Amravati District Hospital NICU Fire Infants Death Father Cry over telling Mother; बाळ गेल्याचं आईला कुठल्या शब्दात सांगू? अमरावतीत अर्भकमृत्यू, बापाचा काळीज चिरणारा सवाल; आमचं लेकरु आहे तसं द्या, पोस्टमार्टम नको, कुटुंबांचा टाहो
Amravati District Hospital NICU Fire Infants Death Father Cry over telling Mother; बाळ गेल्याचं आईला कुठल्या शब्दात सांगू? अमरावतीत अर्भकमृत्यू, बापाचा काळीज चिरणारा सवाल; आमचं लेकरु आहे तसं द्या, पोस्टमार्टम नको, कुटुंबांचा टाहो
Amravati District Hospital Fire Infants Death : आमचे बाळ आम्हाला जसे आहे तसेच परत द्या, त्याच्या चिमुकल्या शरीरावर पोस्टमार्टमचे शस्त्र चालू देऊ नका, अशी काकुळतीची विनंती करत पालकांनी हंबरडा फोडला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
गजेंद्र बडनेरकर, अमरावती : आमच्या पिढीतील हे पहिलेच बाळ… आजकाल सिझेरियनचे प्रमाण वाढलेले असताना माझ्या पत्नीची ‘नॉर्मल डिलिव्हरी’ झाली होती. सासरवाडीत मामा झाल्याचा आनंद गगनात मावत नव्हता, गावात उत्साहाने पेढे वाटले गेले. पण, एका भीषण पहाटेने आमचा हा आनंद कायमचा हिरावून घेतला. आमचे बाळ या लाचार आणि बेफिकीर व्यवस्थेने खाल्ले! अजून बायकोला हे सत्य सांगायची हिम्मत होत नाहीये, तिचे सांत्वन करू तरी कसे? अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या आवारात टाहो फोडणाऱ्या एका बापाचा हा आक्रंदणारा सवाल तेथे उपस्थित प्रत्येकाचे काळीज पिळवटून टाकत होता.
सोमवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील नवजात शिशु अतिदक्षता विभागात (एसएनसीयू) काळाने असा काही घाला घातला, की ज्या लेकरांनी अजून रुग्णालयाबाहेरची हवाही अनुभवली नव्हती, त्यांचे श्वास क्षणात थांबले. व्हेंटिलेटरच्या भीषण स्फोटाने लागलेल्या आगीत अवघ्या चार ते दहा दिवसांच्या तीन निष्पाप बालकांचा होरपळून दुर्दैवी अंत झाला. या घटनेने संपूर्ण अमरावती जिल्हा हादरला असून, रुग्णालय परिसरात पसरलेला नातेवाइकांचा आक्रोश थरकाप उडवणारा होता.
मृत बालकाच्या बापाने फोडला टाहो
आपल्या पोटच्या गोळ्याला गमावलेल्या एका पित्याने थेट व्यवस्थेवरच हल्लाबोल केला. ‘माझ्या मुलाला मारून टाकले यांनी! डॉक्टर-नर्सेस सर्व सुखरूप बाहेर पडले, पण आमची लेकरं आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. रुग्णालये माणसांचा जीव वाचवण्यासाठी असतात की जीव घेण्यासाठी?’ असा संतप्त सवाल करीत त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून देत विचारला. बोराळा (ता. चिखलदरा) येथील मातेची चिमुकली, पुलगाव (जि. वर्धा) आणि खेड (ता. अंजनगाव सुर्जी) येथील मातांचे दोन नवजात मुलगे या दुर्घटनेचे बळी ठरले.
दुर्घटनेनंतर एसएनसीयूमधील उर्वरित बालकांना तातडीने बाहेर काढण्यात आले. त्यातील सात बालकांना विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात हलवले गेले, मात्र दुर्दैवाने तिघांची प्राणज्योत मालवली होती.
मिसबा तबस्सुम यांच्या भाजलेल्या बाळावर सध्या उपचार सुरू असून, इतर दोन गंभीर बालकांना पीडीएमसीत हलवण्यात आले आहे. दरम्यान, मृत चिमुकल्यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्याची प्रक्रिया सुरू होताच नातेवाइकांचा बांध फुटला.
आमचे बाळ आम्हाला जसे आहे तसेच परत द्या, त्यांच्या चिमुकल्या शरीरावर पोस्टमार्टमचे शस्त्र चालू देऊ नका, अशी काकुळतीची विनंती करत पालकांनी हंबरडा फोडला. वातावरण अत्यंत संवेदनशील आणि तणावपूर्ण झाल्याने विभागीय संदर्भसेवा रुग्णालयात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करावा लागला, अखेर अत्यंत जड अंतःकरणाने आणि कड़क पोलिस बंदोबस्तात बॉडी शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आले.
‘फायर अलार्म वाजलाच नाही’
अत्यंत गंभीर आणि कमी वजनाच्या बालकांवर उपचारासाठी बनवलेल्या या अद्ययावत कक्षात आग लागली, तेव्हा सुरक्षा यंत्रणेचे धिंडवडे निघाले. प्रत्यक्षदर्शी नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, इतकी भीषण आग लागून धुराचे लोट पसरले तरी रुग्णालयाचा ‘फायर अलार्म’ वाजलाच नाही. जर अलार्म वेळेवर वाजला असता किंवा सुरक्षेचे प्राथमिक संकेत मिळाले असते, तर कदाचित या तीन चिमुकल्यांचे प्राण वाचू शकले असते, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.
आगीची घटना काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाली. हळहळ आणि संतापही उमटू लागला. व्यवस्थेतील गलथानपणावर बोट ठेवण्यात आले. फायर ऑडिट न करण्यावरून रोषही व्यक्त केला. घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई व्हायलाच हवी, अशी मागणीही केली गेली. बऱ्याच नेटकऱ्यांनी भंडारा आणि राज्यातील इतर आगीच्या घटनांनाही उजळा दिला.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा