षात एकाहून अनेक संधी ही या सुधारणांची प्रमुख वैशिष्ट्ये. नुकताच ‘नीट’ पेपरफुटीमुळे गदारोळ माजला; त्यातच शिक्षकांसाठी घेतल्या जाणाऱ्या ‘टीईटी’मध्येही पेपर फुटले.
पूर्वपरीक्षा संगणकाद्वारे घेतल्याने पेपरफुटीची शक्यता कमी होऊ शकते; त्याबरोबरच संगणकीय मूल्यमापन अचूक होऊन उत्तरपत्रिका तपासणीही वेगाने आणि पारदर्शकतेने होऊन निकाल वेळेत लावणे शक्य होईल. परीक्षेनंतर रखडणारे निकाल, हा टीकेचा विषय असल्याने आता २१ दिवसांत निकाल जाहीर करण्याचे नियोजन, हा सर्वांत महत्त्वाचा बदल आहे. त्याबरोबरच या प्रक्रियेतील सरळीकरणाबाबत (नॉर्मलायझेशन) ‘आयआयटी’ आणि राज्य सरकारच्या सांख्यिकी विभागाकडून सूत्र निश्चित होणार आहे.
सध्या काही लाख उमेदवार या परीक्षा देतात. त्यांच्यासाठी ठिकठिकाणी संगणकांची व्यवस्था, त्यात ऐन वेळी बिघाड होऊ नये, यासाठी तांत्रिक साह्य, ग्रामीण भागात अखंडित वीजपुरवठा आणि तांत्रिक ज्ञान असलेले मनुष्यबळ, ही खबरदारी मात्र घ्यावी लागेल. त्याशिवाय संगणकाद्वारेसुद्धा हॅकिंगसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी कडेकोट सुरक्षा बाळगण्याची गरज आहे. त्याशिवाय अन्य राज्यांप्रमाणेच मुख्य परीक्षांमधून ऐच्छिक विषय वगळण्याचीही मागणी अनेक घटकांमधून करण्यात येत होती.
आता एका वर्षात एकाहून अनेकदा या परीक्षा घेण्यामुळे एकदा परीक्षा दिल्यानंतर पुढील संधीसाठी पुढच्या वर्षाची वाट पाहणे टळेल. एकंदरीत, या सुधारणा अचूकता, पारदर्शकता आणि कार्यक्षमतेच्या दृष्टीने आवश्यक असल्या, तरी आपल्या यंत्रणा हे शिवधनुष्य कसे पेलणार, हे महत्त्वाचे आहे.
किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.
शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा