Nagpur Airport News: विमानांना पक्षी धडकण्याचा घटना घडतात पण नागपूर विमानतळावरुन पक्षी विमानांना धडकण्याच एक वेगळच कारण समोर आल आहे.विमानतळाच्या आजूबाजूला असलेला बेकायदा मटन बाजार अस्ताव्यस्त कचरा आणि उंच इमारती या घटनांना कारणीभूत ठरत आहे.यामुळे प्रवाशांचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे.

बेकायदा मटण बाजार आणि आठवडी बाजार हे विमानांसाठी मोठे संकट
विमानाच्या उड्डाण सुरक्षितता क्षेत्राच्या अगदी जवळ असलेला बेकायदा मटण बाजार आणि आठवडी बाजार हे विमानांसाठी मोठे संकट ठरत आहेत. या बाजारातील खाद्यपदार्थ आणि परिसरात पसरलेला कचरा पक्ष्यांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करतो. यामुळे विमानांना पक्षी धडकण्याच्या घटना घडतात. अलीकडेच अशा दोन घटना घडल्याने या चिंतेत भर पडली आहे.
ऑक्सिजन पार्क भविष्यात स्थानिक स्थलांतरित पक्ष्यांना आकर्षित करणार
याव्यतिरिक्त,मटण बाजारात उपलब्ध असलेल्या अन्नामुळे भटके कुत्रे आकर्षित होतात व काही वेळा ते थेट विमानतळाची धावपट्टी ओलांडतानाही दिसतात, जे विमानासाठी अत्यंत घातक ठरू शकते. विमानांच्या उड्डाण आणि ये-जा करण्याच्या मार्गावर उभारण्यात आलेल्या बहुमजली इमारती विमानांसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहेत. तसेच, नव्याने सुरू झालेल्या महामार्गावरील ऑक्सिजन पार्क भविष्यात स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांना आकर्षित करणार आहे.
पक्षी धडकण्याच्या घटनांचे केंद्र
त्यामुळे तेथे पक्षी धडकण्याच्या घटनांचे केंद्र बनण्याची शक्यता आहे. याशिवाय विमानतळालगतच्या २७१ हेक्टर जमिनीवर प्रस्तावित असलेल्या व्यावसायिक, औद्योगिक आणि निवासी विकासामुळे सुरक्षेचे नियोजन अधिक आव्हानात्मक ठरणार आहे.
व्हाव्यात नियमित समन्वय बैठका
सध्या नागपूर विमानतळावरून देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय मार्गांवर सेवा उपलब्ध असून दररोज सुमारे ३१ ते ३५ उड्डाणे हाताळली जातात. विमानांची आणि प्रवाशांची संख्या वाढत असताना अपघाताची शक्यताही वाढते. मात्र, नागपूर महानगरपालिका हा मटण बाजार स्थलांतरित करण्यात आणि कचरा व्यवस्थापन करण्यात अद्याप अपयशी ठरली आहे.
मनपाच्या संबंधित विभागाचे दुर्लक्ष
इमारतींच्या उंचीबाबत असलेल्या नियमांकडे मनपाच्या संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विमान वाहतूक सुरक्षित करण्यासाठी मनपा, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड, हवाई वाहतूक नियंत्रण आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालय या सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. नियमित समन्वय बैठका आयोजित करणे आवश्यक आहे, याकडे ग्रुप कॅप्टन (निवृत्त) विजय हरदास यांनी लक्ष वेधले आहे.

