Dhruv Jurel tattoo News : ध्रुव जुरेलने श्रीलंकेविरुद्ध शतक ठोकल्यानंतर ‘जय जवान, जय किसान’ टॅटू दाखवला. या सेलिब्रेशनमागची खास कहाणी त्याने स्वतः सांगितली. आजोबा आणि वडिलांशी त्याचा थेट संबंध आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात ध्रुव जुरेलने झळकावलेलं दमदार शतक आणि त्यानंतर केलेलं सेलिब्रेशन सध्या क्रिकेट विश्वात चर्चेचा विषय बनलं आहे. जुरेलने शतक पूर्ण होताच आपल्या बायसेप्सवरील ‘जय जवान, जय किसान’ हा टॅटू संपूर्ण जगाला अभिमानाने दाखवला आणि चाहत्यांची मनं जिंकली. पण, त्याने हे असंच सेलिब्रेशन का केलं? यामागचं अत्यंत भावूक आणि अभिमानास्पद कारण आता खुद्द जुरेलनेच सांगितलं आहे.
असिथा फर्नांडोच्या चेंडूवर एक धाव घेत जुरेलने आपलं कसोटी शतक साजरं केलं. हवेत उडी मारून, हेल्मेट काढून त्याने आपला डावा हात उंचावला आणि बाहूवर गोंदवलेला टॅटू दाखवला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर या सेलिब्रेशनविषयी बोलताना जुरेलने एक खास खुलासा केला. तो म्हणाला, “माझे आजोबा शेतकरी होते आणि माझे वडील सैनिक होते. मी एका फौजी आणि शेतकरी कुटुंबातून आलो आहे.” कुटुंबातील याच संस्कारांची आठवण म्हणून आणि देशाचे रक्षक व अन्नदाते यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्याने हा टॅटू गोंदवला आहे.
ध्रुव जुरेलचे वडील नेम सिंह जुरेल हे भारतीय लष्कराचे माजी जवान आहेत. त्यांनी कारगिल युद्धात देशाची सेवा केली होती. विशेष म्हणजे, याआधी जुरेलने जेव्हा आपल्या कसोटी कारकिर्दीतलं पहिलं शतक झळकावलं होतं, तेव्हा त्याने अगदी आर्मी स्टाईलमध्ये सॅल्युट करत आपला आनंद साजरा केला होता. त्याची ही कृती त्याच्या मनातील प्रखर देशभक्तीची साक्ष देते.
जुरेलची नाबाद खेळी अन् टीम इंडियाचा दबदबा
या सामन्यात भारतीय संघाने आपल्या फलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेला पूर्णपणे बॅकफूटवर ढकललं आहे. ७ व्या क्रमांकावर फलंदाजीला येत जुरेलने १७७ चेंडूंचा सामना केला आणि ९ चौकार व २ षटकारांच्या मदतीने नाबाद ११५ धावांची अत्यंत संयमी खेळी केली. जुरेलव्यतिरिक्त देवदत्त पडिक्कलनेही ११७ धावांची शतकी खेळी साकारली. तर, शुभमन गिल (५० धावा) आणि ऋषभ पंत (६३ धावा) यांनी महत्त्वाची अर्धशतकं झळकावली.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा