म. टा. वृत्तसेवा, निफाड: देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचे वाढलेले दर नियंत्रणात आणून ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण निधीअंतर्गत नाफेड आणि ‘एनसीसीएफ’च्या माध्यमातून १५ मेपासून दोन लाख टन कांदा खरेदीची मोहीम हाती घेतली. मात्र, कोट्यवधी रुपये खर्च करून खरेदी केलेला कांदा सडल्याचे धक्कादायक वास्तव लासलगाव येथे समोर आले आहे. मनमाड रोडवरील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात मोठ्या प्रमाणावर कांदा सडला असून, किडे-अळ्या लागलेल्या कांद्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. सडलेल्या कांद्यातून काळपट, दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असल्याने बफर स्टॉकला बफर शॉक बसल्याचे चित्र आहे.
या मोहिमेत साडेतीन महिन्यांत सुमारे एक लाख २० हजार टन कांद्याची १,२३५ ते २,३४५ रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करण्यात आली. नाशिक जिल्ह्यातील विविध गोदामांमध्ये हा कांदा साठवण्यात आला आहे. यापूर्वी चांदवड येथील गोदामातील निकृष्ट व सडलेल्या कांद्याचा प्रश्न समोर आला होता.
दिल्लीसह प्रमुख महानगरांत कांद्याचे किरकोळ दर ६० ते ७० रुपये किलोपर्यंत पोहोचल्याने बफर स्टॉकमधील कांदा दिल्ली, गुवाहाटी, चेन्नई, कोलकाता आणि कोची येथे पाठवण्यात येत आहे. मात्र, सडलेल्या कांद्याची प्रतवारी करून चांगला कांदा वेगळा करण्याचे काम मजुरांना दुर्गंधीयुक्त वातावरणात करावे लागत आहे.
कांद्याची ‘चेन्नई एक्स्प्रेस’ मनमाडहून रवाना
एकीकडे कांद्याच्या दरात वाढ होत असताना कांद्याच्या भावावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर कांदा खरेदी करण्यावर भर देण्यात येत आहे. लासलगावपाठोपाठ मनमाड रेल्वे स्थानकातून शुक्रवारी (दि. २८) मध्यरात्री तब्बल ८०० टन कांदा विशेष मालगाडीने चेन्नईकडे रवाना करण्यात आला.
Samruddhi Mahamarg Robbery | समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत,नेमकं काय घडलं?
नासाडीची चौकशी करण्याची मागणी
सरकारने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला कांदा गोदामातच सडत असेल, तर साठवणूक व्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. कांदा किती प्रमाणात खराब झाला, साठवणुकीत कोणती खबरदारी घेण्यात आली आणि सरकारचे किती आर्थिक नुकसान झाले, याची तातडीने चौकशी करून दोषी यंत्रणेची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी होत आहे.
हे तीन मुद्दे ऐरणीवर…
१.२० लाख टन कांदा खरेदी; मात्र गोदामात आढळला सडलेला साठा
दुर्गंधी, किडे-अळ्यांमुळे कांदा हाताळणीचा प्रश्न, सुरक्षा साधनांचा अभाव
नुकसान किती आणि जबाबदार कोण, याचा खुलासा करण्याची मागणी
किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.
शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा