Headlines

13 टक्के तुटवड्यासह परतीचा प्रवास सुरू; सॅटेलाईट फोटोंमधून समोर आले हवामानाचे ‘टेक सायन्स’। Maharashtra Times


देशातील काही भागांतून मान्सून लवकरच एक्झिट घेणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पावसाचा 13 टक्के तुटवडा असतानाच आता मान्सूनचा प्रवास थांबणार असल्याने उरलेली कसर भरून निघण्याची आशा मावळली आहे. अनेक राज्यांमध्ये अधूनमधून मुसळधार पाऊस झाला असला, तरी एकूण पावसाचे प्रमाण यंदा सरासरीपेक्षा कमीच राहिले आहे.

सविस्तर माहिती अशी आहे की, गेल्या काही आठवड्यांमध्ये देशात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि वादळी हवामान पाहायला मिळाले. मात्र, आता देशातील काही भागांतून नैऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) हळूहळू परतीच्या प्रवासाला निघण्याची चिन्हे दिसत आहेत.

सॅटेलाईट फोटो काय सांगतात?

सॅटेलाईट फोटो आणि हवामानाच्या मॉडेल्सनुसार, मान्सूनचा आस आता हिमालयाच्या पायथ्याशी सरकला आहे. जेव्हा असे घडते, तेव्हा उत्तर-पश्चिम भारताच्या मैदानी भागांमध्ये पाऊस कमी होतो, हे खगोलशास्त्राचे आणि हवामानाचे जुने गणित आहे.

पाऊस सरासरीच्या तुलनेत 13 टक्के कमी

भारतीय हवामान विभागाच्या (IMD) ताज्या आकडेवारीनुसार, 4 जूनपासून आतापर्यंत देशात झालेला एकूण पाऊस सरासरीच्या तुलनेत 13 टक्के कमी आहे. यावरून यंदाच्या मोसमात देशात सर्वत्र सारखा पाऊस झालेला नाही, हे स्पष्ट होते.

हवामान विभागाने जाहीर केलेल्या राज्यांच्या पाऊस नकाशावरून (Rainfall Map) पुढील चित्र समोर आले आहे:

पश्चिम आणि मध्य भारत: या भागातील अनेक राज्यांमध्ये सरासरीच्या आसपास (सामान्य) पाऊस झाला आहे. उत्तर भारताची मैदाने (Indo-Gangetic plains) आणि ईशान्य भारत: या मोठ्या पट्ट्यात अद्यापही पावसाचा मोठा तुटवडा आहे. दक्षिण भारत: दक्षिण द्वीपकल्पीय भागातही अपुऱ्या पावसामुळे चिंतेचे वातावरण कायम आहे.

पाऊस खूपच कमी होण्याची शक्यता

येत्या काही दिवसांत पंजाब, हरियाणा, दिल्ली-एनसीआर (NCR), राजस्थान आणि आसपासच्या भागांत पाऊस खूपच कमी होण्याची शक्यता आहे. उत्तर-पश्चिमेकडून येणाऱ्या या कोरड्या हवेमुळे हवेतील दमटपणा (ह्युमिडिटी) कमी होईल आणि गेले काही दिवस जाणवणाऱ्या चिकचिकिट उकाड्यापासून लोकांना दिलासा मिळेल. मात्र, याच कोरड्या हवेमुळे उत्तर, पश्चिम आणि वायव्य भारतातील मोठ्या भागात ढग तयार होण्याची प्रक्रिया थांबणार असून पाऊस पूर्णपणे ओसरणार आहे.

मान्सूनचा प्रभाव आता कमी होऊ लागला

हवामान तज्ज्ञांच्या मते, सध्या वातावरणात एक मोठा बदल घडून येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वायव्य भारतात ठाण मांडून बसलेल्या दमट (पावसाच्या) वाऱ्यांची जागा आता उत्तर-पश्चिमेकडून येणारे कोरडे वारे घेत आहेत. या कोरड्या वाऱ्यांमुळे मान्सूनचा प्रभाव आता कमी होऊ लागला आहे.

आता जोपर्यंत बंगालच्या उपसागरातून हवेचा कमी दाबाचा एखादा नवीन पट्टा तयार होऊन तो देशाच्या जमिनीवर येत नाही, किंवा मान्सूनचा आस पुन्हा दक्षिणेकडे सरकत नाही, तोपर्यंत या भागांत पावसाची शक्यता खूपच कमी राहील.

शुभम कुलकर्णी

लेखकाबद्दलशुभम कुलकर्णीशुभम कुलकर्णी जवळपास 6 वर्षांपासून मराठी माध्यमांमध्ये काम करतोय. आकाशवाणी (छत्रपती संभाजीनगर) पासून माध्यम क्षेत्रात कामाला सुरुवात केली. एका मुखपत्रासह मुंबईतील नामांकित मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये ‘बुलेटिन प्रोड्यूसर’ म्हणून जबाबदारी सांभाळली. शुभमला राजधानी दिल्लीतही बातमीवर संस्कार करण्याची संधी मिळाली. राजकारण, व्यापार-उद्योग, क्रीडा, तंत्रज्ञान, ऑटो या विषयावर लिहायला त्याला आवडतं. निसर्गाच्या सानिध्यात बसायला, फावल्या वेळेत चित्रपट, वेब सिरीज पाहाण्याचा शुभमचा छंद आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत